Saturday, April 7, 2012

सोमनाथचे श्रममूल्यसंस्कार..!!

सोमनाथचे श्रममूल्यसंस्कारBookmark and SharePrintE-mail
डॉ. गिरीश कुलकर्णी ,रविवार ८ एप्रिल २०१२
altगोव्यात बेकायदा खाणींविरुद्ध आणि पर्यावरण रक्षणासाठी प्रा. राजेंद्र व पौर्णिमा केरकर दाम्पत्य जिवावर उदार होऊन लढते आहे. मेळघाटात आदिवासी बालकांचे कुपोषण आणि आरोग्याच्या समस्यांवर डॉ. कविता आणि डॉ. आशीष सातव पथदर्शी काम करीत आहेत. मध्य प्रदेशच्या ग्रामीण आदिवासी भागात ‘समाज प्रगती सहयोग’ ही भारतातील दहा राज्यांतील उच्चविद्याविभूषित तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था पाणलोट क्षेत्र विकास व राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सुयोग्य अंमलबजावणीद्वारे समग्र परिवर्तनाचा नवा अध्याय लिहिते आहे. अंध आणि अपंगांसाठी मध्य महाराष्ट्रात अजित कुलकर्णी समर्पित वृत्तीने ‘अनाम-प्रेम’ या संस्थेच्या माध्यमातून काम करीत आहे. अहमदनगरमध्ये अंबादास चव्हाण, अनिल गावडे, अजय वाबळे, वैजनाथ लोहार, प्रवीण मुत्याल, मीनाताई altशिंदे, संगीता शेलार ‘स्नेहालय’च्या नव्या प्रकल्पांद्वारे एच.आय.व्ही.- एड्सबाधित वेश्या, वंचित बालके यांच्या पुनर्वसनाचे पथदर्शी प्रकल्प उभारत आहेत. हनीफ शेख आणि राजीव गुजर नगरमध्येच आठ झोपडपट्टय़ांतील सुमारे दोन हजारांवर वंचित बालकांचे जीवन बदलण्यासाठी ‘बालभवन’ या प्रकल्पाद्वारे एक अभिनव प्रयोग करीत आहेत. बीड जिल्ह्य़ात गेवराई तालुक्यात एच.आय.व्ही.- एड्सबाधित बालकांसाठी संतोष गर्जे ‘सहारा अनाथालय’ चालवतो आहे. संगमनेरला राजा अवसक धनदांडग्या राजकारण्यांविरुद्ध गरीबांच्या हक्कांची लढाई लढतो आहे. खांडगावला संतोष पवार वेश्यांची आणि एड्सबाधित मुले सांभाळतो आहे. ठाण्याचा सुयोग मराठे आपल्या पीएच.डी.चा अभ्यास सांभाळत ग्रामीण भागात तरुणांसाठी श्रमसंस्कार शिबिरे आयोजित करतो. पुण्याजवळ उरळी कांचन येथे डॉ. अनिल कुडिया आपली सुपर क्लास वनची नोकरी पणाला लावून पुण्यातील व्यसनाधीन आणि लालबत्ती भागातील बालकांचा र्सवकष विकास घडवतो आहे. दिल्लीत ‘गुंज’ ही संस्था उभी करून अंशू आणि मीनाक्षी गुप्ता या दाम्पत्याने वनाधिकाराचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. मॅगसेसे पुरस्कार मिळविणारी नीलिमा मिश्रा जळगाव जिल्ह्य़ातील बहादरपूरला स्वयंपूर्ण आणि स्वाभिमानी ग्राम बनविण्यासाठी एक दशकापासून अविरत झटते आहे. श्रीगोंदा येथे अनंत झेंडे हा मुलगा महामानव बाबा आमटे विद्यार्थी सहाय्यक समितीद्वारे २५ गरीब, गरजू विद्यार्थ्यांना जीवनमूल्य आणि जगण्याचे ध्येय देत शिक्षणाला आधार देत आहे.. अशी ही यादी न संपणारी आहे. 
altआज देशातील कानाकोपऱ्यात सेवाकार्याच्या ध्यासाने प्रेरित झालेले असंख्य तरुण-तरुणी लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना पूर्ण ताकदीने भिडलेले दिसतात. यातील बहुतांश तरुण-तरुणींनी वयाच्या विशीतच वेगळ्या वाटेने जगणे सुरू केले आणि वयाची चाळिशी समोर उभी असताना समाजाचा सहयोग आणि पाठबळ मिळवून सशक्त संस्थाही उभ्या केल्या आहेत. त्यांच्या या रचनात्मक धडपडीमागे प्रेरणेचा आणि ऊर्मीचा एक समान धागा आहे. ज्याचे नाव- बाबा आमटे. अशा अनेक तरुण कार्यकर्त्यांना प्रत्याप्रत्यक्ष प्रेरणा मिळाली ती बाबांच्या कामातून, त्यांच्या सहवासातून आणि त्यांनी प्रज्ज्वलित केलेल्या सोमनाथच्या श्रमसंस्कार शिबिरांतून!
देशातील प्रत्येक राज्यात असे सेवाकार्याच्या ध्यासाने पेटलेले तरुण-तरुणी आपापल्या पंचक्रोशीतील भेडसावणाऱ्या प्रश्नांना पूर्ण ताकदीने भिडलेले दिसतात. कुठे संघर्ष झडतो आहे, कुठे रचनेचा आविष्कार अंकुरतो आहे, कुठे रचना आणि संघर्षांचा योग्य मेळ घालून व्यवस्थेवर परिवर्तनासाठी दबाव तयार केला जातो आहे. यातील बहुतांश तरुण-तरुणींनी वयाच्या विशीतच वेगळ्या वाटेने जगणे सुरू केले आणि वयाची चाळिशी समोर उभी असताना समाजाचा सहयोग आणि पाठबळ मिळवून सशक्त संस्थाही उभ्या केल्या आहेत. या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या कार्याची प्रेरणा जाणून घेतल्यावर जाणवते की, अशा हजारो धडपडींमागे एका समान प्रेरणेचा आणि ऊर्मीचा धागा आहे. ज्याचे नाव आहे- बाबा आमटे. अशा अनेक तरुण कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रेरणा मिळाली ती बाबांच्या कामातून, सहवासातून आणि बाबांनी प्रज्ज्वलित केलेल्या सोमनाथच्या श्रमसंस्कार छावणीच्या धगधगत्या अग्निकुंडातून!
आपला देश सध्या संक्रमणावस्थेतून चालला आहे. अस्वस्थ करणारे समाजातील अनेक नवे बदल आपल्याला सतावत आहेत. देशासाठी सर्वस्व त्यागणाऱ्या समíपत देशभक्तांचा क्रांतिवाद आणि त्याग आजच्या तरुणाईतून जणू लुप्त झाल्याची शंका येते. सतत एस.एम.एस., ई-मेल, फेसबुकमध्ये दंग असणाऱ्या आजच्या तरुणाईला आपल्याच समाजातील करोडो शोषित, वंचितांच्या नरकमय जीवनाची किंचितही जाणीव असू नये, असा प्रश्न आपल्याला पडतो. पण निराशेचे हे मळभ एका निरलस सेवा परंपरेला आपण सजगपणे स्मरतो तेव्हा दूर होते. ‘पेरते व्हा..’ हा आश्वासक भाव आपल्या मनात प्रज्ज्वलित करणारे हे अग्निकुंड म्हणजेच महारोगी सेवा समितीच्या आनंदवन प्रकल्पातर्फे दरवर्षी आयोजिली जाणारी सोमनाथची श्रमसंस्कार छावणी! यंदाही संवेदनशील आणि कृतिशील तरुणाईला १५ ते २२ मे या काळात जीवन संपन्न करणाऱ्या या छावणीच्या अनोख्या अनुभूतीची संधी मिळणार आहे.
१९६७ साली बाबा आमटे या द्रष्टय़ा महामानवाने चंद्रपूर जिल्ह्य़ातील सोमनाथच्या जंगलात ही सेवाकार्याची धुनी प्रज्वलित केली. गेली ४५ वष्रे देशभरातले स्वप्नं पाहणारे आणि त्या स्वप्नासाठीच जगू इच्छिणारे हजारो तरुण-तरुणी इथे एकत्र येतात. इथल्या यज्ञकुंडातील निखारे हृदयात भरून परततात. आपल्या क्षमता एकवटतात आणि त्या समाजासाठी विकसित करतात. श्रमाची प्रतिष्ठा आणि सामूहिक श्रमाचे मोल जाणतात. याच सेवा परंपरेतून आणि प्रेरणेतून भारताच्या नवनिर्माणाचे असंख्य प्रयोग देशभर ठिकठिकाणी सुरू आहेत.
बाबांनी सोमनाथचा श्रमसंस्कार ‘याग’ सुरू केला तेव्हा ‘एन. जी. ओ.’ हा शब्द किंवा ‘एन. जी. ओ. संस्कृती’ आजच्या एवढी प्रचलित नव्हती. या श्रमसंस्कार छावणीमुळे गेल्या चार दशकांत उपेक्षित, सर्वहारा, सर्वघृणित समूहांमधील ‘माणूस’ जागा करण्याची प्रेरणा तरुणाईला मिळाली. मानव्याची आणि स्वीकाराची पहाट शतकानुशतके काळोखातच पिचलेल्या माणसांच्या आयुष्यात उगवली. देशभर भारलेल्या तरुणाईमुळे अक्षरश: हजारो प्रकाशाची बेटं प्रज्ज्वलित झाली. अंधाराला चिरत उज्ज्वल उदयाची आशा येथील श्रमसंस्कारांमुळे शिबिरार्थीत प्रखर झाली. या श्रमसंस्कार छावणीत जो येतो, तो बदलतोच. जो स्वत: बदलतो, तो वेगळ्या पद्धतीने जगण्याचा आणि नि:स्वार्थ वृत्तीने समाजासाठी श्रमण्याचा निर्धार करतो.. श्रमालाच परमेश्वर मानतो आणि त्यातून आपल्या समाजात, पंचक्रोशीत सकारात्मक बदल घडवतो. वेगळ्या पायवाटा मळण्यासाठी आतुर असलेल्या, एका वेगळ्या आव्हानात्मक, अर्थपूर्ण आणि आशयसंपन्न अशा आयुष्याचा शोध घेणाऱ्या मनस्वी तरुणाईला सोमनाथची श्रमसंस्कार छावणी नित्य साद घालत आली आहे. आशयसंपन्न जीवनाचा आयुष्यात शोध न लागलेले ‘सत्तरीचे तरुण’ही छावणीत येतात. परंतु सोमनाथला घनदाट जंगल आहे. येथे उन्हाचा कडाका असतो. तो झेपण्याची शारीरिक आणि मानसिक तयारी असायला हवी. दरवर्षी १५ ते २२ मेपर्यंत चालणाऱ्या या श्रमसंस्कार छावणीत केवळ वेगळ्या, जंगलानुभवाच्या, पर्यटनाच्या अपेक्षेने कोणी येईल तर मात्र त्याची निराशा होईल. नवनिर्माणाच्या आव्हानासाठी आसुसलेल्या तारुण्यसुलभ संघर्षांची अनिवार ऊर्मी तुम्ही उरात बाळगून असाल तर मात्र सोमनाथच्या श्रमसंस्कार छावणीचे हे निमंत्रण खास तुमच्यासाठीच आहे.
बाबा आमटे शब्दप्रभूही होते. ते म्हणायचे, ‘सुळासाठी छाती पुढे केल्याशिवाय मुकुटासाठी मस्तक पुढे करता येत नाही. थोर श्रद्धा आणि ध्येयांना महान अग्निदिव्यातून जावे लागते.’ अशी विचारधारा तरुणाईला देणाऱ्या बाबांनी समाजाने झिडकारलेल्या कुष्ठरोग्यांच्या सर्वागीण पुनरुत्थानासाठी १९४९ साली आनंदवनाची स्थापना करून करुणेचा कलाम जगाला दिला. सोमनाथ, अशोकवन, हेमलकसा इत्यादी प्रकल्पांतून सेवेचे यज्ञकुंड बाबांनी सुरू केले. समाजातील जवळपास सर्वच वंचित, उपेक्षित घटकांच्या जीवनाला स्पर्शणारे उपक्रम बाबांनी सुरू केले. कुष्ठरुग्ण, अंध, मूकबधिर, बहुविकलांग, वृद्ध, आदिवासी समस्याग्रस्तांसाठी या प्रकल्पांत हक्काचे घर आणि परिवार बाबांनी बनवला. म्हणूनच ‘सेवाकार्याची समग्र गीता’असे आनंदवन प्रयोगाला म्हटले गेले.
समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोग्यांसह कार्य उभारत असताना लोक बाबांची पाठीमागे टवाळी करायचे. ध्येयासक्तबाबांना मात्र कोण काय म्हणतो, याची कधीही फिकीर नव्हती. बाबा म्हणायचे, ‘जोपर्यंत समाजातील युवक जागा होत नाही, तोपर्यंत समाजातील दैन्य, वेदना आणि अश्रू संपूच शकत नाहीत.’ या चिंतनातून त्यांनी ‘हाथ लगे निर्माण में, नही माँगने, नहीं मारने’ हा मंत्र युवा पिढीला दिला. श्रमजीवी आणि बुद्धिजीवी हे समाजाचे दोन मुख्य घटक. या दोन्हीमधील दरी जशी रुंदावत जाईल, तशी सामाजिक-आíथक विषमता आणि शोषण समाजाचा विनाश घडवील, असे बाबा म्हणायचे. श्रम आणि श्रमिकाला तुच्छ लेखणारा समाज असंस्कृत आणि अज्ञानी असतो, तो कधीच प्रगतिशील नसतो, असे ठणकावणारे बाबा स्वत: एक ‘श्रम-बुद्धिजीवी’ होते. म्हणूनच बाबांनी विद्यादान करणाऱ्या विद्यापीठांबरोबरच श्रमाचे आणि सेवेचे महत्त्व तसेच संस्कार देणारे विद्यापीठ असावे अशी कल्पना मांडली. १९६७ साली चंद्रपूर जिल्ह्य़ातील मूल या तालुक्याच्या गावापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या घनदाट जंगलामध्ये सोमनाथ प्रकल्पाची सुरुवात झाली आणि श्रमसंस्कार छावणीची मुहूर्तमेढही रोवली गेली. भारतभरातून भारलेल्या युवक-युवतींचे तांडे या प्रकल्पात श्रमाचे संस्कार घेण्यासाठी येऊ लागले. १५ मे १९६७ रोजी पहिले श्रमसंस्कार शिबीर बाबांनी आयोजित केले.
७० च्या अस्वस्थ दशकात अस्वस्थ तरुणाईला एकत्र येण्याचे एक माध्यम हवे होते.  मुक्त, खुल्या संवादासाठी एक व्यासपीठ हवे होते. तरुणांना आपले विचार तर्कावर घासून पाहायचे होते. स्वतच्या जीवनाची आणि कार्याची दिशा ठरवायची होती. विचार वेगळे असतानाही किमान सहमतीच्या मुद्दय़ांवर आधारित एकत्र काम कसे करायचे, याबद्दल अनेकांच्या मनात संदिग्धता होती. बाबांच्या छावणीने या अस्वस्थतेला व्यक्त व्हायला एक सक्षम, खुले व्यासपीठ दिले. या सर्वाना श्रमसंस्काराचा वसा देण्यासाठी बाबांनी कोणताही ‘इझम्’ या छावणीला चिकटवला नाही. बाबांना स्वतचा नवा संप्रदाय किंवा ‘फॅन क्लब’ तयार करून इतरांविषयी अविश्वास वा नकारभाव पेरायचा नव्हता. एकमेकांच्या सहवासाशिवाय आणि परस्परांना नीट समजून घेतल्याशिवाय एकत्र येऊन रचनात्मक किंवा संघर्षांत्मक काम करू शकत नाही किंवा ते टिकवूही शकत नाही, असा त्यांचा ठाम विश्वास होता. बाबांनी कधीच कुणाला नाकारले नाही. त्यामुळे सर्व विचारधारांचे युवक बाबांच्या छावणीत यायचे. एकमेकांकडून बरेच काही शिकायचे. काही स्वीकारायचे, काही नाकारायचे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाबांचा कठोर श्रमांवर आधारित कर्मवाद त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञानच बदलून टाकीत असे. ‘मणभर बाष्कळ गप्पांपेक्षा अर्थपूर्ण लहानशा कृतीतूनच मानव्य साकारते’ हे बाबांचे तत्त्वज्ञान तरुणाईला भावायचे. त्यामुळे भेदाभेद, तोडफोड, प्रतिक्रियावादाऐवजी रचनात्मक पायावरील श्रमवाद आणि एकात्मतेचा भाव या शिबिरांमधून बाबांनी भारलेल्या या युवावर्गाला दिला. परिस्थिती आणि इतरांशी समायोजन या छावण्यांनीच तरुणांना शिकविले.
सुरुवातीची आठ वष्रे हे शिबीर एक महिना चालायचे. वैदर्भीय तप्त हवामानात बाहेरच्या युवक-युवतींनी यावे, परिवर्तनाच्या टप्प्यावर नवे सामाजिक बदल त्यांनी स्वीकारावे आणि मुख्य म्हणजे सकाळी व संध्याकाळी घामात निथळवणारे श्रम करावेत, अशी संकल्पना सुरुवातीपासूनच रुजली. शिबिराची संवादभाषा ही राष्ट्रभाषा हिंदी होती. भारतातील उत्तरेकडील काश्मीर, हिमाचल प्रदेश, बिहारपासून ते दक्षिणेकडील कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांतले युवक-युवती या शिबिरांना १९६७ पासूनच येत राहिले. बंगाल, आसाम, ओरिसा इत्यादी पूर्वोत्तर राज्यांतून १९७३ नंतर तरुणाई येऊ लागली आणि या बहुभाषिक शिबिरार्थीमुळे या शिबिरास जणू लघू भारताचेच रूप येऊ लागले.
शिबिरात येण्यासाठी आगाऊ नोंदणी श्रेयस्कर ठरते. छावणीचा कालावधी १५ मे ते २२ मे असतो. १४ मे रोजी भारतभरातून युवक-युवतींचे जथ्थे सोमनाथ प्रकल्पात दाखल होतात. १५ मे रोजी सकाळी ५.३० वाजता ध्वजारोहणाने श्रमसंस्कार छावणी सुरू होते. भारत जोडोचे, श्रमप्रतिष्ठेचे नारे दिले जातात. हिंदी-मराठीसह बहुभाषिक प्रेरणागीते ताल-सुरात गात तरुणाईचा श्रमयज्ञ सुरू होतो. ‘नौजवान आओ रे, नौजवान गाओ रे, लो कदम मिलाओ रे, लो कदम बढाओ रे’ अशी किमान पाच-सहा गीते शिबिरात सहज पाठ होऊन जातात. सकाळी ६.३० पासून श्रमदानाला सुरुवात होते. कुदळ, फावडे, पाटी आदी साहित्य घेऊन शिबिरार्थी कामाच्या जागी निघतात. शिबिरादरम्यान सात दिवसांच्या काळात श्रमातून एखाद्या तलावाचे खोलीकरण, नाल्याची बांधबंदिस्ती, वृक्षलागवडीसाठी खड्डे करणे असा भरगच्च कार्यक्रम असतो. छावणीमुळे राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, सामाजिक जाणिवा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तरुणांमध्ये अंकुरतो. सकाळी तीन तास श्रमानंतर दुपारच्या सत्रात बौद्धिक व्याख्याने होतात. यात प्रत्यक्ष सामाजिक विकासाच्या, परिवर्तनाच्या कार्यात सक्रिय असणाऱ्या कृतिशील कार्यकर्त्यांशी तरुणाईचा थेट संवाद होतो. गेल्या ४५ वर्षांत अनेक दिग्गजांनी शिबिरातल्या मुलांसोबत अशा प्रकारे संवाद साधला आहे. संध्याकाळच्या सत्रात शिबिरार्थी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. हे शिबीर शेती, जंगल, जमीन, गरीब व वंचितांशी तरुणाईचे नाते जोडते. प्रत्येकाला दुसऱ्या जिल्ह्य़ातील वा राज्यातील मित्र देते. येथे श्रमणारी मने आपोआप नम्र, अंतर्मुख आणि रचनात्मक होतात. आपला देश आणि समाज समजून घेण्याची दुर्मीळ संधी ही छावणी देत असते.
आता बाबा आणि साधनाताई हयात नाहीत; पण डॉ. विकास आणि डॉ. भारतीताई आमटे ही दुसरी पिढी छावणीत शिबिरार्थीना भेटते. विकासदादा या तरुणाईत रमतात. आज आनंदवनाची नवी पिढी नवीन वाटा मळते आहे. नवा वारसा तयार करते आहे. आनंदवन आता आपल्या नव्या युवा संचासह छावणीच्या आयोजनात व्यस्त आहे. यंदाचे शिबीर काही नव्या संकल्पनांसोबत राबविले जाईल. शिबिरार्थीना सेवाकार्याच्या नव्या जागा आणि साधनजुळणीची कौशल्ये ज्ञात करून दिली जातील. प्रत्यक्ष सेवाकार्यानुभवासाठी आपल्या आयुष्यातील काही काळ कोणी देणार असेल तर त्यास योग्य ती संस्था आणि सेवाकार्य सुचविणे, धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांशी नियमित संवाद वाढविण्याची योजना, इतर युवा शिबिरे व छावण्या यांच्याशी संवाद व सामूहिकरीत्या तरुणाईसोबत राबविण्याची कार्ययोजना आखणे असे बरेच काही यावर्षीच्या छावणीच्या निमित्ताने योजले आहे, अशी माहिती शिबिराचे संयोजक कौस्तुभ आमटे यांनी दिली. या शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुणाईने नावनोंदणीसाठी पुढील ठिकाणी संपर्क साधावा- कौस्तुभ विकास आमटे, सहाय्यक सचिव- महारोगी सेवा समिती, मु. पो. आनंदवन, ता. वरोरा, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र, पिन- ४४२९१४. भ्रमणध्वनी- ९८६९३३३४८८/ ९५५२५८२२१५. ई-मेल : somnathcamp@gmail.com

त्या फुलांच्या गंधकोषी ...!!!

ती आई होती म्हणुनी...

कवी ग्रेस यांच्या कवितेतून व्यक्त झालेली ‘आई’  अगदी शुद्ध रूपातील एक ‘देहस्विनी’ आहे. त्यांच्या कवितेत ‘आई’ प्रतिमेचे, नात्यातून निर्माण होणारे भावनिक उदात्तीकरण नाही वा कठोर वास्तवातून आलेले अवमूल्यनही नाही. ‘आई’मधील ‘आदिम स्त्री’, तिचे वासनामय देहनिष्ठ स्वरूप ग्रेस नाकारत नाहीत. तिला ‘स्त्री’ म्हणून समजून घेतात. तिच्याचमुळे आपण अस्तित्वात आलो आणि तिच्याबरोबरच जन्मकाळाची गूढेही आपल्या वाटय़ाला आली, असे ते मानतात... 
And when my voice is silent in death,
my song will speak in your living heart
- Ravindranath Tagore
कवी ग्रेस यांच्या मृत्यूनंतर रवींद्रनाथांचे हे उद्धृत अधिकच खरे ठरते. मृत्यूमुळे त्यांचा स्वर शांत झाला असला, तरी त्यांच्या कवितांची गूढ आशयांची स्वरावली रसिकमनात स्पंदत राहिली आहे..राहणार आहे..
शब्दांच्या आशयाच्या, प्रतिमांच्या धुक्यासारख्या रचना करणाऱ्या या कवीच्या प्रतिभेचा शोध घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला; पण तो पूर्णत्वाला गेला असा दावा कोणीच करू शकलेले नाही. तरीही पुन्हा पुन्हा त्यांच्या कवितेच्या आशयाचा, रचनालयीचा, प्रतिमांचा उलगडा करून पाहावा असे मात्र सतत वाटत राहते. त्यांच्या कवितेची ही सारी अंगे, तिचे तरल पदर संपूर्णपणे न्याहाळणेही अवघड वाटावे. म्हणून येथे फक्त त्यांच्या कवितेतील ‘आई’ प्रतिमेच्या अर्थनिर्णयाचा प्रयत्न करून पाहायचे आहे.
ग्रेस यांच्या कविता, ललितलेखन यांचे वाचन केल्यानंतर काही गोष्टी ध्यानी येतात. त्यांच्या कलासृष्टीत त्यांचे स्वत:चे खास असे अनुभवविश्व साकार होत गेलेले आहे. कलावंताचे व्यक्तिमत्त्व, त्याचा प्रतिभाधर्म आणि त्याची अनुभव घेण्याची पद्धती यानुसार त्याच्या कलासृष्टीतील अनुभवविश्वाचे स्वरूप, शैली, प्रकृती व रचना हळूहळू निश्चित होत असतात. ग्रेस यांच्या अनुभवविश्वाच्या केंद्रस्थानी एकच विषय आहे, असे दिसते. त्यांची प्रतिभा एकाच आशयाभोवती रुंजी घालते आणि त्या दृष्टीने पाहता, ग्रेस यांच्या कलासृष्टीचे अनुभवविश्व एककेंद्री आहे. मानवी जीवनातील अगम्य, अटळ असे दु:ख हे त्यांच्या अनुभवविश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि हेच दु:ख त्यांच्या साहित्यसृष्टीचे शक्तिकेंद्र आहे. या शक्तिकेंद्रातून असंख्य अनुभवतरंग कलारूपे घेऊन अवतरत राहतात. कवितेत सृजन आणि मरण या दोन टोकांमधले जीवन कवीच्या प्रकृतीनुसार अभिव्यक्त होते. ग्रेस यांच्या कवितेच्या दु:खकळेची सूक्ष्मासूक्ष्म जन्मकारणे त्यांच्या कवितेतून स्पंदत असतात. सृजनशक्तीचे आणि मृत्युशक्तीचे एक केंद्र ‘स्त्री’ आहे. निर्मितीच्या क्षणीच निर्मितीनाशाच्या भयाने कंपित होणारी ग्रेसची जाणीव स्त्रीच्या अनेक प्रतिमांतून सतेज होत जाते. बाला, कुमारी, माता (मातास्वरूप इतर स्त्रिया- त्यांच्या प्रतिमा), या स्त्रीरूपांतून ही जाणीव रूपे धारण करते. सौंदर्य, मार्दव, कामभावना, करुणा, मनस्वीपणा, देहस्वीपणा या गुणांनी त्यांची ‘स्त्री’ नटलेली आहे.
परंतु त्या सर्व रूपांतही ‘आई’ व तिची गुणस्वरूपे तिच्या रूपाने वाटय़ाला आलेले जीवनाचे दु:खमय, करुणामय भागधेय हे ग्रेसच्या या प्रतिमेचे वैशिष्टय़ आहे. या प्रतिमेचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, ही ‘आई’ अगदी शुद्ध रूपातील एक ‘देहस्विनी’ आहे. त्यांच्या कवितेत ‘आई’ प्रतिमेचे, नात्यातून निर्माण होणारे भावनिक उदात्तीकरण नाही वा कठोर वास्तवातून आलेले अवमूल्यनही नाही. ‘आई’मधील ‘आदिम स्त्री’, तिचे वासनामय देहनिष्ठ स्वरूप ग्रेस नाकारत नाहीत. तिला ‘स्त्री’ म्हणून समजून घेतात. तिच्याचमुळे आपण अस्तित्वात आलो आणि तिच्याबरोबरच जन्मकाळाची गूढेही आपल्या वाटय़ाला आली. त्यात दु:खाचा, उदासीचा रंग अधिक ठळक आहे असे ते मानतात.
मातृवनात जगत असताना तिच्याही जगण्याच्या सावल्या आपल्या आयुष्यात सरमिसळ झाल्या आहेत, अशी भावना त्यांची कविता व्यक्त करते. आयुष्याच्या सांध्यपर्वात, शब्द हरवून गेल्यावर ती ‘सांजफुलांची वेळ’ होते, पाण्यावरच्या चंद्रखुणा (शृंगारसूचक)ची ती ‘निळीसावळी वेल’ होते, गात्रांचे शिल्प स्पर्शापासून सुटल्यावर ती ‘गतजन्मीची भूल’ होता होता अखेरीस पायात धुळीचे (पार्थिवतेचे) लोळ घेऊन ‘भातुकलीचा खेळ’च होऊन जाते.
‘आई’च्या या देहस्विनी रूपामुळे पुढे तिनेच दिलेल्या आयुष्यावर ‘चंद्राची राख’ पसरली, हे आपले प्रारब्ध मानून कवी तिला परोपरीने समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
‘चोरून अमेच्या रात्री
देऊळात आई गेली
अन् बालपणावर माझ्या
चंद्राची राख पसरली..
गावात पोचलो तेव्हा
मज उशीर झाला नव्हता
झाडाच्या खाली एक
संन्यासी निजला होता..
‘गावातल्या आठवणी’ या कवितेतून आपल्या वृत्तीतल्या वैरागीपणाचे रहस्य जणू आईच्या वर्तनातून उमटत जाते असेही कवी सुचवितो. शिवाय, मी तुझ्यापोटी आलो म्हणून तू आई होऊ शकलीस. पण मुलगा म्हणून संशयधुक्याच्या वेदनेपेक्षा नि:संग विरक्तीच का दिली नाहीस असाही प्रश्न कवी विचारतो. या वृत्तीतूनच ग्रेसच्या कवितेतील प्रतिमा, आशय यांचे अपारंपरिक रूप दिसून येते.
‘आडवाच झोपलो असतो
मीही गर्भाशयात तर
येऊ दिले असते का
तुझ्या वाटय़ाला माऊलीचे भाग्यपण?’..
...
तेव्हाच शिवून दिली असतीस
भगव्या क्षितिजाची झोळी
तर काय झाले असते?
आईचे चोरून देवळात जाणे- तिथे कुणा संन्याशाचे असणे, याचा एक दीर्घकालीन परिणाम ‘चंद्राच्या राखे’च्या प्रतिमेतून सुचविला जातो. कवीच्या कवितेतून सतत ही संन्यस्त, बैरागी वृत्ती वावरत राहते.
‘आई’च्या देहस्विनी असण्याला कवी याच संन्यस्त वृत्तीने, आयुष्य खूप कळून आल्यानंतरच्या शहाणपणाने स्वीकारतो. आणि या ‘स्त्री’ केंद्रातूनच कवीच्या अनुभवाची कलारूपे साकारतात. ‘माझी आई : सुमित्रा’ या कवितेत कवी लिहितो,
‘परसदाराला चंदनाच्या डहाळीची सुगंधी कडी लावून
ती केव्हाच निघाली बेभान :
प्रियकरांचे, यारांचे निर्घृण वध, तर डोळी त्यांचेच
धगधगते बेमुर्वत इमान!
संध्या मलुल, पांगळी, अस्तसूर्याच्या भाराने वाकलेली :
तुटलेली कर्णव्याकूळ करंगुळी..
देवासारखे हसता येईल मला : मला संतासारखे रडता
येईल? तिच्या कपाळी, चंद्रमौळी..’
‘आई’ हे ग्रेसच्या कवितेचे एक प्रबळ शक्तिकेंद्र आहे. कवी तिच्याकडे तिच्यातील ‘मादी’पणाकडे पाहतो. तिचे प्रमत्तपणच आपल्याला भुलवते, जगवते, प्रेरणा देते. कवी म्हणतो,
‘माझी आई मत्त वासना
संभोगाची भूल
क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या
करुणेचेही फूल..
माझी आई भिरभिर संध्या
घेई सूर्य दिलासा
नश्वर शब्दांच्याही ओठी
काव्यकुळातील भाषा..
आईमुळेच निर्मितीशीलतेचा अर्थ कळतो. आईमुळेच ‘शिंदळ वारा’सुद्धा शालीन होतो. अशा आईच्या जाण्यानंतर कवी ‘घनव्याकूळ’ रडतो. तिच्या जाण्याबरोबर आपले बालपणही संपले. जीवनगीताच्या ओळी तुटक, अधुऱ्याच राहिल्या ही जाणीव ठसठसत राहते.
‘‘आता लिहिताना काही
जरा वेगळे वाटते
माझ्या लेखणीची ओळ
तिळातिळाने तुटते
शब्द अनाथ दिसती
रेष हळूच ओढावी-
टिंब ठेवूनही अंती
गीत अपुरे वाटते..’’
ग्रेसच्या या ‘आई’ प्रतिमांचा अर्थनिर्णय करताना प्रश्न पडतो की कवितेत कवी आपल्या अनुभूतींचा मागोवा कसा घेत असतो? प्रथम प्रत्यक्ष जीवनात अनुभव घेऊन नंतर त्या स्थूल अनुभवाच्या सूक्ष्मातिसूक्ष्म अनुभूती कवितेत व्यक्त करतो का? कविता म्हणजे कवीने/ माणसाने भूतकाळात घेतलेल्या अनुभवाची प्रतिकृती किंवा स्मृतिकोषात तरळणारी प्रतिमा नसते. Poetic image is not an echo of the past! कवीची कल्पनाशक्तीच आपल्या प्रतिमा व्यापाराला वास्तव व भूत यापासून अलग राखत असते.
ग्रेसच्या कवितेतील ‘कवी/मी’ त्याच्या खास अनुभवमुशीतून ‘आई’च्या स्त्री-मादी-देहस्विनीरूपाची अनुभूती घेतो. ही अनुभूती तो स्वत:च्या शब्दतंद्रेतून, कल्पकतेने घेतो. म्हणून त्या अनुभूतीला नवेच कल्पकतापूर्ण अर्थरूप मिळू लागते. तेथे वास्तव ‘आई’ उरत नाही. तिच्या स्वभाव, वृत्ती, देहाचे हुबेहूब शब्दचित्र रेखाटणे यात काव्यात्मता नसते. कवीची भाषा वास्तवाला नवे अनुभूतीस्वरूप, आशयरूप देत असते. यालाच ग्रेस रूपकांची पांघरणी आणि पाझरणी म्हणतात. ग्रेसच्या कवितेत आणि एकूणच त्यांच्या भावविश्वात ‘आई’ किंवा ‘मातृवत’ हा अनुभवविषय असून अनुभव घेणारी कवीची संवेदनशीलता तिचा सर्जनशील कल्पकतेने अनुभव घेते.
‘आई’च्या देहस्विनी स्वरूपातील ‘मादी’ मागे एक कोसळणारे घर सावरणारी, मुलांना जोजवणारी, पाजणारी, पोसणारी ‘आई’सुद्धा आहे. ‘आई’च्या या थकल्या-भागल्या जीवाबद्दलची करुणा ग्रेसच्या कवितेत पुन्हा पुन्हा येत राहते.
‘घर थकलेले संन्यासी
हळुहळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यांमध्ये
नक्षत्र मला आठवते
ती नव्हती संध्या-मधुरा,
रखरखते ऊनच होते
ढग ओढून संध्येवाणी
आभाळ घसरले होते.
पक्ष्यांची घरटी होती
ते झाड तोडले कोणी?
एकेक ओंजळीमागे
असतेच झऱ्याचे पाणी.
या सुप्रसिद्ध कवितेत थकलेले घर सावरणारी, घसरणारे आभाळ तोलणारी, पक्ष्यांच्या वस्तीचे झाडच तोडून टाकल्यावर झऱ्याचे ओंजळभर पाणी होणारी आईच आहे. म्हणून तर तिच्या मृत्यूनंतर कवी ‘घनव्याकूळ रडतो’, आपल्या गीताची ओळ आता अपुरीच राहिली म्हणून खंतावतो, तर तिच्या पिंडाला कावळा शिवावा म्हणून तिचीच विनवणी करतो. आणि पिंड शिवणाऱ्या, पर्यायाने आईला मुक्ती देणाऱ्या कावळ्याला ‘सांध्यपर्वातील 

वैष्णवी’ अर्पण करून टाकतो.
‘आई’च्या जीवनशैलीतील विसंगती, विरोध, अगतिकता यांचे 
भान कवीला एक मुलगा, एक जाणता पुरुष, एक नैतिक-
अनैतिकाच्या पल्याड गेलेला संन्यस्त, संवेदनशील कवी या अनेक नात्यांनी येत जाते. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ते येते. 
‘अंधार येतो तिच्या भोवताली
तिला वाटते चंद्र ती मोजते
निनादातला मृत्यू यावा गळ्याशी
उभ्याने तशी अस्त ती झेलते.’
आयुष्यात उभ्या उभ्या स्वत:चे असे अनंत अस्त झेलणारी आई-
‘गर्भात हात हलतो भरली दुपार पोटी
आई उभ्या उभ्याने रचते अभंग कोटी’
जीवनाचे हे करुणरम्य कोटी कोटी अभंग रचताना, तिच्या आयुष्याचे चंद्रगंध विटून गेले, तरी ‘पाठीत वाकताना आई गळ्यात हसली.’ मुलांना उन्हाळेसुद्धा समना वाटून देणारी आई, तिला जगण्याच्या आरशातून (मृत्युरूप) घारी बोलावतात त्यांना आपला देहही वाटून देते. अशी ही ग्रेसच्या कवितेतली ‘आई’. ती बाई, ती पोर, ती वृद्धा, तीच सीता, ऊर्मिला, द्रौपदी. तीच मिसेस नॅली डीन, तीच मेरलीन मन्रो, तीच नटाली, तीच राधा पार्थसारथी, तीच हॉस्पिटलमधली केरळी नर्स, तीच चंद्रमाधवी, सांध्यपर्वातील वैष्णवी, सांध्यभयाची सजणी! सर्व काही तीच. आदिम स्त्रीत्वरूप अशारीर स्त्री, हाडामांसाची शारीर स्त्री!
आई प्रतिमेचा अशा प्रकारे अनुभव घेणारी ग्रेसची संवेदनशीलता कधी रामायण-महाभारतातील सीता-मिथिला, (लक्ष्मण)- शूर्पणखा यांच्यासारख्या मिथकांतून दु:ख, वेदना, वंचना यांचे रूपही अनुभवते-
‘कधी हिडिंबा पारोशी
शूर्पणखाही उदास;
देहभावाला झोंबते
देहभावाची किळस!
कधी राधा कधी कुब्जा
देहाखालून चालते;
शूर्पणखेच्याही पोटी
नवे लक्ष्मणाचे नाते.
किंवा कृष्णाने भामा, द्रौपदी, राधा यांना दिलेल्या वेदनांचेही रूप कवी मातृप्रतिमेच्या पडछायेप्रमाणे अनुभवतो. मातृरूपातून घेतलेला हा स्त्रीत्वाचा शोध ग्रेसच्या कवितेतील धमनी आहे. अनुभवविश्वातील शक्तिकेंद्राचे स्थान गवसले आणि त्यांच्या संवेदनशीलतेचा धर्म उलगडला की, ग्रेसच्या ‘आई’ कविता दुबरेध राहत नाहीत. तसेच त्यांचा इतर प्रतिमांच्या संघाताशी अनुबंध जोडता येतो आणि ‘मातृरूप’ ‘स्त्री’ प्रतिमेतून प्राक्तन म्हणून मिळालेल्या निर्मितीशक्तीचा, निर्मितीऱ्हासाच्या भयाचा वेदनेचा उदास रंग समजू लागतो आणि कवी
‘ही माझी प्रीत निराळी
संध्येचे श्यामल पाणी,
दु:खाच्या दंतकथेला
डोहातून बुडवून आणी.’
असे का म्हणतो, यातला ‘डोह’ कोणता हे सहज उमगू लागते. कवितावाचनाच्या रूढ वाटा सोडल्यानंतरच ग्रेसच्या प्रतिमा समजल्यासारख्या वाटतात. एका कवितेतून एक सलग उलगडत जाणारे आशयसूत्र सापडले की कविता ‘समजली’ असे मानणारी वाट सोडली तरच ग्रेसच्या कवितेतील भाववृत्तींचे संरचित दिसू लागते.
कविता हा जर कवीची शब्दतंद्रा आणि रसिकाची शब्दतंद्रा यातील ‘भावविण्याचा करार’ असेल, तर ग्रेसची कविता हा करार पाळते असे म्हणता येईल. आणि मग कवीच्या अनुभवविश्वातील देहरूप, वासनारूप ‘मातृकेंद्र’ कवितेतून ‘शोकमग्न गीतांच्या ओळी’ लिहायला कसे उद्युक्त करते त्याचा थोडा थोडा तळ न्याहाळता येतो. म्हणूनच हे अर्थनिर्णयनाच्या तीरावरून दिसलेले ‘आई’चे रूप!
‘आई माझी कंचुकीतल्या
तरल स्तनांचे दूध
गोरज वेळी वाटत फिरतो
जोगी कुठले वेध?..
..त्याही नंतर आई निघते
कळशी घेऊन दूर
तेव्हा कळतो खुळ्या नदीला
या मादीचा सूर..’ 
दिसले, समजले असे वाटावे आणि पुढच्याच प्रतिमेने आणखी तरंग उठवावेत आणि तरीही उत्कट, उदासीच्या लयीने ‘आई’ आपल्या मनाच्या नदीमध्ये नाद उमटवत निघून जावी, म्हणून हा अर्थनिर्णयनाचा तीर!