Saturday, August 6, 2016

जगण्याचा जामीनदार!

आसाराम लोमटे 

माणूस जगतो तो निसर्गाच्या आधाराने. त्याला मिळणारा प्रत्येक श्वास, त्याच्या भोवतालच्या सृष्टीतली हालचाल, त्याच्या भोवतीच्या पर्यावरणाचे उसासे आणि असंख्य जिवांनी भरलेले अवघे चराचर.. ही सृष्टीची किमया साकारणारा पाऊसच आहे. तो पारखा झाला तर माणूस माणसात राहत नाही. अन् त्यानेच जर दिलदारी दाखवली तर मग तरारणाऱ्या कोंभासारखे जगणेही पीळदार होऊन जाते.. केवळ छाती भरून मृद्गंध घेण्यासाठी आसुसलेल्यांना या पावसाने उल्हसित केलेच; पण छाती फाटेस्तोर राबले तरीही हाती काही उरत नाही असा अनुभव नेहमीच घेणाऱ्यांना त्याने ‘आबाद’ केले आहे. त्यांच्या जगण्याचा जामीनदार म्हणूनच धावून आलाय तो..
ज्या उजाड माळरानावर भयाण दुपारी दुष्काळाच्या जिभा फिरलेल्या असतात, तिथेच आता गवताला तुरे लागावेत, ही करामत कोणाची? आईचा तेल माखणारा हातही पारखा झालेल्या एखाद्या अनाथ लेकराचे केस वाऱ्यावर भुरुभुरु उडताना दिसावेत तसे ज्या डोंगरांचे माथे दिसू लागतात, तिथेच दाटून आलेली हिरव्यागार गवताची उतू जाणारी साय पसरवतो कोण? अन् वाऱ्यावर डफासारखी थरारणारी हिरवी सळसळ कोणाचं बोट धरून येते? निष्पाप झाडानं आपले हडकुळे हात पसरावेत आभाळाच्या दिशेनं बेदम आघात झालेल्या शरणागतासारखे, त्याच झाडांवर आता पाखरांची किलबिल.. हा चमत्कार तरी कशाचा? गणगोत तुटल्यासारखे दूरवर गेलेल्या उदास पाऊलवाटांना रंगीबेरंगी फुलांनी सजवतो कोण? अन् जिथे गरम उसासे टाकून भेगाळलेल्या भुईलाच जावेत खोलवर तडे-तिथे हे उललेले काळीज सांधतो तरी कोण? भगभगीत उन्हात सरभर झालेली माणसे कशाच्या आधाराने पुन्हा धडपडून सावरतात?
..हे सारे वास्तवात उभे करण्याचा संजीवक वकूब धारण करणारा पाऊस म्हणजे जणू आभाळाचाच हात.
..तो झरतो म्हणजे आभाळातून थेंबाथेंबाने पाणी झरते- एवढेच थोडे आहे? त्याच्या झरण्यातून पाझरतो विश्वास. त्याच्या आधारानेच जगण्याला सजवतो आपण आणि बांधतो पापण्यांना स्वप्नांचे तोरण. अशावेळी तो वाटतो आपल्या आतडय़ातल्या नात्यांचा आणि जिवंत हाडामांसाचा! म्हणूनच तो जेव्हा वाट पाहायला लावतो तेव्हा माणसे त्याच्या नावाने बोटे मोडू लागतात. तळतळून बोलताना आढळतात.. ‘कोणता दावा साधलाय.. जणू साता जन्माचा वैरी होऊन बसलाय.’ जिथे आभाळाचा रंग पाहून एकमेकांशी कसे वागायचे ते ठरवले जाते, तिथे पावसाची हजेरी लाखमोलाची! आभाळात ढगांचा पत्ता नसेल आणि पावसाच्या नक्षत्रातही लख्ख चांदण्यांनी लदबदलेले आभाळ दिसत असेल तर मग ‘काळ तर मोठा कठीण आला..’ असे वाटू लागते. व्यवहार ठप्प होतात. हात आखडते घेतले जातात. अन् तो येऊ लागला की मग त्याच्यावरचा राग कुठल्या कुठे निघून जातो. त्याच्याशी भांडणारेसुद्धा जणू नंतर त्याच्याच कुशीत शिरू पाहतात. तो येतो तेव्हा सरसकट सारखाच अन् कृत्रिम लयीत नाही बरसत. बनचुका सराईतपणा नसतो त्याच्या येण्यात. अगदी जिवावर आल्यासारखे येतो तेव्हा त्याचे मुळूमुळू येणे म्हणजे ‘मोले घातले रडाया’ असे वाटू लागते. पण जेव्हा कडकडाट, धडधडाट करीत तो येतो तेव्हा सगळा आसमंत फाटू लागतो की काय, असे वाटू लागते. थरकाप उडतो जिवाचा. चवताळलेल्या नागासारखा भासू लागतो तो. ओल्या मातीला भिडणाऱ्या बलांनी नागासारख्या शेपटय़ा करीत भुई िशगावर घ्यावी, तसला त्वेष असतो त्याच्या येण्यात. दात-ओठ खाऊन तावातावाने बरसतो तो. त्याचा धसमुसळेपणा कधी कधी अनावर संतापात उतरतो अन् एरवी त्याला शिव्या घालणारे आपण घरटय़ात बसून भीतीच्या कोठारात र्अधओल्या अंगाने निमूटपणे त्याचे हे रूप पाहतो. त्याची रग चिडीचूप करते आपल्याला. ताशा बडवल्यासारखा तो कोसळू लागतो तेव्हा होणारा झाडा-पानांचा घायटा एखाद्या अनाहत नादासारखा भासू लागतो.
यंदा त्याने कमाल केलीय. आई-बापावर रुसून गेलेल्या पोरासारखा नाही वागला तो. मुलूख सोडून परागंदा झाल्यासारखे केले नाही त्याने. लहरी जुगाऱ्याने भीड चेपल्यानंतर अगदीच निसवल्यासारखे वागावे, तसेही केले नाही. एखाद्या डरपोक माणसाने जीव मुठीत धरून पळून जावे असा भेकडपणाही नाही दाखवला आणि अध्र्यावर साथ सोडून गुंगाराही नाही दिला. थोडक्यात काय, तर पत्ता विसरला नाही तो. समजूतदार होऊन बरोबर वेळेवर आला. ‘एकदा आला अन् नादी लावून गेला’ असेही केले नाही त्याने. अखंड बरसतोय तो संततधार. त्याने वाट पाहायलाही लावली नाही अन् हातही आखडता घेतला नाही. किती किती बदललंय सगळं त्याच्या येण्याने. जिथं मुक्या जनावरांना उभं राहायलाही सावली दिसत नाही तिथं आता झाडे हिरवीगर्द झाली आहेत. हिरवंगार गवत माजलंय रानात अन् त्याचा उग्र वास येऊ लागला आहे. नदी-नाले वाहू लागलेत. उन्हात नदीच्या रखरखीत पात्रात झालेले खड्डेच खड्डे अन् वाळूवर दिसणाऱ्या मृगजळाच्या लाटांचे निशाणही शिल्लक राहिले नाही. सर्वस्व गमावल्यासारखे विवस्र्त् झालेल्या नद्या आता दमा-धीराने वाहू लागल्या आहेत. दोन्ही किनाऱ्यांना तटतटून जाणारा त्यांचा प्रवाह काय काय घेऊन जातोय सोबत.. कुठली कुठली माती अन् कुठले कुठले वाहून आलेले पाणी या सर्वाना एकजीव करत तो धावतोय पुढल्या दिशेनं. यंदा आभाळात वांझ ढगांचे कळप भटकले नाहीत. आभाळ कायमच काळेभोर अन् सदैव झरण्याच्या तयारीत असलेले. मनाला वाटेल तेव्हा पाऊस येतोय. त्यामुळे जागोजागी पिकांनी बाळसे धरले आहे. एरवीचे कुपोषण पिकांच्या वाटय़ाला आलेले नाही. डवरून आलेल्या निसर्गाचे नाना रंग सुखावत आहेत. मनाला उभारी देत आहेत. जीवघेणा दाह अन् सर्वागाची भाजणी होत असताना पावसाने दडी मारलीय असे वातावरण यंदा जाणवले नाही. तळ गाठलेले जलसाठे तुडुंब भरत आहेत. शेताशिवारात पाणी थळथळताना दिसत आहे. जवळचे होते-नव्हते टाकून पेरणी केली आणि आता तो आलाच नाही तर काय करायचे? असे म्हणत डोळ्यांत सारा जीव गोळा करून वाट पाहण्याची पाळी पावसाने आणली नाही. तो मनमुराद बरसतोच आहे. कुठे ‘महामूर’, तर कुठे ‘धुंवाधार’, कुठे ‘एकठोक’, तर कुठे ‘बेलगाम’.. काही ठिकाणी तर त्याची अक्राळविक्राळ ताकद थरकाप उठवीत आहे.
भर उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी केलेली वणवण अन् आता चौमाळ पसरलेले पाणी.. आधी घशाची कोरड अन् आता जागोजागी पायाखाली जाणवणारी आश्वासक ओल. हीच ओल झिरपत जाते तेव्हा मोकळे होतात जमिनीच्या पोटातले पाझर अन् आटलेल्या विहिरींना फुटतो पान्हा. पाषाणाला भेदून पाणी घेऊ लागते प्राणांतिक जोमाने जोरदार मुसंडी. तळाचा खडक फुटून पुन्हा पाणी धडपडू लागते जमिनीच्या पोटातून वर येण्यासाठी. जमिनीच्या पोटातच राहिलो तर मृत, अन् कातळ भेदून भुईवर आलो तरच आपण जिवंत- असली भारी जिद्द असते या पाण्यात. हे पाणी आता खळाळताना दिसू लागले आहे.. जागोजागी रांगताना दिसू लागले आहे. नक्षत्रागणिक त्यात भर पडू लागली आहे. सगळीकडे शेता-शिवारात दिसून येणारी नवथर हिरवाई, डवरून आलेली घनगर्द झाडी, गुराढोरांच्या, पाखरांच्या, किडय़ा-मुंग्यांच्या.. सगळ्यांच्याच जगण्याच्या बुडाशी आहे या पाण्याची ओल.
जेव्हा पावसाने दगा दिलेला असतो तेव्हा रानोमाळ पसरणाऱ्या वाळलेल्या गवतासारखी माणसे सरभर होतात. पोटापाण्यासाठी गाव सोडतात. पाऊस ताल धरत आला की जगण्याचाही सावरला जातो तोल.अन् तो रुसला तर बिघडून जाते जगण्याचीच लय. पडत्या पावसाने अनेक दारांच्या उंबऱ्यापर्यंत लागतेय पाणी आणि छप्परही लागते गळायला. अशा वेळी जागोजागी घरातली तुटकीफुटकी भांडी ठेवून घरात होणारा चिखलाचा डेरा उपसला जातो. पण आता पीकपाणी चांगले राहील, हंगाम करपणार नाही, पोटापाण्यासाठी बिऱ्हाड पाठीवर घेऊन जायची पाळी येणार नाही अशी भावनाही झड-पावसात चेहरे उजळून टाकते.
दगा न देता हाच पाऊस सखा होऊन येतो तेव्हा जगण्यावरचा भरवसा वाढू लागतो. पाखरांच्या चोचीत दाणे येतील. पोरासोरांच्या चेहऱ्यावर हसण्या-बागडण्याचे सुख हुंदडेल. दुष्काळात झेललेले घाव भरून येतील. जळत्या घरातून उडय़ा टाकून शिक्षणाच्या वाटा धुंडाळण्यासाठी बाहेर पडलेल्यांचे चेहरे गावाकडच्या धास्तीने काळवंडणार नाहीत. पोरीबाळींचे हात पिवळे करण्याची वेळ आली असताना धास्तीने झोप उडालेल्या बापावर गळफास घेण्याची पाळी येणार नाही. उजाड झालेल्या वस्त्यांमध्ये भणाण वारा हक्काने खेळणार नाही. दुष्काळाची चाहूल घेऊन येणाऱ्या भीषण पावलांच्या आवाजाने दचकून माणसे झुरणी लागणार नाहीत. जणू ‘असे काही होणारच नाही याची हमी मी देतो,’ असे म्हणतच पुढे येतो पाऊस.. आणि पाहता पाहता माणसे कडेलोटापासून बाजूला होतात. काहीच अपराध नसताना जेव्हा एखादे बालंट अंगावर यावे आणि जगणे नकोसे व्हावे असे वाटू लागते तेव्हा एखाद्या ‘जामीनदारा’सारखा धावून येतो पाऊस. गांजलेल्या माणसांभोवती घोंघावणाऱ्या असंख्य प्रश्नांचे भुंगे तो थोपवतो. घेतो साऱ्यांच्याच जगण्याची हमी तेव्हा तो आपल्या सगळ्यांसाठीच किती मोठा तारणहार असतो. माणूस जगतो तो निसर्गाच्या आधाराने. त्याला मिळणारा प्रत्येक श्वास, त्याच्या भोवतालच्या सृष्टीतली हालचाल, त्याच्या भोवतीच्या पर्यावरणाचे उसासे आणि असंख्य जिवांनी भरलेले अवघे चराचर..ही सृष्टीची किमया साकारणारा पाऊसच आहे. तो पारखा झाला तर माणूस माणसात राहत नाही अन् त्यानेच जर दिलदारी दाखवली तर मग तरारणाऱ्या कोंभासारखे जगणेही पीळदार होऊन जाते.. केवळ छाती भरून मृद्गंध घेण्यासाठी आसुसलेल्यांना या पावसाने उल्हसित केलेच; पण छाती फाटेस्तोर राबले तरीही हाती काही उरत नाही असा अनुभव नेहमीच घेणाऱ्यांना त्याने ‘आबाद’ केले आहे. त्यांच्या जगण्याचा जामीनदार म्हणूनच धावून आलाय तो..

Wednesday, July 6, 2016

देव-घर

चहा पीत खिडकीशी उभा होतो. समोरच्या झाडावर एक कावळा घरटं बांधून कावकाव करत बसला होता. कुठून कुठून हँगर, गवत, काटक्या वगैरे आणून कावळ्याने ते सगळं छानपैकी रचलं होतं. पाऊस आलाच तर आयत्यावेळी पंचाईत नको, म्हणून कुठल्याशा घरातून ढापून आणलेली (‘महालक्ष्मी साडी सेंटर’ असं नाव छापलेली !) एक प्लास्टिकची पिशवी देखील होती. घर इज रेडी ! हाय काय आणि नाय काय ! मनात आलं…काय सुखी आहे ही प्रजा ! माणूस म्हणून जन्माला ‘न’ आल्यामुळे घरासोबत येणाऱ्या कितीतरी गोष्टी नाहीच्चेत यांच्या आयुष्यात !

हल्ली वर्तमानपत्रात ज्या जाहिरातींच्यामध्ये बातम्या येतात त्या – घरांच्या जाहिराती, होम हंटिंग, होम लोन्स आणि त्याचे हप्ते, त्यासाठी लागणारी विविध कागदपत्रे आणि त्यासोबत लागणाऱ्या त्यांच्या एक लाख फोटोकॉपीज, पझेशन, रंग-टाईल्स-फर्निचर-नळ-कड्या यांचं सिलेक्शन, गृहप्रवेश, गृहशांती, वास्तुशास्त्र, नवीन घराच्या पार्ट्या, भांडी, हवे असलेले-नसलेले हजारो कपडे आणि त्यासाठी नेहमीच कमी पडणारी कपाटे, टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन, फ्रीज, मिक्सर अशा तत्सम गोष्टी आणि त्या बिघडल्यावर होणारी धावपळ….या आणि अशा तमाम गोष्टी यांच्या आयुष्यात नाहीचेत ! अरे हो…एक महत्वाची गोष्ट लिहायची राहून गेली…जी या प्राणीमात्रांच्या घरात नाहीये..देवघर !

प्राणीमात्रांच्या आयुष्यात देव नाही, धर्म नाही. त्यामुळे ओघाने येणारे रीतीरिवाज, रूढी-परंपरा, व्रत-वैकल्ये, उपास तापास..या गोष्टी नाहीत ! कावळ्याच्या त्या एका घरट्याने अंतर्मुख केलं. वस्तूंचा, गरजांचा, कर्मकांडांचा केवढा पसारा मांडून ठेवलाय आपण ! माणसाने आपल्या घरात साक्षात देवाला आणून बसवलं. पण तरीही माणूस सुखी झालाय का? प्राणी पक्षांच्या आयुष्यात ‘देव’ नाही म्हणून ते सुखी आहेत की दुःखी आहेत? कळायला मार्ग नाही. पण उपासाच्या दिवशी चुकून हरीण खाल्लं गेलं म्हणून पश्चात्ताप, ओटी भरली नाही म्हणून सिंहीणबाई रागावल्यात, मंदिरात कोकिळांना प्रवेशबंदी…असल्या  गोष्टींपासून ही प्रजा कोसो दूर असावी. त्यांच्याकडून कधीही निसर्गाच्या नियमांचं उल्लंघन होत नाही. दुसऱ्याचं न ओरबाडता ते स्वतःच्या नैसर्गिक गरजा भागवतात. आला दिवस जगतात. माझा अंदाज आहे की, ते आपल्यापेक्षा सुखी असावेत.

माणसाचं म्हणाल, तर प्रत्येक घराचे देवधर्मासंबंधी काही नीती नियम असतात. सर्वांनी ते पाळले पाहिजेत असा वडीलधाऱ्या मंडळींचा आग्रह असतो. त्या त्या धर्मानुसार घरात रोज पूजा-अर्चा होते. काही घरात गणपती, नवरात्र, गोकुळाष्टमी या स्वरूपात देवाचे पूजन होते. काही लोकांचे देव हे त्यांच्या घरात राहत नसून त्यांच्या गावच्या घरात राहतात. भारत-पाकिस्तान मॅचच्या दिवशीही ‘गावच्या जत्रेला गेलंच पाहिजे’ म्हणून जाणारे पुण्यात्मे मला माहित आहेत. सोळा शनिवार, पांढरे सोमवार वगैरे करणारी घरेही मी पाहिली आहेत. देवळात गेल्याशिवाय, पोथीचे पठण केल्याशिवाय अन्न न घेणारी माणसे मला माहित आहेत. घरात नवीन गोष्ट आल्यावर ती पहिली देवाला दाखवायची, घरात येणारे पैसे आधी देवासमोर ठेवायचे, घरात गोडधोड केल्यावर पहिला नेवैद्य देवाला दाखवायचा, घरात शुभ घटना घडल्यावर पहिला देवासमोर गुळ ठेवायचा, काही अमंगल घडतंय असं वाटलं तर देव पाण्यात ठेवायचे, दर गुरुवारी घरात गुरुचरित्राचे पठण करायचे, हरिपाठ करायचा, घरात एखाद्या जपाचा मंत्रोच्चार सीडी लावून चालू ठेवायचा, श्रावणात कांदा-लसूण-मांसाहार वर्ज्य करायचा, रोज सकाळ संध्याकाळ देवांना पंचामृताने आंघोळ घालायची, अशा विविध माध्यमातून माणसं ‘देव’ नावाच्या संस्थेशी ‘कनेक्ट’ ठेवतात. देव-धर्म वजा केले तर माणसाच्या आयुष्यात पोकळी निर्माण होईल. एकदा गंमत म्हणून ‘कालनिर्णय’ उघडा. प्रत्येक तारीख नीट वाचा. तुम्ही अवाक व्हाल. त्या प्रत्येक चौकोनात या देशातल्या धार्मिक लोकांसाठी काही ना काही उद्योग लावून दिलेला आहे. कुठल्यातरी गावात जत्रा असेल, कुणा महात्म्याची जयंती-पुण्यतिथी, नाना उपवास, आणि अगदीच काही नाही तर चंद्र-सूर्य या ना त्या नक्षत्रात प्रवेश घेत असतील. या सर्व चौकोनात दिलेली व्रतवैकल्ये (डोळे झाकून) करणारी घरे आणि त्यातील माणसे मला माहीत आहेत. त्या व्रतवैकल्यांमधील ‘खरं देवपण’ कॅलेंडरच्या चौकटीच्या बाहेर कधीतरी सांडेल का ?माणूस सुखी होईल का?

आजपासून वीस-तीस वर्षांनी आपल्या घरांमध्ये ही सर्व व्रतवैकल्ये इतक्याच आत्मीयतेने पाळली जातील का? मला नेहमी प्रश्न पडतो. कदाचित, काही वर्षांनी ‘कालनिर्णय’ आणि तत्सम कॅलेंडर कंपन्यांना नव्या पिढीची गरज ओळखून बदलावं लागेल. ज्या पिढीला ‘एकादशी’ म्हणजे काय हे माहित नसेल त्यांना ‘अपरा एकदशी’ कशी कळेल? ‘ओला’ आणि ‘उबर’च्या जमान्यात सूर्याचे वाहन उंदीर आहे की हत्त्ती आहे याने काय फरक पडेल? वीस पंचवीस वर्षांनी ‘कालनिर्णय’ मध्ये अमुक तारखेला ‘फेसबुक स्थापना दिन’, फादर्स डे, बिग बझार मेगा ऑफर डे..वगैरे दिसलं तर फार आश्चर्य वाटायची गरज नाही. पूर्वीच्या काळातली सोवळीओवळी आणि त्यातला तो कर्मठपणा जसा कमी झाला तशी हळूहळू घरातल्या देवाचं आणि पर्यायाने त्या देवघराचं महत्व कमी होईल का? Don’t get me wrong ! या नव्या पिढीच्या घरातून ‘देवघर’ कधीच वजा होणार नाही. मात्र व्रत वैकल्यांसाठी घ्यावे लागणारे परिश्रम, उत्साह, द्यावा लागणारा वेळ आणि शरीराला कष्ट यातलं या नव्या पिढीला काहीही द्यायचं नाही. कारण दाण्याची आमटी आणि साबुदाणा खिचडी खाऊन उपास करणारी आपली पिढी ते घरात रोज पाहत आहेत. यातील ‘फॉर्म ओव्हर सबस्टन्स’ या नव्या पिढीने बरोब्बर जोखलाय. ते कमी म्हणून की काय, सोशल मिडिया त्यात तेल ओतण्याचं काम करत्ये. नव्या पिढीच्या दृष्टीने प्रजासत्ताकदिन, अंगारकी चतुर्थी, नागपंचमी, फादर्स डे, भारताने मॅच जिंकल्याचा दिवस, गटारी अमावस्या हे सगळं एकाच पातळीवर आहे. जगात काही घडो, त्याचं ‘स्टेटस’ अपडेट करायला कंटेंट मिळाला पाहिजे ! हे एकदा लक्षात घेतलं की सोशल मिडीयावर ‘वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !’ असं वाचल्यावर फार धक्का बसणार नाही.

प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात. मी अशा काही घरांमध्ये गेलोय की ज्या घराचा उंबरठा ओलांडून आत गेल्या गेल्या ‘छान’ वाटतं. ते केवळ घराच्या सजावटीमुळे किंवा स्वच्छतेमुळे नसतं. ते ‘छान वाटणं’ त्या घरात राहणाऱ्या आनंदी व प्रसन्न माणसांमुळे असतं. इथे रोजच्या पुजेइतकंच महत्व त्या घरातल्या लहानापासून प्रत्येक मोठ्या व्यक्तीला दिलं जातं. इथे उपास कोणाचे आहेत यापेक्षा घरात काम करणारी गडी माणसं जेवली का, याची विचारणा होते. यज्ञ, अभिषेक, नैवेद्य यापेक्षा सामाजिक कार्यासाठी सढळ हाताने मदत केली जाते. अशा घरांत देवघरासाठी वेगळ्या जागेची गरज नसते. ते घरच देव-घर होऊन जातं.

या निमित्ताने एक घटना आठवली. ती सांगतो आणि थांबतो. अहमदनगरला आमचा एक मित्र नितेश बनसोडे ‘सावली’ नावाची संस्था चालवतो. सुमारे पन्नास मुलांना दत्तक घेतलंय त्याने. या संस्थेला मदत करण्यासाठी एक सधन मारवाडी कुटुंब आलं होतं. दुर्दैवाने त्या कुटुंबातला एक मुलगा नुसता मतीमंद नव्हता तर ‘व्हेजिटेबल’ अवस्थेत होता. दया येऊन आम्ही त्या मुलाबद्दल चौकशी केली. त्या मुलाचे वडील म्हणाले, ‘आमचा हा मुलगा आता पंधरा वर्षांचा आहे. यापुढे हा बरा होणार नाही, हे आम्हाला कळल्यावर पायाखालची जमीन सरकली. जणू आमचं सगळं घरच मोडून पडलं. यातून आधी मी स्वतः सावरलो. नंतर घरच्या सर्व लोकांना एकत्र केलं. घरातले आम्ही सगळेच कमालीचे देवभक्त आहोत. मी घरच्यांना सांगितलं, असं समजा, आपल्या घरात देव जन्माला आलाय. स्वतःला भाग्यवान समजा की आपल्याला प्रत्यक्ष देवाची सेवा करण्याची संधी मिळत आहे. सुदैवाने घरातल्यांनी माझं ऐकलं. त्या दिवसापासून या घराचा आमच्या मुलाकडे पाहायचा दृष्टीकोन बदलून गेला. आता आम्ही सगळे मिळून आमच्या घरातल्या ‘या’ देवाची सेवा करतो.’

या घटनेला खूप वर्ष लोटली. ही घटना घडली तो दिवस होता १० सप्टेंबर. आठवण म्हणून, त्यावर्षीच्या ‘कालनिर्णय’ मधला १० सप्टेंबरचा तो चौकोन काढून माझ्या डायरीत चिकटवून ठेवलाय. अधूनमधून डायरी चाळताना तो चौकोन दिसतो. मग तो मुलगा आठवतो. त्याहीपेक्षा, त्याचे ते हसतमुख वडील आठवतात.

‘कालनिर्णय’मधल्या तीनशे पासष्ट चौकोनातल्या सर्व व्रतांचे पुण्य माझ्या डायरीतल्या त्या एका चौकोनात आहे.

नविन अनिल काळे