Wednesday, December 15, 2010

थोबाडपुस्तक...

 

परवाच्या रविवारी दुपारी निवांत वेळ होता; म्हणून 'थोबाडपुस्तक' उघडलं आणि...
अरे! दचकलात ना?
हम्म्म्म... सहाजिक आहे.
'थोबाडपुस्तक' हा नेहमीसारखा शुद्ध आणि पारंपारिक मराठीत बोलायचा विषयच नाही; तर तो बोली मराठीत मांडण्याचा एक 'टॉपिक' आहे.

... तर ... परवाच्या 'सन्डे आफ्टरनून 'ला 'टाईमपास' म्हणून 'फेसबुक'(!!!) 'लॉगिन' केलं आणि 'वॉल' वरचे 'पोस्ट्स' बघत बसलो होतो. त्यापैकी काहींवर मी माझ्या (उपरोधक) 'कमेंट्स' टाकल्या, तर काही 'लाईक' केल्या. वास्तविक माझ्या 'फ्रेंड्सलिस्ट' मध्ये अडीचशे जण 'एडेड' आहेत. त्यामुळे 'फेसबुक'वर 'आक्टिव' रहायला मला पुरेशी कारणं 'अव्हेलेबल' असतात. नाही; कसंय... 'फेसबुक' हा जेवढा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तेवढाच तो करमणुकीचाही आहे.
उदाहरणार्थ, श्रीकांतने काल 'आय एम बोअर्ड' असं जाहीर केलं. आता यात मितालीला आवडण्यासारखं काय होतं कुणास ठाऊक; पण तिला ते 'लाईक' झालं खरं!

'फेसबुक'चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाची हालचाल... माफ करा... 'आक्टिविटी' अगदी तारीख-वेळेसकट नोंदवली जाते. त्यामुळे, दोन वर्षांची लहान मुलगी असणाऱ्या कमलेशने त्याचं स्व:चं 'प्रोफाईल' दहा तासांपूर्वी जेव्हा 'अप(टु)डेट' केलं, तेव्हा मला आलेलं 'नोटीफिकेशन' काहीसं असं होतं...
Kamlesh is married.
10 hours ago
माझं हसून हसून पोट दुखण्याची वेळ आली होती.

माझं हसून होतं न होतं, तेवढ्यात मला एक 'पिंग' आला. उजव्याबाजुच्या 'कॉर्नर'मध्ये एक 'पॉपप' दिसायला लागला. क्षमा नावाच्या माझ्या शाळेतल्या वर्गमैत्रिणीने मला 'ऑनलाईन' पाहून 'च्याट' करण्यासाठी 'हाय' केलं होतं. आता..., हा 'फेसबुक'चा खराखुरा फायदा आहे. इतर कोणत्याही प्रकारे संपर्कात नसलेल्या जुन्या मित्र-मैत्रिणींना शोधून काढण्याचं खात्रीलायक साधन म्हणजे 'फेसबुक'!
... तर, क्षमाच्या 'हाय'ला मीही पटकन 'हेलो'ने 'रिप्लाय' दिला. इथे क्षमाने आपलं 'डिस्प्ले नेम' 'क्षमा... To forgive' असं ठेवलं होतं, ही नमूद करण्यासारखी गोष्ट आहे.
'हायऱ्हेलो' नंतर रंगलेलं आमचं संभाषण काहीसं अशा प्रकारचं होतं...
क्षमा    : वॉंत्सप???
मी       : नथिंग स्पेशल. तू सांग.
क्षमा    : सेम हिअर. टी.व्ही., 'फेसबुक' आणि थोडंफार 'कुकिंग' यातच फार 'बिझी' असते रे.
मी       : चांगलंय! एकंदरीत तुझं चांगलं चाललंय!
             (या माझ्या खोचक शेऱ्यावर तिनं नुसताच एक 'स्माईली' पाठवला.)
मी       : मग? शाळेतल्या इतर कोणाशी 'टच'मधे आहेस का?
क्षमा    : हो. स्वाती, प्रणिता, अमित, प्रकाश आणि कोण-कोण आहेत माझ्या 'फ्रेंड्सलिस्ट'मधे. 'हायऱ्हेलो' होतच असतं.
मी       : गुड...
क्षमा    : वॉट एल्स? अमेरिका काय म्हणते?
मी       : अमेरिका ठीक. सध्या थंडी पडायला लागलीये.
क्षमा    : चल! यु आर सो नॉटी!!!
मी       : (गप्प)!!!
             (हे वाचून मी त्या थंडीपेक्षाही गार पडलो. काय 'रिप्लाय' द्यावा, हेच मला सुचत नव्हतं! एवढ्यात तिचाच खुलासा आला...)
क्षमा    : सॉरी! राँग विंडो!
             (अजूनही माझा अडकलेला अवंढा गळ्यातच होता. म्हणजे, ही बया इतर कोणाशीतरी (अ)'च्याट' करत होती.
              पण म्हणून, 'त्या'चा चावटपणा + हिची चूक = मी नॉटी???)
क्षमा    : अरे! निक ऑफिसमधून 'च्याट' करतोय.
              (त्या तशा थंडीत आलेला घाम मी पुसून घेतला. तिच्या या वाक्याने मला जरा धीर आला. क्षमाचा नवरा निखील उर्फ निक त्याच्या         ऑफिसमधून स्वत:च्या बायकोशी उगीचच चावटपणा करत होता. आणि क्षमाच्या अनावधानाने मी 'नॉटी' ठरलो होतो.)
मी       : ओ.के. कसा आहे निखिल?
क्षमा    : एकदम फाईन!
              (मी खरंतर इथेही 'नॉटी' याच उत्तराची अपेक्षा बाळगून होतो.)
              आज त्याला रविवारचं ऑफिसला जावं लागलं. सो, आम्ही 'फेसबुक' वर 'टाईमपास' करतोय.
मी       : ओह! कूल.
              (मी अजूनही स्वत:ला च 'कूल' करण्यात मग्न होतो!)
क्षमा    : बायदवे, तू व्हेगास ट्रीप केलीस का रे?
मी       : नाही अजून.
क्षमा    : अरे! जाऊन ये मग. 'बिंगो' नावाच्या तिथल्या कसिनोची 'ब्रांच' सद्ध्या पुण्यात उघडलीये. मस्त आहे.
             (म्हणजे, पाश्चात्य संस्कृतीच्या असल्या 'फांद्या' आता आपल्याकडेही फोफावाताहेत. आणि त्यांचं गुणवर्णन मी इथे राहून ऐकतो आहे!)
मी       : ओ.के.
क्षमा    : बी.आर.बी.
             (असं म्हणून क्षमा 'आयडल' झाली. इथे, 'बी. आर. बी.' चा फुल फॉर्म 'बी राईट ब्याक' असा असून 'आलेच हं!' इतका सोज्ज्वळ आहे, याची अज्ञानी वाचकांनी नोंद घ्यावी.)
.....
             (सुमारे दहा मिनिटांनी क्षमा जी आली, तीच 'सी या' करायला!)
क्षमा    : चाओं! सासुबाईना 'कुकिंग'मधे मदत हवी आहे. जाना पडेगा. टी.टी.एल.वाय!
मग, मीही 'शुअर' म्हणत तिला 'बा-बाय' केला.
इथे, 'टी.टी.एल.वाय' चा फुल फॉर्म 'तॉंक तु यु लेतर' असा आहे, हे सूज्ञांना सांगणे न लगे!

आमच्या दोघांच्या या संभाषणावरून हे सहज दिसून येतं की, 'फेसबुक'ची अशी स्वत:ची भाषा आहे. ती निव्वळ मराठी नाही, इंग्रजी नाही किंवा इतर कुठलीही नाही.
पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे 'फेसबुक' हे आता जीवनच होऊ लागलंय. 'फार्मविल'मधे शेती करून फावल्या वेळात ऑफिसचं काम(ही) करणारे पुष्कळ शेतकरी(!) मला ठाऊक आहेत.
जोडधंदा म्हणून 'कोफीऱ्हाऊस' चालवून 'हौस' भागवणारे कित्येक महाभाग माझे मित्र आहेत. शरीराच्या कोणत्या भागावर तीळ आहे, यावरून तुमचाच स्वभाव ओळखणारे (वात्रट) ज्तोतिशी आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेतच की!

या आणि अशा अनेक प्रकारांनी या 'फेसबुक'ने आपल्या पारंपारिक जीवनावर चांगलाच परिणाम केलाय. 'कब्जा मिळवलाय' हा कदाचित 'पर्फेक्ट' वाक्प्रचार ठरेल.
आता हेच पहा ना... नेहमी प्रमाणेच हा ही लेख शुद्ध मराठीत लिहिण्याची माझी मनापासून इच्छा होती. पण 'फेसबुक'चं भाषांतर 'थोबाडपुस्तक' केल्यावर माझी मीच माघार घेतली आणि हा लेख जमून आला...

काकडा...

 
... कार्तिकातली थंडी, त्यामुळे जाग आली तरी पांघरूणात गुरफटून पुन्हा झोपायची होणारी अनिवार इच्छा आणि एकदम देवळातली घंटा ट्ण्ण्ण्ण्ण्ण अशी वाजायची. एवढ्या पहाटे कोण आलंय हे बघायला माजघराचं दार किलकिलं करून पाहिलं, तर शेजारच्या जोशी आज्जी आलेल्या असायच्या. आणि आईला 'जयू, कुठवर आला काकडा?' असा प्रश्न असायचा. मग मात्र माझी झोप कुठे अगदी लांब पळून जायची. पटदिशी आवरून अर्ध्या तासाच्या आत, मी सोवळं नेसून देवघरात हजर! इकडे तोवर आईची पूजा निम्म्यावर आलेली असायची. कृष्णमहाराजांना पंचामृताचं स्नान चालू असायचं. आमचं देऊळ देवीचं, पण देवांच्या राज्यातही पुरुषप्रधानता असावी, म्हणूनच की काय, काकडा हा देवीचा नसतो, देवाचा असतो.
माझी आजी भक्तिपर कवनं रचायची आणि ती पूजेच्या वेळी म्हणायची. स्वतः केलेली कवनं आणि जवळ असलेला पारंपरिक कवनांचा साठा, ह्यामुळे विठोबाच्या किंवा रामाच्या वगैरे देवळात गेलं तरी तिची भजनं म्हणायची हौस काही फिटायची नाही. मग एक दिवस तिने ठवरलंच. आपलं स्वतःचं देऊळ आहे ना, मग कशाला उगाच दुसरीकडे जायचं. आपल्याच देवळात काकडा सुरू करायचा.आमच्या देवात कृष्णाची एक खूप सुंदर मूर्ती आहे. त्याच कृष्णाचा काकडा करायचा असं आजीनं ठरवलं आणि मग त्या वर्षापासून आमच्या घरात काकडा सुरू झाला. माझ्या आजीने सगळी गाणी वगैरे आईला शिकवली, त्यामुळे आजी गेल्यानंतरही आईने काकडा करण्यात खंड पडू दिला नाही. त्यामुळेच लहानपणापासून अनेक वर्षं मी एक नितांतसुंदर अनुभव घेऊ शकलो. 'यथा देहे तथा देवे' म्हणजे नक्की काय, हे त्यामुळेच उमगू लागलं.
मी : 'आई अगं उठवलं का नाहीस? कॄष्णाला उठवताना म्हणतात ती सगळी गाणी गेली की माझी.
आई न बोलताच, 'पंचामृती, स्नान घालू अंबेप्रती, सुवासिक तेले अंगा लावुनी, दहि-दूध-तूप-मधु-शर्करा घेउनी....' असं देवीच्या पंचामृतस्नानाचं गाणं म्हणत पूजेतल्या शंखाकडे बोट दाखवायची. थोडक्यात, 'ऊठ, ऊठ म्हणून तुझ्या नावाने शंख केला, पण तू काही उठला नाहीस' असा त्याचा अर्थ. शंखाच्या आवाजानं न उठणारा मी, घंटेच्या आवाजानं जागा व्हायचो, त्यामुळे देवघराच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या शंकराची, मारुतीची आणि गणपतीची पूजा राहिलेली असायची, ती जबाबदारी माझ्यावर यायची. मी पूजेचं सामान घेऊन बाहेर आलो की जोशी आजी न चुकता माझा गालगुच्चा घ्यायच्या. (मला ते मुळीच आवडायचं नाही. मी सोवळ्यात आहे असं त्यांना कितीतरी वेळा सांगायचो. पण त्या फक्त हसायच्या. आता मला ह्याचं हसू येतं) माझी शंकराची, मारुतीची पूजा उरकतेय, तोवर आई प्रसादाची खिचडी करायला स्वयंपाकघरात गेलेली असायची.
आई नैवेद्याचं ताट घेऊन आली की मग कृष्णमहाराजांच्या विनवण्या करायच्या. दिवाळी जवळ आलेली असल्यामुळे ह्या नैवेद्यात दिवाळीच्या फराळासाठी होणारे पदार्थ एक एक करून हजेरी लावायचे.
'घ्या थोडा उपहार, दयाळा घ्या थोडा उपहार,
पाट रुप्याचा बैसायाला, रांगोळी मनोहार, दयाळा घ्या थोडा उपहार |
करंजी, मोदक, लाडु अनरसा, जिलबीही चवदार, दयाळा |
घिवर, बुंदी, मांडे, चिरोटे, ताक ठेविले गार, दयाळा घ्या थोडा उपहार |
किंवा,
रुसु नको कृष्णा, ये बैस पाटी,
घालीते तुजला रांगोळी मोठी |
भोजनसमयी रुसलासी का गा?
काय हवे ते माग श्रीरंगा,
लाडू, जिलबी, खीरीची वाटी, ही तुजसाठी ||१||
सर्वाहूनी तूझी महिरप थोर,
दोन्ही बाजूला नाचती मोर,
पोपट-मैना, वेलांची दाटी, ही तुजसाठी ||२||
राजीवनेत्रा, सुहास्यगात्रा,
चुकवी माझी संसारयात्रा,
लक्ष्मी विनवी हे जगजेठी ||३||
ही आणि अशी अनेक खूप भावपूर्ण पदं मी ऐकायचो. नुसतं ऐकतच रहावंसं वाटायचं. खरोखरीच, कृष्ण नावाचं एक खोडकर मूल आईला हैराण करतंय, आणि तरीही ती तितक्याच प्रेमानं आणि कधी लटक्या रागानं त्याला समजावतीये असंच त्या गाण्यातून वाटायचं.
समोर आहे ती केवळ मूर्ती नाही, साक्षात कृष्ण आला आहे, आणि मग त्याला मी कुठं ठेवू आणि त्याच्या पूजेसाठी काय काय करू असं झाल्याचा भाव सगळ्याच गाण्यांमधून असायचा.
मला बर्‍याचदा वाटतं, की राम हा वंद्य आहेच, पण त्याच्या मर्यादापुरुषोत्तमत्वामुळे तो तेवढा जवळचा नाही वाटत जेवढा कृष्ण वाटतो.
बघा ना, कृष्णाचं देवत्व कळायला आधी त्याच्या खोड्या पहाव्या लागतात, त्याला उखळाला बांधावाच लागतो, 'माती खाल्लीस?' म्हणून रागे भरावे लागतात, 'खोटं बोलतोस? उघड तोंड' असं धाकात घ्यावं लागतं, आणि मग कुठे तो विश्वरूप दाखवतो. तो त्याचं नाव सार्थ करतो. कृष्ण! जो आकृष्ट करतो, तो कृष्ण.
ह्या काकड्याच्या गाण्याचे शब्द म्हणाल तर ते साधेच, पण त्यातून जीव-शिव, तत्पद-त्वंपद इत्यादी उपनिषदाची भाषा आणि मानवी मनाच्या लक्षणांबद्दलची प्रभावी रूपकं बेमालूमपणे यायची.
'माय मिथ्या ब्रह्मचि सत्य, ऐसे बोलति सद्गुरुनाथ,
उपनिषदी हा सिद्धांत, निजवस्तु करा तुम्हि प्राप्त,
मनि धरू नका काहि शंका, श्रीहरिवर वारा पंखा,
द्या यमपुरीला धोका, श्रीहरिवर वारा पंखा |
बोधाची करुनी दांडी, विषयाची मुरडुन मुंडी,
वासना समूळचि खंडी, हरिदासा कोणि न दंडी,
वहा विठ्ठलप्रेमे बुक्का, श्रीहरिवर वारा पंखा |
भावाची झालर केली, भक्तीची मोती ओविली,
वैराग्याचा वाळा, त्रिगुणाची गुंफण त्याला,
तत्पदे-त्वत्पदांची असिपदी ऐक्यता झाली
गुरुवाचुनि न मिळे शिक्का, श्रीहरिवर वारा पंखा |
ऐसा पंखा जो वारिला, देहबुद्धि-ताप हारिला,
चित्ताचा रुमाल केला, मोहाचा घाम पुसियेला,
हे द्वैत मारुनी टाका, श्रीहरिवर वारा पंखा |
असे सगळे स-गीत उपचार घेऊन झाले की मात्र कृष्ण कुमार-वयात यायचा. यशोदेची गाणी हळू हळू कमी होत राधेची गाणी यायची. बहुतेक ग. दि. मांनी लिहिलेलं हे गाणं माझी आजी म्हणायची,
'घनश्याम नयनी आला, सखे मी काजळ घालू कशाला?' पहिल्या चरणातल्या कल्पनेनेच ऐकणारा नि:शब्द.
मग ती राधा सखीला सांगते, की मी काजळ, मेखला, इ.इ. का नाही घालत. काजळ नाही घालत, कारण माझ्या डोळ्यातच तो घनश्याम आहे. मेखला नाही बांधत कारण त्याचे हात अजून मला कमरेभोवती जाणवतात. आणि माझं संपूर्ण शरीरच रोमांचांनी नटलंय, मी हिरे-माणके वाया कशाला घालवू? आणि ह्या कान्ह्याची मुरलीच इतकी मादक आहे, की तिच्या स्वरांनीच मी सगळा शृंगार केलाय. मग आता मला सांग, मला वेगळं नटायची काय गरज? राधेच्या सखीप्रमाणेच, मीही हे गाणं ऐकताना निरुत्तर व्हायचो.अजूनही होतो. काय कमालीचं गूढ नातं आहे राधा कृष्णाचं. 'सांगा मुकुंद कुणी हा पाहिला' मधले शब्द आठवतात, 'सखे होतो आम्ही विषय विचारी, टाकुन गेला तो गिरिधारी' राधा-कृष्णाबद्दल विचार करताना ते 'विषयविचार' आम्हाला सोडत नाहीत, आणि तो गिरिधारी मात्र आम्हाला टाकून जातो.
मग समोर नसलेला तो गिरिधारी सुखात असेल ना? त्याला कुणाची दृष्ट तर लागणार नाही ना? ही काळजी!
काढु दे दृष्ट गोविंदा,
कुरवाळी मुख हरि माता,
गाईन गानछंदा, पाहुनी नेत्रसुखकंदा |
दिनभरी खोड्या किति करिसी,
लाविसी वेड सकळांसी,
बघु दे तुझ्या वदनारविंदा | काढु दे दृष्ट गोविंदा |
रवि-शशी टकमका मुख पाहती,
सुंदरा, बघुनी तुज दिपती,
हासशी किती मंद-मंद,
काढु दे दृष्ट गोविंदा |
आपल्या लेकराची दृष्ट काढणं हे काम आईचं. त्यामुळेच, आपल्या आराध्य देवाला दृष्ट लागू नये म्हणून येणारी ही अशी कवनं म्हणजे 'श्रवण-कीर्तन-स्मरणादि नवविधा भक्तीपेक्षाही कितीतरी श्रेष्ठ वाटतात.
मग सगळी पूजा यथासांग झाली, की त्या सर्वव्यापी देवाची आरती !
आरति कशी करू गोपाला? ज्याने व्यापियले जगताला?
नीरांजन, दिप कर्पुरवात, तुम्हीच झाला राधाकांत |
तुम्हीच दाता, तुम्हीच त्राता,करुनि अ-कर्ता, जगनिर्मियता |
आता देउन मी-पण, मन्मति,दास करितो मंगल आरति |
आरती संपायची, आरतीच्या वेळी वाजणार्‍या घंटेचा नाद वातावरणात घुमत असायचा, आणि त्या नादाबरोबरच,
'पांडुरंग हरी, वासुदेव हरी, बोला पंढरिनाथ महाराज की जय.
गोपालकृष्णमहाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ' असे जयजयकार उमटायचे!!
हे सगळं होईपर्यंत सात-साडे सात वाजून गेलेले असायचे. मग प्रसाद!
त्या प्रसादाची गोडी अजून जिभेवर रेंगाळते. साधीच खिचडी, मुगाच्या डाळीची. पण आहाहा! ब्रह्मानंद. मग देवाचं खास आवडीचं लोणी, साय-साखर, दही-पोहे हे आलंच.हे सगळंच्या सगळं आई तिच्या 'या' कृष्णाला द्यायची.
खाऊन झालं की मग बाकीचे दिवाळीच्या सुट्टीतले उद्योग सुरू.
गेले ते दिन गेले! आता फक्त त्या प्रतिमा मनाच्या एका हळव्या कोपर्‍यात जपून आहेत.
कुठे कुणाच्या बोलण्यात/ लिखाणात 'कृष्ण' हा नुसता शब्द जरी आला, तरी त्या सगळ्या प्रतिमांचा एक मोरपिशी रंग मनावर चढतो. त्या रंगात कुठे चमक असते, कुठे हळुवारपणा असतो, तर कुठे थोडा काळेपणाही....!
'उगाच मोठे झालो' असं वाटायला लागतं. पण डोळे पाणावायच्या आत लक्ष दुसरीकडे वळवावंच लागतं.
कारण चुकून कुणी बघितलंच, तर त्यांना काय सांगायचं? कुठला कॄष्ण दाखवायचा?

आनंदी-आनंद गडे !!

आनंदी-आनंद गडे
इकडे, तिकडे, चोहिकडे.
वरती-खाली मोद भरे;
वायुसंगे मोद फिरे,
नभांत भरला,
दिशांत फिरला,
जगांत उरला,
मोद विहरतो चोहिंकडे;
आनंदी-आनंद गडे

सूर्यकिरण सोनेरी हे
कौमुदि ही हसते आहे;
खुलली संध्या प्रेमानें,
आनंदे गाते गाणे;
मेघ रंगले,
चित्त दंगलें,
गान स्फुरलें,
इकडे,तिकडे, चोहिंकडे
आनंदी-आनंद गडे!

नीलनभीं नक्षत्र कसें
डोकावुनि हें पाहतसे;
कुणास बघते? मोदाला!
मोद भेटला का त्याला?
तयामधें तो
सदैव वसतो,
सुखे विहरतो,
इकडे,तिकडे, चोहिंकडे
आनंदी-आनंद गडे!

वाहति निर्झर मंदगति,
डोलति लतिका वृक्षतती,
पक्षि मनोहर कूजित रे,
कोणाला गातात बरे?
कमल विकसलें,
भ्रमर गुंगले,
डोलत वदले-
इकडे,तिकडे, चोहिंकडे
आनंदी-आनंद गडे!

स्वार्थाच्या बाजारांत
किती पामरें रडतात;
त्यांना मोद कसा मिळतो?
सोडुनि स्वार्था तो जातो-
द्वेष संपला,
मत्सर गेला,
आतां उरला
इकडे,तिकडे, चोहिंकडे
आनंदी-आनंद गडे!

नदीवर धुणे धुणाऱ्या बायका !!

कितीतरी बायका नदीवर धुणे धुवायला 
बादल्या भरून भरून यायच्या  
सु SSसु SS करीत धूत बसायच्या 
तो काळच तसा होता 
सासुरवाशिणीचा अड्डा जमायला 
तेवढाच निव्वळ क्षण होता ...!
घरच्या सुख दुखाचे  रडगाणे गायला 
नदीकाठ किती मस्त होता 
तो नदीकाठ सुंदर सुरेख होता 
अगदी बहरून जायचा 
ह्या सुंदर फुलांनी  

कशी बांधीव नदी होती 
छान  पायर्या पायार्या होत्या 
पायर्यावर कपडे आपटत बसायच्या 
ह्या सासुरवाशिणी ...!!
डबल बी साबणाचा मस्त फेस वाहत राहायचा 
बघायला बरे नि बरे वाटायचे 
त्याचा गंध आसमंतात फिरायचा 
एखादे लवथवते  तारुण्य डोळे खेचून घ्यायचे 
नागासारखा साबणाचा फेस नदीवर तरंगताना 
किती छान वाटायचे ...!!
डोळे त्या पाण्यात हरवून जायचे 
त्या थंड थंड हवेत मन विरघळून जायचे 

कधी दिवाळीच्या दरम्यान गणिताचा पेपर देऊन 
नदीवरच्या   सांडव्यावरून जायचो 
तेह्वा  बायका सू SS  सु SS करीत धुणे धूत बसायच्या 
माझ्या गणिताच्या पेपरमध्ये  सगळा फेस नि फेस असायचा 
प्रमेय नि रायडर मला नागासारखा वाटायचा 

माझे दुख एवढे मोठे नि ह्या आपल्या सुSS  सुSS करीत बसायच्या 
गणितापेक्षा ह्यांचे दुख मोठे असेल काहो  ?
ह्या मला नेहमी सुखादुखाच्या  पार दिसायच्या 

कितीतरी बायका नदीवर धुणे धुवायला 
बादल्या भरून भरून  
नि सुSS  सु SS करीत धूत बसायच्या 
माझा गणिताचा पेपर ...!!
नि ह्याचे चुबुक चुबुक धुणे 
कसे सोपे असते जगणे ......
नि कसे अवघड होऊन जाते जगणे ..
कुणास ठाऊक काय खरे नि काय खोटे .....???? 

Tuesday, December 7, 2010

Fataka!!

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको
नास्तिकपणि तुं शिरुनि जनाचा बोल आपणा घेउ नको
आल्या अतिथा मुठभर द्याया मागेपुढती पाहु नको
मायबापांवर रुसूं नको
दुर्मुखलेला असूं नकोFatak
व्यवहारमधि फसूं नको
कधी रिकामा बसू नको
परी उलाढाली भलभलत्या, पोटासाठी करु नको ॥ १ ॥

वर्म काढुनी शरमायाला, उणे कुणाला बोलुं नको
बुडवाया दुसऱ्याचा ठेवा, करुनी हेवा, झटू नको
मी मोठा शाहणा, धनाढ्यहि, गर्वभार हा वाहू नको
एकाहून चढ एक जगामंधि, थोरपणाला मिरवू नको
हिमायतीच्या बळे गरिबगुरीबाला तू गुरकावू नको
दो दिवसाची जाइल सत्ता, अपेश माथा घेउ नको
विडा पैजेचा उचलु नको
उणी कुणाचे डुलवु नको
उगिच भीक तूं मागू नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामिन राहू नको ॥ २ ॥

उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करु नको
वरी खुशामत शाहण्याची परि मूर्खाची ती मैत्री नको
कष्टाची बरी भाजिभाकरी, तूपसाखरे चोरू नको
दिली स्थिती देवाने तीतच मानी सुख, कधिं विटू नको
असल्या गाठी धनसंचय, कर सत्कार्यी व्यय, हटू नको
आता तुज गुज गोष्ट सांगतो, सत्कर्मा तूं टाकु नको
सुविचारा कातरू नको
सत्संगत अंतरू नको
द्वैताला अनुसरू नको
हरिभजना विस्मरू नको
सत्कीर्ती नौबतिचा डंका गाजे मग शंकाच नको ॥ ३ ॥

कवी - अनंत फंदी

प्रेम कर भिल्लासारखं...

पुरे झाले चंद्र-सुर्य, पुरे झाल्या तारा,
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा राहा,
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा.

शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत,
जास्तीत-जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?

म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं

शब्दांच्या या धुक्यामधे अडकु नकोस,
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस

उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं!


कवी - कुसुमाग्रज

जोगिया

कोन्यात झोपली सतार, सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग,
दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली
तबकात राहीले देठ, लवंगा, साली

झूंबरी निळ्या दीपात ताठली वीज
का तुला कंचनी, अजुनी नाही नीज?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलूनी तू दार दडपिले पाठी

हळूवार नखलीशी पुन: मुलायम पान
निरखीशी कुसर वर कलती करुनी मान
गुणगुणसी काय ते? गौर नितळ तव कंठी
स्वरवेल थरथरे, फूल उमलले ओठी.

साधता विड्याचा घाट उमटली तान
वर लवंग ठसता होसी कशी बेभान?
चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने
"का नीर लोचनी आज तुझ्या गं मैने?"

त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग
हालले, साधला भावस्वरांचा योग
घमघमे जोगिया दवांत भिजुनी गाता
पाण्य़ात तरंगे अभंग वेडी गाथा

मी देह विकुनीया मागून घेते मोल
जगविते प्राण हे ओपुनीया 'अनमोल'
रक्तांत रुजविल्या भांगेच्या मी बागा
ना पवित्र, देही तिळाएवढी जागा

शोधीत एकदा घटकेचा विश्राम
भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम
सावळा तरुण तो खराच गं वनमाली
लाविते पान...तो निघून गेला खाली

अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव
पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
'मम प्रीति आहे जडली तुजवर राणी'

नीतिचा उघडीला खुला जिथे व्यापार
बावळां तिथें हा इष्कां गणितो प्यार;
हासुनी म्हणाले, 'दाम वाढवा थोडा...
या पुन्हा, पान घ्या...' निघून गेला वेडा!

राहिलें चुन्याचे बोट, थांबला हात
जाणिली नाही मी थोर तयाची प्रीत
पुन:पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला
तो कशास येईल भलत्या व्यापाराला?

तो हाच दिवस, हीच तिथी, ही रात
ही अशीच होत्यें बसलें परि रतिक्लांत
वळुनी न पाहतां, कापित अंधाराला
तो तारा तुटतो - तसा खालती गेला

हा विडा घडवुनी करितें त्याचे ध्यान
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;
ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगे
वर्षात एकदा असा ''जोगिया' रंगे


कवी - ग. दि. मा