Thursday, December 16, 2010

Dombivali Fast...

चित्र…..
माती……….
माती, माती, त्यावर शेणाने सारवुन, त्यावर रांगोळी, चित्र असं होतं.
मग तिथे डाम्बर टाकुन सुरु झालं हे सग्ळ हव्यास…..
हव्यास जडला, अधिक जास्तीच हव्यास आंगण वावर पूरेना,
मग नौकरी धंदे सुरु झाले नौकरीत पगार पूरेना,
धंद्यात नाफा पूरेना मग तो मिळ्वणं सुरु झाल पगार वाढी साथी संप, दमदाट्या, मोर्चे नाफा वाढवण्यासाठी खोटेपणा, चिरिमिरी, चोरी शेवाळ वाढतच गेलं दलदलीत फसत गेलं सालं कमळ.
छान लिहायचो चित्र काढायचो पण मग पैसे हवेत स्थिरता म्हणून बेंकेत बी.कोम पर्यन्त एवढ शिकलो, एवढ वाचलं पण पुढे काय तर लेजर भरा, परिपत्रकं लिहा जेवढं नाहायलो आधी तेवढच कोरडं होत गेलो थेंब सुद्धा उरला नही……… ओलाव्याचा….दाखवायला सुद्धा
एका रेशेत उभे रहा….
एका रेशेत लिहा….
एका दमात पद्वी मिळवा…
एका वर्शात कायम व्हा…..
एका इच्छे सठी लग्न करा…
आणि ती दुहेरी करण्यासाठी….मुलं जन्माला घाला एक एक करुन अनेक गो करा आणि मग एकदा….. मरा…
म्हणजे एका कडून एकी कदे एकटं यायचं एकटं जायचं
आणि मधे हा….साला जीवघेणा प्रवास….सालं
आणि मग हा साला प्रवास, प्रवास सरळ नको का?…..मनसारखां नको का?
अरे ठरवल न सग्ळ्यानी की नियम करायचे, पाळायचे? मग ओढायची घाई का? सगळ्यानि मिळून खायचं की सागळ्यांच आपणच खायच?
ठरवा शिस्त नको, मग व्हा बेशिस्त व्हा लाज सोदायची तर मग सगळ्यानी सोदा…… एकट्यानी कशाला? एकट्याला कशाला ते ओझं? जगू आणि जगू द्या हा जर नियम नको असेल तर मग सगळ्यानी मिळून ठराव करा आणि म्हणा…
मारू आणि मरुया….सगळ्यान मारू संपवून ताकू हे सगळ आणि… सांगु त्या विधात्याला….. नाही आवडला तुझा खेळ…… नाही आवडला मला तुझा खेळ
I undersigned …….. Madhav Apte
Making this declaration at
due to my own philosophies
I am not eligible to live on this planet
so please take away my services
and I don’t expect any payment from you… I don’t
infact I would like to give all dues on my accounting
so please lord…. god
and I am enclosing my body with my soul…..intact with this declaration
so please accept this and relieve me at earliest…. please
Thanking you…..your faithfully

Wednesday, December 15, 2010

हायब्रिड जमाना

साऱ्‍या दुनियेचं हायब्रिडिंग झालंय. नवनव्या संकरित बियाण्यांपासून उपजलेली निसत्व पिके खाऊन शरीर पोकळ बनलेय. धान्यांच्या बिजापासून ते स्त्री-पुरुष बिजापर्यँत सर्वच ठिकाणी संकरित जग विस्तारलंय.
पूर्वीची माणसं ऐटीत जगायची, हसता हसता गचकायची, कळायचंसुद्धा नाही. आता मरणाचंही हायब्रिडिंग होत असतं! आजकाल सहज, सुखनैव मृत्यु येतच नाही. किमान दोन दिवस तरी कृत्रिम श्वासावर मेलेल्या म्हाताऱ्‍यांना ताटकळत ठेवतात. (पुरेसं बिल वसूल झाले की मगच डेथ डिक्लिअर करतात!)
जगणेसुद्धा संकरितच म्हणायचे. कारण गर्भ रहावा म्हणून गोळ्या, तो टिकावा म्हणून इंजेक्शने, सुखरूप प्रसूतिसाठी अनेक उपचार सुरू असतात. (अखेर सिझेरियनच होते हा भाग सोडून द्या.) बाळाच्या जन्मापासूनच रोगप्रतिबंधक लशींचा मारा जो सुरू होतो, तो थेट म्हातारपणापर्यँत गोळ्या इंजक्शने चालूच...
पूर्वीच्या धडधाकट बायका आदल्या दिवशी कणाकणा काम करून दुसऱ्‍या दिवशी दणादणा कळा देत मोकळ्या व्हायच्या. अंधाऱ्‍या रात्री, ऊसाच्या फडात, बैलगाडीतच बाळंत झालेल्या अनेक म्हाताऱ्‍या कोताऱ्‍या आजही त्यांच्या सोशिकतेचा गौरव सांगतांना हरखून गेलेल्या आढळतील. ही झाली महिलांची गोष्ट.
हायब्रिड पुरुषांबाबत तर बोलायलाच नको. त्यांचे शरीर म्हणजे चव ना चोथा झाले आहे. केवळ हँडसम दिसणे म्हणजे पुरुषार्थ नव्हे. पूर्वीचे तरूण बलोपासक असत. चारशे पाचशे जोरबैठका मारत, दोन चार लिटर दूध पित. आत्ताची पोरं पाच पंचविस जोरातच बेजार होतात, अंथरूण धरतात, पावशेर दूधही ह्यांना पचत नाही. पचणार तरी कसे म्हणा? कारण तेही संकरित जनावरांचेच असते किंवा म्हशीला/गाईला ऑक्सिटोसीन इंजेक्शन टोचून ओरबाडलेले असते. तापवलेलं दूधच जिथे आपल्याला पचवता येत नाही तिथे निरसं दूध काय सोसणार?
हायब्रिडच्या धान्यातून फक्त भरघोस उत्पन्न मिळतं, सकसता नाही. संकरित बियाण्यांमध्ये अधिक उत्पादनासाठी जनुकिय बदल केलेले असतात. त्यामुळे त्यातून फार काही उत्कृष्ट मूल्ये प्राप्त होतील ही अपेक्षा न ठेवलेलीच बरी. मूळ बियाणे आता अस्तित्वातच नाहीत. त्यामुळे मूळासारखी दणकट शक्ति असलेली मूळ माणसंही दुरापास्त झालीत. नेहमी नेहमी हे हायब्रिड धान्य खाऊन बहुतेकांचा शक्तिपात होतोय. हायब्रिड धान्य बियाणे म्हणून वापरता येत नाही. कारण ती शक्तीच त्यामध्ये नसते. असे वांझोटे अन्न खावून मानवातील नपुंसकत्व वाढलं आहे, हे पेपरातील पानभरून येणाऱ्‍या यौनशक्तिवर्धक औषधांच्या जाहिरातींमुळे लक्षात येईलच.
आणखीही खूप काही सांगता येईल. हायब्रिड जमान्यातील लोक जास्त वर्षे जगत असली तरी त्या रडत खडत जगण्याला अर्थ उरला नाहीये. दणकून खाल्लं तर पचत नाही. कणकून काम केलं तर सोसत नाही. गादीवरच जिथे झोप येत नाही, तिथे दगड उशाला घेऊन आकाश पांघरण्याची कृती म्हणजे कादंबरीय स्वप्नेच ठरतात.
जगण्यातला, वागण्यातला अन् बोलण्यातलाही अस्सलपणा गायब होऊन उरलाय केवळ हायब्रिडपणा!
इतकेच काय तर लेखन क्षेत्रातसुद्धा संकरित भाषा, वाक्ये, शब्द घुसडले गेले आहेत. कुठे ती आठशे पानी कादंबरी लिहिणारी मुरब्बी लेखक मंडळी? अन् कुठे आजकालची चार पाच पानांतच का कू करणारी संकरित रब्बी हंगामाची लेखकू मंडळी!
एकूण काय तर सगळाच हायब्रिड जमाना आलाय बघा...

मराठीमायाच्या बुरुजावरून...

मराठीमायाच्या बुरुजावरुन...

माझ्या घरावर माझे प्रेम आहे, माझ्या गल्ली - गावावर माझे प्रेम आहे. मला माझ्या राज्य आणि देशाबद्दल प्रेम आणि अभिमान आहे. अशी 'वसुधैव कुटुंबकम' माझी भावना आहे. या भावनेची मी जेव्हा वास्तवाशी तुलना करतो. तेव्हा माझं मन आतून आक्रंदन करत कुढत राहतं. मी हे सगळं द्वंद्व जगत राहतो आणि उघडेपणे 'जय महाराष्ट्रा' चा घोष करत राहतो.
रस्त्याने माझी गाडी खाचखळग्यातून जात असते. मी वर्तमानपत्रांतून शांघाय व्हायची स्वप्नं पाहत राहतो. (ज्यांना शांघायची स्वप्नं दाखविली जातात त्यापैकी ९९ टक्के जनता शांघाय पाहू शकत नाही किंवा त्यांना शांघायबद्दल माहिती नसते म्हणून या बाता खपतात)खिडकीतून बाहेर पाहताना रेशनसाठी व सार्वजनिक नळावरती लागलेल्या भर उन्हातील रांगा पाहतो व माझ्या गाडीतील एअरकंडीशनला धन्यवाद देतो. एफएमवरती मॉलमध्ये चाललेल्या 'सेल'ची आमिषे ऐकत असतो तर कधी तर कधी उगाच उठवलेल्या गॉसिप, टीआरपी वाढवण्यासाठी पेटवलेले रान ऐकत असतो. मागची गाडी कर्कश्शपणे पुढे जाण्यासाठी हॉर्न वाजवत असते. मला कळत नाही, पुढे एवढा ट्रॅफिक असताना हा माझ्या गाडीवरून उडत कसा पुढे जाणार आहे? बाजूला सायलेंट झोनचा बोर्ड अवाक होऊन पाहत असतो. त्यातच रिक्षा आपल्या क्षमतेचा विचार न करता रेटत चाललेली असते.
एक तरुण आपल्या मैत्रिणीवर छाप पाडण्यासाठी नागमोडी पद्धतीने हेल्मेट न घालता  मोटरसायकलवर सुसाट चाललेला असतो. दोन ट्रक समांतर धावत एकमेकांवर कुरघोडी करत असतात. माझी नजर पेपरमधल्या बातमीवर खिळलेली असते - ब्लॅकबेरी टेक्नॉलॉजीने ट्रॅफिकवरती नियंत्रण. "
चौकात बुगुबुगुच्या आवाजाकडे माझे लक्ष जाते. तीन नागडी उघडी मुले व चौथे पोटात असलेली आई हातातील बुगुबुगुच्या आवाजावर कसरती करत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी लाचार आई मुलांना गर्दीत हात पसरवायला भाग पाडत असते. पेपरमध्ये बातमी असते. - गेल्या वर्षभरात महिला व बाल कल्याण योजनेवरी १०० कोटी खर्च.
गाडी शहरातील मॉल संस्कृती व उंच बिल्डींग आणि विदारक झोपडपट्टीला मागे टाकून शहरापासून ३० -४० किलोमीटर असते. गावातील महिला डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी वणवण करताना दिसतात. पेपरमध्ये बातमी असते. गावे टँकरमुक्त, अमुक एक जल व पाणी पुरवठा योजनेत ५० कोटींचा भ्रष्टाचार. बाजूच्या चहाच्या टपरीवरती दोन लहान मुलं अंगात फक्त बनियन घालून भांडी विसळताना व साफ करताना दिसतात. पेपरमध्ये बातमी असते. - बाल मजूर कायद्याची कठोर व काटेकोर अंमलबजावणी. पुढच्या वळणावर उघड्यावर शिजवलेल्या खिचडीचा आस्वाद मुले उघड्यावर घेत होती. पेपरमध्ये बातमी होती. सरकारच्या अल्पोपहार खिचडी योजनेला चांगला प्रतिसाद. पान उलटतो तोच कोपऱ्यात बातमी '२० मुले सार्वजनिक रुग्णालयात. अल्पोपहार योजनेतील खिचडीमुळे विषबाधा.
एफएम रेडिओवर बातम्या सुरू असतात. महिला अत्याचाराविरुद्ध कडक कायद्याची अंमलबजावणी. दोषींवर कठोर कारवाई, पेपरमध्ये पोलीस ठाण्यात स्त्रीवर बलात्कार, गाडीत बलात्कार, महिलेचे अपहरण याबद्दलची रकानेच्या रकाने भरून वर्णने असतात.
शिणलेल्या मनाला ग्लानी आल्यासारखं झालं. ग्लानीतच चक्क स्वप्नवत दिसायला लागलं. स्वप्नवत दिसायला लागलं. स्वच्छ, सुंदर, चकचकीत रस्त्यावरून माझी गाडी धावतेय, रस्त्यावर अजिबात गर्द्दी नाही, ठिकठिकाणी चौक किंवा रहदारीची वर्तुळे, दुतर्फा हिरवी डेरेदार झाडे, गाड्या हॉर्न अजिबात न वाजवता शिस्तीत चालल्या आहेत. माझी गाडी स्वच्छ, सुंदर समुद्र किनारी कोकणात गेली आहे. पर्यटनाच्या एवढ्या सोयी आणि पर्याय बघून इंद्र नगरीत पोहचल्यासारखा मी आनंदित झालोय. कुठेही रांगा नाहीत, सगळीकडे शिस्त, बहुमजली इमारती व घरे दिसत आहेत. मागेल त्याला काम मिळत आहे. कुठेही भांडण व वाद नाहीत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर सु़खसमाधान ओसंडून वाहत आहे. कुणाच्याच चेहऱ्यावर सुखसमाधान ओसंडून वाहत आहे. कुणाच्याच चेहऱ्यावर चिंतेची छटा नाही. सगळीकडे 'सुजलाम सुफलाम' असे चित्र आहे. दुसरी राज्ये व राष्ट्रे आपण पुढील २० वर्षात महाराष्ट्रासारखी प्रगती करुया म्हणून जनतेला उदाहरणे देत आहेत. अशा स्वप्नवत अवस्थेतच मी माझ्या मुक्काम असलेल्या हॉटेलमध्ये कधी पोहोचलो ते कळलेच नाही. संध्याकाळसुद्धा अशा स्वप्नवत अवस्थेत गेली. प्रवासामुळे थकल्याने मी गाढ झोपून गेलो. खडबडून जागा झालो तेव्हा सर्व अंग घामाने डबडबलेले आहे. मी वेटरसाठी बेल वाजवतो, बेल वाजत नाही म्हणून हाका मारतो, वेटर आल्यावर मी त्याच्यावर ओरडतो, "अहो, एसी लावता येत नाही तर साधा पंखा चालू ठेवता येत नाही का? वेटर उत्त्तरतो. "सांगणारा कोणाला, इथे आठ आठ तास लोडशेडींग असते, वेळेवरती जनरेटरसाठी डि़झेल मिळत नाही आणि साहेब, आंघोळीला पाणी नाही. इथे पाण्याची तीव्र टंचाई आहे, आणि तोच बाहेर १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त्त मुले 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, ' या गाण्याचा सराव करताना दिसत आहे.
आता मी स्वतःशीच विचार करू लागलोय. आज पन्नास वर्षे झाली तरी मराठीसाठी भांडायला लागतंय. साधे सरळ गणित आहे, मातृभाषेत सगळ्या गोष्टी, व्यवहार चालत असतील  तर ते कळायला खूपच सोपे जाते. भाषेचं एवढं साधं गणित असूनही त्याभोवती सोयीचे राजकारण  व राडे! राजाकीय नेते (सत्त्त्ताधारी आणि सत्त्तेवर नसलेले  आपल्या पक्षाचा व स्वत:च्या स्वार्थाचा मुद्दा रेटत असतात. विरोधकांनी सरकारचा केलेला अमुक तमुक निषेध म्हणजे काय तर पेपरमध्ये आलेली बातमी! प्रत्यक्षात काय? राजकीय परिपक्वता व समाजाची नेमकी काय गरज आहे. हे जाणून न घेता व अशिक्षितांच्या मतांवर निवडून येऊन लोकप्रतिनिधी म्हणून लोकशाहीचा पाहिजे तसा वापर करणे हेच यांचं राज्य करण्याच कौशल्य! आज मिडीया जेवढ्या बेजबाबदारपणे वागतो, लिहितो, ते बघितलं की त्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ का म्हणायचं, याचा प्रश्न पडतो. इलेक्ट्रॉनिक माध्यमे टीआरपी व ब्रेकींग न्यूजच्या मागे असल्यामुळे संजय दत्त्तची जेलमधून सुटका, अमुक एकाने एवढ्या करोडला फसवले व जामिनावर सुटका, आयेशा - शोएब सानिया लग्न, रियालिटी शोज यामध्ये अडकली आहेत व अडकून राहणार आहेत. त्यांनी समाजातील खऱ्या गोष्टींचा शोध घेऊन समाजाभिमुख बातम्या दिल्या पाहिजेत. माणसाच्या विस्मरण शक्तीवर विश्वास ठेऊन टीआरपीसाठी वापर न करता एखाद्या घटनेचा पूर्ण पाठपुरावा करून बातम्या दिल्या पाहिजेत. सतत रियालिटी शोज वर भरणा न देता समाज प्रबोधनासाठी कार्यक्रम हवेत. आम्ही हे बदलेल म्हणून आशेवर जगत असतो. इथे प्रकर्षाने ना. स. इनामदारांच्या 'शहेनशहा' मधील उताऱ्याची आठवण होते. हे वर्णन कादंबरीत वेगळ्या अर्थाने आहे. परंतु सद्यस्थितीला ते तंतोतंत लागू पडते.
''जेव्हा या जिंदगीचा आम्ही विचार करतो तेव्हा आयुष्य म्हणजे एक प्रचंड फसवणूक आहे असं वाटू लागतं आमच्या दिलात खुदानं जी आशा ठेवली आहे तीच आमची फसवणूक करते. आशेच्या आधारानं माणूस स्वतःचीच फसवणूक करीत आहोत. त्याला उगीचच वाटत असतं की आजचा दिवस वाईट गेला तरी उद्या तरी निदान आपल्या मनातील आशा सफल झाल्याचे पहायला मिळेल, पण उद्याचा दिवस मावळतो ती वेगळी निराशा पदरात टाकूनच.... "

राखी अमावस्या!

 






राखी पौर्णिमा जवळ आली, की छातीत धडकी भरायचे दिवस आता सरले आहेत. तरीही राखीपौर्णिमेच्या निमित्तानं जुन्या जखमांवरच्या खपल्या निघतात आणि आमचा अश्वत्थामा पुन्हा गत आठवणींच्या भोवऱ्यात भिरभिरत राहतो...
शाळेच्या आवाराच्या तटबंदीपेक्षा जास्त भक्कम तटबंदी त्या वेळी आमच्या मनांची होती. मुलीकडे पाहणं म्हणजे "शांतम् पापम्' म्हणायचे ते दिवस. त्यातून आम्ही रत्नागिरीसारख्या छोट्या शहरातल्या सर्वांत "सुसंस्कृत' शाळेत, सर्वांत हुशार समजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्गातले सहाध्यायी. सर्व जगाच्या संस्कृतीरक्षणाची जबाबदारी आमच्यावरच! "मैत्रीण' असणं वगैरे गोष्टी वर्ज्यच होत्या, साधं वर्गातल्या मुलीशी बोलणंही दुरापास्त होतं. शाळेच्या व्हरांड्यात मुलं-मुली घोळक्यानं गप्पा मारताहेत, एकत्र नाटकं-सिनेमे बघताहेत, टाळ्या देऊन खिदळताहेत, अशी दृश्यं पाहिली, की आपण शाळेत भोगलेल्या "नरकयातना' नको नको म्हणताना आठवतात.
आम्ही सातवीच्या वर्गात होतो. आमचा वर्ग जाम दंगा करायचा, त्यामुळे शिक्षा म्हणून आम्हाला एका बेंचवर एक मुलगा-एक मुलगी असं बसवण्यात आलं होतं. केवढा घोर अपमान, अन्याय वाटला होता आम्हाला तेव्हा! तेव्हा आम्ही एकमेकांशी घेतलेली खुन्नस, बेंचवर आखून घेतलेली हद्द वगैरे गोष्टी ब्लॉगवर लिहिल्या आहेतच.
वर्गात मुला-मुलींच्या जोड्या लावायची फॅशन होती. कुणी मुलगा एखाद्या मुलीच्या जागेवर बसला, की त्याला तिच्या नावानं चिडवलं जायचं. किंवा साधारणपणे मुलग्यांमधला हुशार क्रमांक एक आणि मुलींमधली हुशार क्र. 1, अशा क्रमानेही जोड्या लागायच्या. एकमेकांच्या नावांमधली सामायिक अक्षरं शोधून त्यानुसार जोड्या लावल्या जायच्या. शेजारी पाजारी किंवा एकाच भागात राहणाऱ्या मुलामुलींच्या जोड्या लावायला तर सोप्पंच होतं. एकाच भागात राहत असलो, तरी शाळेत एकत्र वगैरे जाण्याची सोयच नव्हती. साधं एखाद्या मुलीच्या मागून गेलो, तरी हा मुलगा आपल्या मागे लागलाय की काय, असा संशय या मुलींना यायचा. "दहशतवाद' त्या काळीही फोफावलेला होताच!
अशा चिडवाचिडवीला वैतागून मग त्यातून सहीसलामत बाहेर पडण्याचा सोपा मार्ग म्हणजे राखीपौर्णिमेचा "पवित्र' सण होता. आपल्याला ज्या नावाने चिडवलं जातं, त्या मुलाला राखी बांधली, की भानगडच मिटून जायची. मग कोण कशाला धाडस करतंय चिडवायचं? असे आगंतुक "भाऊराया' बनायला काही लोक अगदी उतावीळ असायचे, तर काहींच्या हृदयाची अगदी शंभर शकलं व्हायची.
वर्गातून गायब होऊन किंवा आवडत्या मुलीला टाळून या दहशतवादातून सुटण्याचा मार्ग होता. पण शाळेत होणाऱ्या सामूहिक रक्षाबंधनाचं काय? संघाच्या माध्यमातून शाळेत येणाऱ्या गोंड्याच्या राख्या प्रत्येकाच्या हातावर दिसल्याच पाहिजेत, असा शाळेचा दंडक होता. जणू सगळ्या मुलींचा संभाव्य तेजोभंग टाळण्याचा घाऊक मक्ताच शाळेने घेऊन टाकला होता! जेवढी मुलं, तेवढ्या राख्या वर्गात मागवल्या जायच्या आणि मग प्रत्येकाला समोर बोलावून एकेका मुलीनं त्याच्या प्रेमभावनांच्या सामूहिक कत्तलीचा साग्रसंगीत सोहळा पार पडायचा! तरीही शक्यतो आपली आवडती मुलगी आपल्याला राखी बांधायला येऊ नये, म्हणून मुलं जागांची अदलाबदल, बेंचखाली दडून राहणं, वगैरे वगैरे उपद्व्याप करायचे. कश्शाकश्शाचा म्हणून निभाव लागायचा नाही.
अर्थात, राखी बांधून घेण्यातही एक गंमत होतीच म्हणा! आपल्याला मुलगी राखी बांधतेय, म्हणजे इतरांपेक्षा जास्त भाव देतेय, असाही एक सर्वमान्य समज होता. हातावर राख्यांची संख्या जेवढी जास्त, तेवढा तो मुलगा मुलींचा लाडका, असंही एक गृहीतक होतं. त्यातून मुलीच्या नाजूक हातातून राखी बांधून घेताना होणारा अलगद स्पर्शही त्या वयात मनाला मोहरून टाकायचा, ही गोष्ट अलाहिदा! शिंगं फुटली, तशी राख्यांची जागा "फ्रेंडशिप बॅंड'नि घेतली. रस्तोरस्ती, गल्लोगल्ली त्यांचेही पेव फुटायच्या आतच आम्ही कॉलेजातून बाहेर पडलो होतो!
मनगटांतील राख्यांची आणि अपवादात्मक परिस्थितीत फ्रेंडशिप बॅंडची सद्दी संपली आणि लग्नाच्या वेळी हातात बांधलेला हळकुंडाचा दोरा हातात बांधला. दुसऱ्या दिवशी तो उतरवला असला, तरी आयुष्यभराची बेडी हातात पडली ती पडलीच!

थोबाडपुस्तक...

 

परवाच्या रविवारी दुपारी निवांत वेळ होता; म्हणून 'थोबाडपुस्तक' उघडलं आणि...
अरे! दचकलात ना?
हम्म्म्म... सहाजिक आहे.
'थोबाडपुस्तक' हा नेहमीसारखा शुद्ध आणि पारंपारिक मराठीत बोलायचा विषयच नाही; तर तो बोली मराठीत मांडण्याचा एक 'टॉपिक' आहे.

... तर ... परवाच्या 'सन्डे आफ्टरनून 'ला 'टाईमपास' म्हणून 'फेसबुक'(!!!) 'लॉगिन' केलं आणि 'वॉल' वरचे 'पोस्ट्स' बघत बसलो होतो. त्यापैकी काहींवर मी माझ्या (उपरोधक) 'कमेंट्स' टाकल्या, तर काही 'लाईक' केल्या. वास्तविक माझ्या 'फ्रेंड्सलिस्ट' मध्ये अडीचशे जण 'एडेड' आहेत. त्यामुळे 'फेसबुक'वर 'आक्टिव' रहायला मला पुरेशी कारणं 'अव्हेलेबल' असतात. नाही; कसंय... 'फेसबुक' हा जेवढा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तेवढाच तो करमणुकीचाही आहे.
उदाहरणार्थ, श्रीकांतने काल 'आय एम बोअर्ड' असं जाहीर केलं. आता यात मितालीला आवडण्यासारखं काय होतं कुणास ठाऊक; पण तिला ते 'लाईक' झालं खरं!

'फेसबुक'चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाची हालचाल... माफ करा... 'आक्टिविटी' अगदी तारीख-वेळेसकट नोंदवली जाते. त्यामुळे, दोन वर्षांची लहान मुलगी असणाऱ्या कमलेशने त्याचं स्व:चं 'प्रोफाईल' दहा तासांपूर्वी जेव्हा 'अप(टु)डेट' केलं, तेव्हा मला आलेलं 'नोटीफिकेशन' काहीसं असं होतं...
Kamlesh is married.
10 hours ago
माझं हसून हसून पोट दुखण्याची वेळ आली होती.

माझं हसून होतं न होतं, तेवढ्यात मला एक 'पिंग' आला. उजव्याबाजुच्या 'कॉर्नर'मध्ये एक 'पॉपप' दिसायला लागला. क्षमा नावाच्या माझ्या शाळेतल्या वर्गमैत्रिणीने मला 'ऑनलाईन' पाहून 'च्याट' करण्यासाठी 'हाय' केलं होतं. आता..., हा 'फेसबुक'चा खराखुरा फायदा आहे. इतर कोणत्याही प्रकारे संपर्कात नसलेल्या जुन्या मित्र-मैत्रिणींना शोधून काढण्याचं खात्रीलायक साधन म्हणजे 'फेसबुक'!
... तर, क्षमाच्या 'हाय'ला मीही पटकन 'हेलो'ने 'रिप्लाय' दिला. इथे क्षमाने आपलं 'डिस्प्ले नेम' 'क्षमा... To forgive' असं ठेवलं होतं, ही नमूद करण्यासारखी गोष्ट आहे.
'हायऱ्हेलो' नंतर रंगलेलं आमचं संभाषण काहीसं अशा प्रकारचं होतं...
क्षमा    : वॉंत्सप???
मी       : नथिंग स्पेशल. तू सांग.
क्षमा    : सेम हिअर. टी.व्ही., 'फेसबुक' आणि थोडंफार 'कुकिंग' यातच फार 'बिझी' असते रे.
मी       : चांगलंय! एकंदरीत तुझं चांगलं चाललंय!
             (या माझ्या खोचक शेऱ्यावर तिनं नुसताच एक 'स्माईली' पाठवला.)
मी       : मग? शाळेतल्या इतर कोणाशी 'टच'मधे आहेस का?
क्षमा    : हो. स्वाती, प्रणिता, अमित, प्रकाश आणि कोण-कोण आहेत माझ्या 'फ्रेंड्सलिस्ट'मधे. 'हायऱ्हेलो' होतच असतं.
मी       : गुड...
क्षमा    : वॉट एल्स? अमेरिका काय म्हणते?
मी       : अमेरिका ठीक. सध्या थंडी पडायला लागलीये.
क्षमा    : चल! यु आर सो नॉटी!!!
मी       : (गप्प)!!!
             (हे वाचून मी त्या थंडीपेक्षाही गार पडलो. काय 'रिप्लाय' द्यावा, हेच मला सुचत नव्हतं! एवढ्यात तिचाच खुलासा आला...)
क्षमा    : सॉरी! राँग विंडो!
             (अजूनही माझा अडकलेला अवंढा गळ्यातच होता. म्हणजे, ही बया इतर कोणाशीतरी (अ)'च्याट' करत होती.
              पण म्हणून, 'त्या'चा चावटपणा + हिची चूक = मी नॉटी???)
क्षमा    : अरे! निक ऑफिसमधून 'च्याट' करतोय.
              (त्या तशा थंडीत आलेला घाम मी पुसून घेतला. तिच्या या वाक्याने मला जरा धीर आला. क्षमाचा नवरा निखील उर्फ निक त्याच्या         ऑफिसमधून स्वत:च्या बायकोशी उगीचच चावटपणा करत होता. आणि क्षमाच्या अनावधानाने मी 'नॉटी' ठरलो होतो.)
मी       : ओ.के. कसा आहे निखिल?
क्षमा    : एकदम फाईन!
              (मी खरंतर इथेही 'नॉटी' याच उत्तराची अपेक्षा बाळगून होतो.)
              आज त्याला रविवारचं ऑफिसला जावं लागलं. सो, आम्ही 'फेसबुक' वर 'टाईमपास' करतोय.
मी       : ओह! कूल.
              (मी अजूनही स्वत:ला च 'कूल' करण्यात मग्न होतो!)
क्षमा    : बायदवे, तू व्हेगास ट्रीप केलीस का रे?
मी       : नाही अजून.
क्षमा    : अरे! जाऊन ये मग. 'बिंगो' नावाच्या तिथल्या कसिनोची 'ब्रांच' सद्ध्या पुण्यात उघडलीये. मस्त आहे.
             (म्हणजे, पाश्चात्य संस्कृतीच्या असल्या 'फांद्या' आता आपल्याकडेही फोफावाताहेत. आणि त्यांचं गुणवर्णन मी इथे राहून ऐकतो आहे!)
मी       : ओ.के.
क्षमा    : बी.आर.बी.
             (असं म्हणून क्षमा 'आयडल' झाली. इथे, 'बी. आर. बी.' चा फुल फॉर्म 'बी राईट ब्याक' असा असून 'आलेच हं!' इतका सोज्ज्वळ आहे, याची अज्ञानी वाचकांनी नोंद घ्यावी.)
.....
             (सुमारे दहा मिनिटांनी क्षमा जी आली, तीच 'सी या' करायला!)
क्षमा    : चाओं! सासुबाईना 'कुकिंग'मधे मदत हवी आहे. जाना पडेगा. टी.टी.एल.वाय!
मग, मीही 'शुअर' म्हणत तिला 'बा-बाय' केला.
इथे, 'टी.टी.एल.वाय' चा फुल फॉर्म 'तॉंक तु यु लेतर' असा आहे, हे सूज्ञांना सांगणे न लगे!

आमच्या दोघांच्या या संभाषणावरून हे सहज दिसून येतं की, 'फेसबुक'ची अशी स्वत:ची भाषा आहे. ती निव्वळ मराठी नाही, इंग्रजी नाही किंवा इतर कुठलीही नाही.
पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे 'फेसबुक' हे आता जीवनच होऊ लागलंय. 'फार्मविल'मधे शेती करून फावल्या वेळात ऑफिसचं काम(ही) करणारे पुष्कळ शेतकरी(!) मला ठाऊक आहेत.
जोडधंदा म्हणून 'कोफीऱ्हाऊस' चालवून 'हौस' भागवणारे कित्येक महाभाग माझे मित्र आहेत. शरीराच्या कोणत्या भागावर तीळ आहे, यावरून तुमचाच स्वभाव ओळखणारे (वात्रट) ज्तोतिशी आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेतच की!

या आणि अशा अनेक प्रकारांनी या 'फेसबुक'ने आपल्या पारंपारिक जीवनावर चांगलाच परिणाम केलाय. 'कब्जा मिळवलाय' हा कदाचित 'पर्फेक्ट' वाक्प्रचार ठरेल.
आता हेच पहा ना... नेहमी प्रमाणेच हा ही लेख शुद्ध मराठीत लिहिण्याची माझी मनापासून इच्छा होती. पण 'फेसबुक'चं भाषांतर 'थोबाडपुस्तक' केल्यावर माझी मीच माघार घेतली आणि हा लेख जमून आला...

काकडा...

 
... कार्तिकातली थंडी, त्यामुळे जाग आली तरी पांघरूणात गुरफटून पुन्हा झोपायची होणारी अनिवार इच्छा आणि एकदम देवळातली घंटा ट्ण्ण्ण्ण्ण्ण अशी वाजायची. एवढ्या पहाटे कोण आलंय हे बघायला माजघराचं दार किलकिलं करून पाहिलं, तर शेजारच्या जोशी आज्जी आलेल्या असायच्या. आणि आईला 'जयू, कुठवर आला काकडा?' असा प्रश्न असायचा. मग मात्र माझी झोप कुठे अगदी लांब पळून जायची. पटदिशी आवरून अर्ध्या तासाच्या आत, मी सोवळं नेसून देवघरात हजर! इकडे तोवर आईची पूजा निम्म्यावर आलेली असायची. कृष्णमहाराजांना पंचामृताचं स्नान चालू असायचं. आमचं देऊळ देवीचं, पण देवांच्या राज्यातही पुरुषप्रधानता असावी, म्हणूनच की काय, काकडा हा देवीचा नसतो, देवाचा असतो.
माझी आजी भक्तिपर कवनं रचायची आणि ती पूजेच्या वेळी म्हणायची. स्वतः केलेली कवनं आणि जवळ असलेला पारंपरिक कवनांचा साठा, ह्यामुळे विठोबाच्या किंवा रामाच्या वगैरे देवळात गेलं तरी तिची भजनं म्हणायची हौस काही फिटायची नाही. मग एक दिवस तिने ठवरलंच. आपलं स्वतःचं देऊळ आहे ना, मग कशाला उगाच दुसरीकडे जायचं. आपल्याच देवळात काकडा सुरू करायचा.आमच्या देवात कृष्णाची एक खूप सुंदर मूर्ती आहे. त्याच कृष्णाचा काकडा करायचा असं आजीनं ठरवलं आणि मग त्या वर्षापासून आमच्या घरात काकडा सुरू झाला. माझ्या आजीने सगळी गाणी वगैरे आईला शिकवली, त्यामुळे आजी गेल्यानंतरही आईने काकडा करण्यात खंड पडू दिला नाही. त्यामुळेच लहानपणापासून अनेक वर्षं मी एक नितांतसुंदर अनुभव घेऊ शकलो. 'यथा देहे तथा देवे' म्हणजे नक्की काय, हे त्यामुळेच उमगू लागलं.
मी : 'आई अगं उठवलं का नाहीस? कॄष्णाला उठवताना म्हणतात ती सगळी गाणी गेली की माझी.
आई न बोलताच, 'पंचामृती, स्नान घालू अंबेप्रती, सुवासिक तेले अंगा लावुनी, दहि-दूध-तूप-मधु-शर्करा घेउनी....' असं देवीच्या पंचामृतस्नानाचं गाणं म्हणत पूजेतल्या शंखाकडे बोट दाखवायची. थोडक्यात, 'ऊठ, ऊठ म्हणून तुझ्या नावाने शंख केला, पण तू काही उठला नाहीस' असा त्याचा अर्थ. शंखाच्या आवाजानं न उठणारा मी, घंटेच्या आवाजानं जागा व्हायचो, त्यामुळे देवघराच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या शंकराची, मारुतीची आणि गणपतीची पूजा राहिलेली असायची, ती जबाबदारी माझ्यावर यायची. मी पूजेचं सामान घेऊन बाहेर आलो की जोशी आजी न चुकता माझा गालगुच्चा घ्यायच्या. (मला ते मुळीच आवडायचं नाही. मी सोवळ्यात आहे असं त्यांना कितीतरी वेळा सांगायचो. पण त्या फक्त हसायच्या. आता मला ह्याचं हसू येतं) माझी शंकराची, मारुतीची पूजा उरकतेय, तोवर आई प्रसादाची खिचडी करायला स्वयंपाकघरात गेलेली असायची.
आई नैवेद्याचं ताट घेऊन आली की मग कृष्णमहाराजांच्या विनवण्या करायच्या. दिवाळी जवळ आलेली असल्यामुळे ह्या नैवेद्यात दिवाळीच्या फराळासाठी होणारे पदार्थ एक एक करून हजेरी लावायचे.
'घ्या थोडा उपहार, दयाळा घ्या थोडा उपहार,
पाट रुप्याचा बैसायाला, रांगोळी मनोहार, दयाळा घ्या थोडा उपहार |
करंजी, मोदक, लाडु अनरसा, जिलबीही चवदार, दयाळा |
घिवर, बुंदी, मांडे, चिरोटे, ताक ठेविले गार, दयाळा घ्या थोडा उपहार |
किंवा,
रुसु नको कृष्णा, ये बैस पाटी,
घालीते तुजला रांगोळी मोठी |
भोजनसमयी रुसलासी का गा?
काय हवे ते माग श्रीरंगा,
लाडू, जिलबी, खीरीची वाटी, ही तुजसाठी ||१||
सर्वाहूनी तूझी महिरप थोर,
दोन्ही बाजूला नाचती मोर,
पोपट-मैना, वेलांची दाटी, ही तुजसाठी ||२||
राजीवनेत्रा, सुहास्यगात्रा,
चुकवी माझी संसारयात्रा,
लक्ष्मी विनवी हे जगजेठी ||३||
ही आणि अशी अनेक खूप भावपूर्ण पदं मी ऐकायचो. नुसतं ऐकतच रहावंसं वाटायचं. खरोखरीच, कृष्ण नावाचं एक खोडकर मूल आईला हैराण करतंय, आणि तरीही ती तितक्याच प्रेमानं आणि कधी लटक्या रागानं त्याला समजावतीये असंच त्या गाण्यातून वाटायचं.
समोर आहे ती केवळ मूर्ती नाही, साक्षात कृष्ण आला आहे, आणि मग त्याला मी कुठं ठेवू आणि त्याच्या पूजेसाठी काय काय करू असं झाल्याचा भाव सगळ्याच गाण्यांमधून असायचा.
मला बर्‍याचदा वाटतं, की राम हा वंद्य आहेच, पण त्याच्या मर्यादापुरुषोत्तमत्वामुळे तो तेवढा जवळचा नाही वाटत जेवढा कृष्ण वाटतो.
बघा ना, कृष्णाचं देवत्व कळायला आधी त्याच्या खोड्या पहाव्या लागतात, त्याला उखळाला बांधावाच लागतो, 'माती खाल्लीस?' म्हणून रागे भरावे लागतात, 'खोटं बोलतोस? उघड तोंड' असं धाकात घ्यावं लागतं, आणि मग कुठे तो विश्वरूप दाखवतो. तो त्याचं नाव सार्थ करतो. कृष्ण! जो आकृष्ट करतो, तो कृष्ण.
ह्या काकड्याच्या गाण्याचे शब्द म्हणाल तर ते साधेच, पण त्यातून जीव-शिव, तत्पद-त्वंपद इत्यादी उपनिषदाची भाषा आणि मानवी मनाच्या लक्षणांबद्दलची प्रभावी रूपकं बेमालूमपणे यायची.
'माय मिथ्या ब्रह्मचि सत्य, ऐसे बोलति सद्गुरुनाथ,
उपनिषदी हा सिद्धांत, निजवस्तु करा तुम्हि प्राप्त,
मनि धरू नका काहि शंका, श्रीहरिवर वारा पंखा,
द्या यमपुरीला धोका, श्रीहरिवर वारा पंखा |
बोधाची करुनी दांडी, विषयाची मुरडुन मुंडी,
वासना समूळचि खंडी, हरिदासा कोणि न दंडी,
वहा विठ्ठलप्रेमे बुक्का, श्रीहरिवर वारा पंखा |
भावाची झालर केली, भक्तीची मोती ओविली,
वैराग्याचा वाळा, त्रिगुणाची गुंफण त्याला,
तत्पदे-त्वत्पदांची असिपदी ऐक्यता झाली
गुरुवाचुनि न मिळे शिक्का, श्रीहरिवर वारा पंखा |
ऐसा पंखा जो वारिला, देहबुद्धि-ताप हारिला,
चित्ताचा रुमाल केला, मोहाचा घाम पुसियेला,
हे द्वैत मारुनी टाका, श्रीहरिवर वारा पंखा |
असे सगळे स-गीत उपचार घेऊन झाले की मात्र कृष्ण कुमार-वयात यायचा. यशोदेची गाणी हळू हळू कमी होत राधेची गाणी यायची. बहुतेक ग. दि. मांनी लिहिलेलं हे गाणं माझी आजी म्हणायची,
'घनश्याम नयनी आला, सखे मी काजळ घालू कशाला?' पहिल्या चरणातल्या कल्पनेनेच ऐकणारा नि:शब्द.
मग ती राधा सखीला सांगते, की मी काजळ, मेखला, इ.इ. का नाही घालत. काजळ नाही घालत, कारण माझ्या डोळ्यातच तो घनश्याम आहे. मेखला नाही बांधत कारण त्याचे हात अजून मला कमरेभोवती जाणवतात. आणि माझं संपूर्ण शरीरच रोमांचांनी नटलंय, मी हिरे-माणके वाया कशाला घालवू? आणि ह्या कान्ह्याची मुरलीच इतकी मादक आहे, की तिच्या स्वरांनीच मी सगळा शृंगार केलाय. मग आता मला सांग, मला वेगळं नटायची काय गरज? राधेच्या सखीप्रमाणेच, मीही हे गाणं ऐकताना निरुत्तर व्हायचो.अजूनही होतो. काय कमालीचं गूढ नातं आहे राधा कृष्णाचं. 'सांगा मुकुंद कुणी हा पाहिला' मधले शब्द आठवतात, 'सखे होतो आम्ही विषय विचारी, टाकुन गेला तो गिरिधारी' राधा-कृष्णाबद्दल विचार करताना ते 'विषयविचार' आम्हाला सोडत नाहीत, आणि तो गिरिधारी मात्र आम्हाला टाकून जातो.
मग समोर नसलेला तो गिरिधारी सुखात असेल ना? त्याला कुणाची दृष्ट तर लागणार नाही ना? ही काळजी!
काढु दे दृष्ट गोविंदा,
कुरवाळी मुख हरि माता,
गाईन गानछंदा, पाहुनी नेत्रसुखकंदा |
दिनभरी खोड्या किति करिसी,
लाविसी वेड सकळांसी,
बघु दे तुझ्या वदनारविंदा | काढु दे दृष्ट गोविंदा |
रवि-शशी टकमका मुख पाहती,
सुंदरा, बघुनी तुज दिपती,
हासशी किती मंद-मंद,
काढु दे दृष्ट गोविंदा |
आपल्या लेकराची दृष्ट काढणं हे काम आईचं. त्यामुळेच, आपल्या आराध्य देवाला दृष्ट लागू नये म्हणून येणारी ही अशी कवनं म्हणजे 'श्रवण-कीर्तन-स्मरणादि नवविधा भक्तीपेक्षाही कितीतरी श्रेष्ठ वाटतात.
मग सगळी पूजा यथासांग झाली, की त्या सर्वव्यापी देवाची आरती !
आरति कशी करू गोपाला? ज्याने व्यापियले जगताला?
नीरांजन, दिप कर्पुरवात, तुम्हीच झाला राधाकांत |
तुम्हीच दाता, तुम्हीच त्राता,करुनि अ-कर्ता, जगनिर्मियता |
आता देउन मी-पण, मन्मति,दास करितो मंगल आरति |
आरती संपायची, आरतीच्या वेळी वाजणार्‍या घंटेचा नाद वातावरणात घुमत असायचा, आणि त्या नादाबरोबरच,
'पांडुरंग हरी, वासुदेव हरी, बोला पंढरिनाथ महाराज की जय.
गोपालकृष्णमहाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ' असे जयजयकार उमटायचे!!
हे सगळं होईपर्यंत सात-साडे सात वाजून गेलेले असायचे. मग प्रसाद!
त्या प्रसादाची गोडी अजून जिभेवर रेंगाळते. साधीच खिचडी, मुगाच्या डाळीची. पण आहाहा! ब्रह्मानंद. मग देवाचं खास आवडीचं लोणी, साय-साखर, दही-पोहे हे आलंच.हे सगळंच्या सगळं आई तिच्या 'या' कृष्णाला द्यायची.
खाऊन झालं की मग बाकीचे दिवाळीच्या सुट्टीतले उद्योग सुरू.
गेले ते दिन गेले! आता फक्त त्या प्रतिमा मनाच्या एका हळव्या कोपर्‍यात जपून आहेत.
कुठे कुणाच्या बोलण्यात/ लिखाणात 'कृष्ण' हा नुसता शब्द जरी आला, तरी त्या सगळ्या प्रतिमांचा एक मोरपिशी रंग मनावर चढतो. त्या रंगात कुठे चमक असते, कुठे हळुवारपणा असतो, तर कुठे थोडा काळेपणाही....!
'उगाच मोठे झालो' असं वाटायला लागतं. पण डोळे पाणावायच्या आत लक्ष दुसरीकडे वळवावंच लागतं.
कारण चुकून कुणी बघितलंच, तर त्यांना काय सांगायचं? कुठला कॄष्ण दाखवायचा?

आनंदी-आनंद गडे !!

आनंदी-आनंद गडे
इकडे, तिकडे, चोहिकडे.
वरती-खाली मोद भरे;
वायुसंगे मोद फिरे,
नभांत भरला,
दिशांत फिरला,
जगांत उरला,
मोद विहरतो चोहिंकडे;
आनंदी-आनंद गडे

सूर्यकिरण सोनेरी हे
कौमुदि ही हसते आहे;
खुलली संध्या प्रेमानें,
आनंदे गाते गाणे;
मेघ रंगले,
चित्त दंगलें,
गान स्फुरलें,
इकडे,तिकडे, चोहिंकडे
आनंदी-आनंद गडे!

नीलनभीं नक्षत्र कसें
डोकावुनि हें पाहतसे;
कुणास बघते? मोदाला!
मोद भेटला का त्याला?
तयामधें तो
सदैव वसतो,
सुखे विहरतो,
इकडे,तिकडे, चोहिंकडे
आनंदी-आनंद गडे!

वाहति निर्झर मंदगति,
डोलति लतिका वृक्षतती,
पक्षि मनोहर कूजित रे,
कोणाला गातात बरे?
कमल विकसलें,
भ्रमर गुंगले,
डोलत वदले-
इकडे,तिकडे, चोहिंकडे
आनंदी-आनंद गडे!

स्वार्थाच्या बाजारांत
किती पामरें रडतात;
त्यांना मोद कसा मिळतो?
सोडुनि स्वार्था तो जातो-
द्वेष संपला,
मत्सर गेला,
आतां उरला
इकडे,तिकडे, चोहिंकडे
आनंदी-आनंद गडे!