Friday, November 4, 2011

कोनाडे

माझ्या माहेराच्या घरात नाना प्रकारचे कोनाडे मी पाहिलेले आठवताहेत. ओटीवरचे सर्व कोनाडे अत्यंत आकर्षक महिरपी असलेले. एकमेकासमोर. सारख्या अंतराने असे हे कोनाडे ओटीची शोभा वाढवायचे. एका कोनाडय़ात लाल रुमालात दासबोधाची एक पोथी बांधलेली मला अजून आठवते. एका कोनाडय़ात कायम एक लख्ख घासलेली समई असायची. विजेचे दिवे नव्हते. रात्री ती उजळायची. तिच्या हलत्या वाती भिंतीवर उमटायच्या. त्या पाहताना मनात कधी भीती उमटायची. पण आजोबा जागीच खाकरले की भीती पळायची. पुढच्या पडवीत एक मोठा लोटा पुरून एक कोनाडा केलेला होता. त्यामध्ये कायम तांदूळ भरलेले असायचे. कुणी झोळी घेऊन दाराशी थांबले की आमच्या बाळमुठी त्यामधून भरून त्या झोळीत रित्या व्हायच्या. आणखी एक गम्मतशीर कोनाडा आठवतो. तो साखरी आगरचा- माझ्या आजोळचा. तिथे खूप मोठे अंगण होते ते वरच्या घरी. ‘वरचे घर’ म्हणजे मूळ आजोळचे घर. त्या अंगणाला चिरेबंदी अशा बाजू भिंती होत्या. अंगणात खाली उतरत यायचे. या जांभ्या दगडाच्या भिंतीत एक करवंटीचा कोनाडा होता (म्हणजे नारळाची करवंटी पुरून केलेला) तो सदैव भाताचे तूस जाळून तयार केलेल्या रांगोळीने भरलेला असायचा. अंगणी सारवली की लगेच रांगोळी घालता यावी म्हणून. बाईला जसे कुंकू तशी सारवल्या अंगणात रांगोळी. रांगोळी नसेल तर, अंगण बोडके का? म्हणून आजोबांचा स्वर चढायचा.
एप्रिलला नातवंडांच्या परीक्षा संपल्या, की सर्व नातवंडांना घेऊन कोकणात अवतरते. मोठे घर. घरामागे माडांची गर्द राई. त्यामागे स्वच्छ, सुंदर, उसळणारा समुद्र, मला सारखा खुणावत असतो. घरापुढे-मागे सारवलेली स्वच्छ अंगणे. मुलांना शहरात ब्लॉक नामक खुराडय़ात असे मोकळं ढाकळं हुंदडायला मुळात मिळत नाही. लहान मुलांनी वारा प्यायलेल्या वासरासारखं हुंदडावं बालपणी. म्हणजे मुले छान वाढतात. मनानेही मुक्त मोकळी राहतात. चैत्र-वैशाखाचे दिवस म्हणजे कोकणचा मेवा लुटण्याचे दिवस. काजू, करवंदे, आंबे, फणस, रातांबे, तोरणे असा भरपूर मेवा मुक्तपणाने मुले खाऊ शकतात. फणसबाळे सांभाळीत दारात फणस सेवेला उभे. मुलांना कोकणात यायला नाही आवडले, तरी नातवंडांना आवडते, नातवंडांना जे आवडते ते मुलांची विशेष पर्वा न करता करणे हा आजीचा धर्म मी पुरेपूर सांभाळते. हे एवढं रामायण सांगायचे कारण म्हणजे आता शहरात न भेटणारी पण अजून या मातीत (भिंतीत म्हणा ना!) असणारी एक गम्मतशीर गोष्ट किंवा रचना तुम्हाला भेटवायची आहे! त्याचे असे झाले.
सायंकाळी अंगणाच्या पाठवणीवर (पायरीवर) मी बसले होते. इतक्यात पेपर आला. येथे तो सायंकाळी येतो. (क्वचित दुपारी) माझ्या नातीला मृदुलाला सांगितले- ‘मुदूऽ, माझा चष्मा आण. त्या ओटीवरच्या कोनाडय़ात ठेवलाय.’
‘कोनाडा म्हणजे?’ तिने विचारले.
मी हात कोनाडय़ाच्या दिशेने केला.
मी मागे हात करीत म्हटले, ‘अगं, तो काय समोर-’
‘हो! ते ‘आपोआप कपाट’ होय?’
‘आपोआप कपाट’ हा पाच वर्षांच्या नातीचा नवीन शब्द मला आवडला. घरं बांधताना भिंतीतच तयार झालेला तो कोनाडा म्हणून ‘आपोआप कपाट’. तिला कपाट वाटले कारण कोनाडय़ामध्ये एक फळी टाकलेली होती. त्यामुळे तिच्या दृष्टीने ते कपाट.
मृदुलाच्या त्या बोलण्यातून मला पाहिलेले अनेक प्रकारचे कोनाडे आठवू लागले. माझ्या माहेराच्या घरात नाना प्रकारचे कोनाडे मी पाहिलेले आठवताहेत. ओटीवरचे सर्व कोनाडे अत्यंत आकर्षक महिरपी असलेले. एकमेकासमोर. सारख्या अंतराने असे हे कोनाडे ओटीची शोभा वाढवायचे. एका कोनाडय़ात लाल रुमालात दासबोधाची एक पोथी बांधलेली मला अजून आठवते. एका कोनाडय़ात कायम एक लख्ख घासलेली समई असायची. विजेचे दिवे नव्हते. रात्री ती उजळायची. तिच्या हलत्या वाती भिंतीवर उमटायच्या. त्या पाहताना मनात कधी भीती उमटायची. पण आजोबा जागीच खाकरले की भीती पळायची. पुढच्या पडवीत एक मोठा लोटा पुरून एक कोनाडा केलेला होता. त्यामध्ये कायम तांदूळ भरलेले असायचे. कुणी झोळी घेऊन दाराशी थांबले की आमच्या बाळमुठी त्यामधून भरून त्या झोळीत रित्या व्हायच्या. आणखी एक गम्मतशीर कोनाडा आठवतो. तो साखरी आगरचा- माझ्या आजोळचा. तिथे खूप मोठे अंगण होते ते वरच्या घरी. ‘वरचे घर’ म्हणजे मूळ आजोळचे घर. त्या अंगणाला चिरेबंदी अशा बाजू भिंती होत्या. अंगणात खाली उतरत यायचे. या जांभ्या दगडाच्या भिंतीत एक करवंटीचा कोनाडा होता (म्हणजे नारळाची करवंटी पुरून केलेला) तो सदैव भाताचे तूस जाळून तयार केलेल्या रांगोळीने भरलेला असायचा. अंगणी सारवली की लगेच रांगोळी घालता यावी म्हणून. बाईला जसे कुंकू तशी सारवल्या अंगणात रांगोळी. रांगोळी नसेल तर, अंगण बोडके का? म्हणून आजोबांचा स्वर चढायचा.
१९४४ साली गुहागरला प्लेग झाला. तेव्हा सारी मंडळी घरे सोडून समुद्रालगत ‘कावण’ काढून राहायला गेली. ‘कावण’ म्हणजे ऐसपैस झोपडी. दोन-चार खोल्या असलेली. तेव्हा म्हणे खूप माणसांनी घराच्या कोनाडय़ात दागिन्याचे डबे ठेवून कोनाडे चक्क लिंपून टाकले. वरून भिंती आल्यावर कळणार तरी कसे? पण या कोनाडे लिंपण्यावरून एक कथा नेहमी आजी सांगायची. आजी आमची महा गोष्टीवेल्हाळ!
एकदा असेच घर सोडून जाताना एका माणसाने दागिन्यांचा डबा कोनाडय़ात पुरून भिंत लिंपली. तर खूण म्हणून एक खुंटी लावली. त्याच्या वर पूजेचा मुकटा ठेवला. घरात कुण्णा कुण्णाला सांगितले नाही. गावी सारी माणसे गेली. तिथेच त्याला ‘लकवा आला.’ वाणी गेली. हातपाय लोळागोळा. त्याला घरी आणले. ओटीवर बाजेवर हा माणूस. सारखे हात माजघरात altआणि डोळे  माजघरात. पण कुणाला त्याची नेत्रपल्लवी आणि हस्तपल्लवी कळली नाही. दागिने कोनाडय़ाने गडप केले. गुप्त धन असेच सापडत असावे. अशी ही गम्मत!
आमच्या गुहागरच्या या घरात एक सुंदर कोनाडा आहे. तो येऊनच पाहायला हवा असा देखणा. त्याचे नाव ‘देवाचा कोनाडा’. पश्चिमाभिमुख अशा या कोनाडय़ात देव विराजमान आहेत. आजही! खाली बसून पूजा करता येईल इतक्या उंचीवर म्हणजे जमिनीपासून फूट सव्वाफूट उंचीवर हा कोनाडा आहे. पुढच्या वरील भागात सागवानी लाकडाची सुंदर महिरप आणि महिरपीला खालच्या दोन बाजूला ऐटबाज पोपट, शंभर वर्षे होऊन गेली, तरी या कोरीवकामाला ढक नाही इतका हा कोनाडा सुंदर आहे.
या निमित्ताने आणखी एक कोनाडा आठवला. हा कोनाडा माझ्या काकांच्या घरी माडीवरच्या जिन्याकडे जाताना वरच्या भिंतीत आहे. चांगला ऐसपैस कमानी कोनाडा. माझी चुलत बहीण रुसली की ती या कोनाडय़ात जाऊन बसायची. ती कोनाडय़ात बसली की आजी म्हणायची, ‘अगो ऽ बाई, मंथरा अवतरली कोनाडय़ात. आता काय रामाचे सिंहासन मागेल. ते द्यायला हवे!’
तिची बाबापुता चालायची. तिथे सहज हात कुणाचाच पुरायचा नाही. पठ्ठी अशी बहाद्दर. तिला जे हवे ते मिळाल्यावाचून कोनाडा सोडायची नाही. तिचे लग्न गुहागरला झाले. मधेच ती दिसेना. आजी म्हणाली,
‘अगो ऽ गौरीहार घेऊन कोनाडय़ात नाही ना बसली ही?’ माजघरभर हशा उसळला. पण सासरच्या एकाही माणसाला त्याचा अर्थ उमजला नाही.
पुण्याला लग्न होऊन आल्यावर मी एका वाडय़ात गेले. या वाडय़ाच्या दिंडीदरवाजाच्या आतल्या बाजूला असाच प्रचंड कमानी कोनाडा. पहारेकरी चक्क रात्री तिथे झोपायचा. मी प्रवास खूप केला. देवालयामध्ये मी खूप सुंदर सुंदर कोनाडे पाहिले. एका शंकराचे देवळातले कोनाडे मला अजूनही विसरता येत नाहीत. प्रवासात त्रिपुरी पौर्णिमा आली. त्या शिवालयाच्या आवारभिंतीला असेच हजारो छोटे छोटे कोनाडे. पणती बसेल एवढे. त्या प्रत्येक कोनाडय़ात दिवे लावलेले आणि समोर त्रिपुर उजळलेले ते प्रकाशरूप, आजही माझ्या डोळ्यात आहे. गुहागरला आमच्या व्याडेश्वराचे मंदिर अष्टकोनी आहे. या दगडी भिंतीमध्ये प्रत्येक भिंतीत असेच अजस्त्र कोनाडे आहे. पैलू पाडावे असे ते कोनाडे अत्यंत देखणे आहेत.
आमच्या घरी लहानपणी प्रत्येक भावंडांना एकेक स्वतंत्र कोनाडा होता. भिंत सारवली की चुन्याचे वर लिहिलेले. ‘सदाशिवचा कोनाडा’ ‘कमलचा कोनाडा’ माझे माहेरचे नाव कमल. बालपणीची एक गम्मत आठवली. कमरेच्या वर असलेल्या जागी भिंतीत एक कोनाडा होता. त्यामध्ये फणीकरंडय़ाची पेटी असायची. या पेटीत दोन-तीन फण्या (तेव्हा कंगवा नव्हता.) कुंकवाचा चांदीचा करंडा आणि काजळाची चांदीची डबी असायची. पेटी उचलून चटईवर बसून वेणीफणी, कुंकू वगैरे शृंगार करायचा. (शृंगार एवढाच होता) एकदा ती पेटी माझ्या हातून पडली. आरसा फुटला. वडलांनी एक नवीन आरसा आणला आणि तो कोनाडय़ातच कायमचा बसवला. फणी करंडय़ाची पेटी कायमची माळ्यावर गेली. आता जाता-येता कोनाडय़ातल्या आरशात डोकवायची सोय झाली. मी सारखी पाहायची. माझी आजी भारी हुशार आणिaltमिस्किल. म्हणाली-
‘सारखं काय पाहातेस? पाहून काय कळतंय का? काही सुचतंय का?’
‘आता आरशात पाहून काय डोंबल सुचणार?’ मी म्हटले.
तशी माझ्या डोक्यावर टप्पू मारून म्हणाली, ‘ये इकडे’.
आम्ही दोघी आरशापुढे उभ्या. ती बाजूला गेली.
‘आता काय झालं?’
‘काय म्हणजे? आरसा स्वच्छ झाला.’ मी म्हटले.
तशी म्हणाली, ‘तेच सांगत्येय तुला. मन आरशासारखं हवे. कुणी पुढं उभं राहिलं की उमटायला हवे. घटना संपली की स्वच्छ! परत नवीन प्रतिबिंब-अनुभव घ्यायला मन स्वच्छ!’ तेव्हा अर्थ कळला नव्हता. आज वाटते आजी किती महान होती! आणि ते कोनाडेही! स्वच्छ! सताड! सदैव उघडे!
(डॉ. लीला दीक्षित लिखित आणि दिलीपराज प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘मोकळं आभाळ’ या पुस्तकातून साभार)

    Friday, September 16, 2011

    घर कौलारू : चूलबाई

    घरोघरी मातीच्या चुली’ या वास्तवावर आता बहुतांश दृष्टीने फुली मारावी लागेल. छोटय़ा गावात, शेतवस्तीवर चुलीचे अस्तित्व अजून टिकून आहे. पण एक काळ असा होता, की ही चूलबाई प्रत्येक घरात विविध रूपांनी आणि आकारांनी विराजमान असे. त्याची जुन्या काळातील तीन रूपे सर्वानाच माहीत असतात. स्वयंपाकघरात विराजमान असते ती चूल. तिची जोडी जमते ‘वईल’ या पुरुषाबरोबर. ती चूल तो वईल. चूलबाई स्त्रीलिंगी असून स्वयंपाकघरात प्रथम मानाची. सप्तपदीत स्त्री पुढे पुरुष मागे. पण हा पुरुष मनातल्या मनात वेगळीच शपथ घेत असतो. ‘बाईऽग, आज चाल तू पुढे. पण उभं आयुष्य माझ्या मागं मागं यायचंय’ आता दिवस बदलतोय! पण पूर्ण बदलेल का? त्यामुळे जडसृष्टीत तरी चूलबाईचा हा मान मला कायमच सुखावतो. स्वयंपाकघरात ‘चूल आणि वईल’ असा दोन जोडय़ा असत. त्यातील एक चूलबाई आणि वईल वापरला जाई. आदल्या दिवशी पेटवलेली चूल दुसऱ्या दिवशी लाल मातीने सारवली जाई आणि लख्ख सारवलेली चूलबाई स्वयंपाक रांधायला सिद्ध होई. चूल आणि वईल मध्ये पोकळ जागेने जोडलेले असे. चूलबाई पेटली की वईलही जरा मंद लाल निळसर ज्वाळांनी धगधगून उठे. या चुलीवर सतत एक तांब्याचे तपेले असे. ते पाण्याने भरलेले असे. रात्री १२ लाही गरम पाणी तयार. हे तांब्याचे तपेले सतत चुलीवर असे. स्वयंपाक झाला, की झाले हे स्थानापन्न. चूलबाई कामात असे तेव्हा हे ‘वईल’वर विसावे. सततच्या काजळीनं हे काळंकुट्ट झालेलं. त्याला नावच होतं. ‘मशेरकं’.
    या चुलीच्या पण परी असत. चूलवईल स्वयंपाकघरात मानाची. चुलीपेक्षा मोठा चुला. तो पडवीत बसे. पोहे भाजायला, भाजणी करायला, लाडवाचे भाजायला, जिलेबी काढण्यासाठी उपयोगी पडे. जिलेबी काढायची म्हटली तर याच चुल्यावर मोठ्ठी पिवळी परात विराजमान व्हायची आणि आमच्या चंपूताई जोशी त्याच्यावर तुपात भराभर जिलब्या टाकीत. साजूक तुपात पोहणाऱ्या त्या जिलेब्या आम्ही पडवीतल्या पायठणीवर बसून न्याहाळत राहायचो. त्यामुळे हा पडवीतला चुला पेटला की आम्ही भावंडे खूश व्हायचो. या चुल्याचे वडील म्हणजे चुलाण. हे चांगले भक्कम असे. जांभ्या दगडाचे तीन दगड ठेवून हे चुलाण तयार होई. हे चुलाण म्हणजे अंघोळीचे पाणी तापवण्यात तरबेज. या चुलाणात वाडीतले माडाचे थरपे, लाकडाच्या मोठय़ा गाठी आणि ओंडके, वाडीतल्या झावळय़ा काहीही जळण म्हणून चाले. पडवीलगत अंगणात एका बाजूला हे चुलाण असे. वर पत्र्याचे छप्पर. बाकी चारी दिशा मोकळय़ा. या जागेला एक खास नाव असे ‘थाळ’. आजी म्हणे, ‘जा, थाळीवरचे गरम पाणी आण, लोण्याची रवी धुवायला.’
    आता या चूल कुटुंबाला खायला लागणारे अन्न म्हणजे सरपण. घरातील चूल प्रथम पेटवायची ती गोवरीने किंवा शेणीने. घरात गाईगुरे भरपूर असत. त्यामुळे वाडीत गोवऱ्या थापण्याचा उद्योग सतत असे. आई किंवा आजी रात्री गोवऱ्यांनी शेगडी भरीत. ती खापराची असे. तिच्या बुडाशी पाच-सात गोवऱ्या. वर साळीची फोलपटे भरली जायची. रात्री झोपताना चुलीतला छोटा निखारा त्या साळीच्या तुसावर ठेवला की झाले! सकाळी जिवंत अग्नी लगेच मिळे. ‘जिवंत’ हा कोकणचाच शब्द. ही शेगडी घरातला अग्नी सतत सांभाळी. एवढंच तिचं काम. रांधायला तिचा कधीच उपयोग नसे. सकाळी चूल या शेगडीनेच पेटे. स्वयंपाकघरातील चूलबाईला जडजड लाकडे झेपायची नाहीत. तिच्यासाठी छोटी लाकडे असायची. शहरात त्याला ‘बंबफोड’ म्हणत. आमचा शब्द ‘मोठी सळपे’. लहान सळपे म्हणजे अत्यंत पातळ बोटाएवढय़ा ढलप्या. प्रथम चूल पेटताना त्याचा उपयोग होई. पडवीतला चुला, जरा जादा भक्षक. तो माडाच्या झावळय़ांचे काखे, पोया पिचुंदप्या, जरा लांब लाकडे खाई. स्वयंपाकघरातील ‘चूल’ सतत ‘वईल’बरोबर असे. तोही तिला मदत करी. चूलबाईवर भाताला कढ आला, की तो ‘वईल’कडे सरके. भाताचे तपेले वईलावर विसावले की मंद जाळाने भात मऊसूद, मोकळा छान होई.
    ‘चूल’, ‘चुला’ आणि ‘चुलाण’ यांना घरात नारायणाचे रूप होते. अग्निनारायण! दिवाळी झाली की आजी घरातील हरचंदला सांगायची, ‘जा बाबा, उद्या नामा कुंभार येणारेय चुली थापायला. डोंगरातून दोन टोपल्या लाल चिकण माती आण’. ही माती जरा चिकट असे. लालभडक असे. दुसऱ्या दिवशी सकाळी नामा येई. मागच्या अंगणात चुली घाली. चूलवईलांच्या दोन जोडय़ा, एक मोठा चुला. एखादी शेजारची आजी येऊन आजीला सांगे. ‘गोऽ सीता, मला पण एक चुला दे बाई. तो नाम्या एका चुल्यासाठी कुठला येतोय?’
    नामाच्या मागे माझी आणि बहिणीची भुणभुण होई. ‘आम्हाला भातुकलीची चूल घालून दे.’ तो आनंदाने सार करी. सुटीत भातुकलीच्या या चुलीत नैवद्याच्या वाटीचा भात आम्ही शिजवीत असू. त्यासाठी एक छोटं आजोबांच्या मुठीएवढं तांब्याचं तपेलं आजीने गोपा तांबटाकडून करून घेतलं होतं. या चुली वाळायला चार महिने जात. पावसाच्या आधी स्वयंपाकघरातल्या जुन्या चुली काढल्या जात आणि चूलवईलाच्या दोन जोडय़ा तिथे स्थानापन्न होत. नवी चूल प्रथम पेटवताना आई तिच्यावर हळदीकुंकू वाहात असे. फुले घालून साखरेचा नैवेद्य झाला की मगच चूलबाई स्वयंपाकाला सिद्ध होई. ‘घरात चूल पेटलीच पाहिजे’ याचा अर्थ बाळपणी कळत नसे. वाडीवरची रखमा कधीतरी थरथरत्या पायांनी आजीपुढे फाटका पदर पसरी. ‘सीतामाय, दोन दिस जाले. चूल नाय पेटली.’
    आजी घरात जाई. शेरभर तांदूळ आणि भांडंभर डाळ तिला देई. आज या आठवणी झाल्या, की मनात व्याकुळता दाटते. कोकणचे दारिद्रय़ आजही थोडंबहुत तसंच आहे. हे केव्हा सुधारणार?
    आम्हा भावंडांसाठी चूल गमतीचा भाग होता. दुपारी चूल विझली, की आम्ही फणसाच्या आठळय़ा, पावटय़ाच्या शेंगा, बाळवांगी, छोटे बटाटे त्यात सारून ठेवायचो. मंद मेमुरात (धगधगती राख) हे सारं खरपूस भाजून निघे. मंद निखारे असतच थोडे.
    चूल, चुला आणि चुलाण यांच्यावरची एक गंमत सांगायला हवी. तिला ‘मी नाव दिलंय ‘खाचणचूल’. कोकणात पूर्वी कार्यालये नव्हती. आजही नाहीत. लग्न घरी होत. मोठं गोत जमे. अशा वेळी मागच्या अंगणात एक फूट रुंद आणि पाच-सहा फूट रुंद असा जमिनीत चर खणला जाई. या चरावर मोठी, सतेली, पातेली राहतील अशा पद्धतीने जांभे दगड मांडीत. अशा एका जमिनीतील चरावर तीन मोठय़ा चुली तयार होत. परत या खाचणचुलीला लाकडे समोरून घालावी लागत नाहीत. दोन्ही बाजूंनी चर मोकळा असतो. त्यात मोठमोठे लाकडाचे ओंडके छान जळत. वर फक्त पत्र्याचे छप्पर असे. अंगणाच्या चारी बाजू मोकळय़ा. मोकळय़ा वाऱ्याने अग्नी रसरसून छान पेटे. तीनचारशे माणसांचा स्वयंपाक स्त्रिया चार-पाच तासांत सहज करीत. मोठी सतेली, पातेली चुलीवर उतरायला पुरुषमंडळी मदत करत. भल्यामोठय़ा कढईच्या कानामध्ये आडवा बांबू घालून कढईबाई खाली उतरे.
    अंगणात पंक्ती बसत. शेजारचे घर सलगीचे असे. मधला गडगा काढून दोन अंगणे एकत्र होऊन मोठा हॉलच तयार होई. माडाच्या झावळय़ांनी शाकारलेले आणि शेणाने मऊसूद सारवलेले हे अंगण छान दिसे. मांडवाला पताका, आंब्याचे डहाळे. केळीचे लोंगर, आंब्याचे शेंदरी घड, तांबूस रामफळे, शहाळी असे नैसर्गिक सुशोभन असे. तयार झालेले अन्न पुरुष ओटीवर आणून ठेवीत. केळीची पाने आणि हिरवेगार केळीचेच द्रोण.
     पानांभोवती गुलाल, रांगोळी, उदबत्त्यांचा वास घमघमे आणि ही पंजी असलेली खाचणचूल सर्वाचे पोट तृप्त करी. आता घरी कोकणात चूल नाही. तरीही एक चूल मनात जागी आहे. आई किंवा आजी पुढे बसलेली. भराभर भाकरी करणारी. भाकऱ्यांची चळत चुलीला टेकून उभी आणि झणझणीत पिठलं आणि कांदा-वांग्याच्या भरिताची घमघम. हे चित्र माझ्या मनात कायमच जागे आहे.

    Saturday, September 3, 2011

    घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात !!

    आज घरोघरी गौरी बसतील. दोन दिवस माहेरपणाला आलेल्या गौरीचं कोण कोडकौतुक होईल. माहेरवाशिणीचं कौतुक करण्याची आपली परंपरा तशी जुनीच... पण आता या संकल्पनेतच बदल होत चाललाय... लेकीच्या माहेरासाठी सासुरवास भोगणारी आई ते आता लेकीच्या घरी दुरावलेलं माहेरपण अनुभवणारी आई... हे कौतुकास्पद स्थित्यंतर सध्या आजूबाजूला घडत ..
    घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात 
    माहेरी जा सुवासाची कर बरसात 
    सुखी आहे पोर सांग आईच्या कानात 
    आई भाऊसाठी परी मन खंतावतं 
    विसरली का गं भादव्यात वर्स झालं 
    माहेरीच्या सुखाला गं मन आसवलं
     
     
    आयुष्यात जेव्हा 'सासर' येतं, तेव्हाच 'माहेर' कळतं, असं म्हणतात. माहेरच्या वाटेकडे ते डोळे लावून बसणं... वर्षातून एकदा येणाऱ्या सणासाठी माहेराहून येणाऱ्या भावाची वाट पाहणं... अंगणातल्या पक्ष्याला नाहीतर वाऱ्यालाच माहेरचा निरोप धाडायला लावणं... माहेराची ही ओढ जात्याच्या घरघरीतून, रोजच्या कामाच्या रहाटगाड्यातून अनेक 'लेकीं'च्या मुखातून अलगद बाहेर पडली. बहिणाबाईंनी माहेराच्या वाटेचं किती चपखल वर्णन केलंय, 

    लागे पायाला चटके 
    रस्ता तापीसानी लाल 
    माझ्या माहेरची वाट 
    मला वाटते मखमल 

    पूर्वी नुकतंच लग्न झालेल्या मुलीने ज्येष्ठात सासरी राहू नये, असं मानलं जायचं. त्यामुुळे लेकीच्या त्या पहिल्या माहेरपणाचं कौतुकही खूप असायचं. लाडाकोडात वाढलेली पोर सुखात नांदतेय ना, हे उंबऱ्यापाशी असलेल्या मायेला त्या पोरीच्या डोळ्यांत पाहून लगेच कळायचं. पुढे भाद्रपद महिन्यात गौराईसोबत माहेरपणाला आलेली लेक हक्काचं माहेरपण अनुभवे. 

    माहेरी जाईन बैसेन गादीवरी 
    विसावा तुझ्या घरी मायबाई 
    असं ती लेक उगाच म्हणायची नाही सासरची कामं सासूबाईंचे टोमणे ,सासऱ्यांची कडक शिस्त दीर नणंदेचे हट्ट ... या साऱ्या साऱ्यांतूनकाही दिवसांपुरती का होईना सुटका तिची व्हायची अर्थात मायेच्याउबदार ओलाव्याची आसही त्यात दडलेली असे लग्नाला दोन तीन वर्षंहोईपर्यंत ही तहान भागायची तरी पण एकदा का मूलबाळ झालं आणिसंसाराच्या रहाटगाड्याला तिची सवय झाली की त्यातून माहेरासाठी वेळमिळणं तसं कठीणच होऊन बसायचं गौरीगणपतीच्या वेळी आईशी होणारंहितगुज तिच्याशी केलेल्या सुखदु खाच्या गप्पा सारं सारं कुठेतरीहिरमुसून जायचं भोगाव्या लागणाऱ्या सासुरवासाचं दु ख माहेरच्या त्याउंबऱ्यापलीकडे कधी पोहोचलंच नाही ... आणि कधी चुकूनमाकून लेकीने तेधाडस दाखवलंच तर बयो आता तेच तुझं घर ', असा समजावणीचासूरही ऐकावा लागे आमच्या पोरीचं नशीबच फुटकं असं म्हणून आईबापगप्प बसत ... आणि त्या लेकी साठी माहेर नावापुरतंच उरे मुलीलाकुठे दुखलं खुपलं तरी बैचेन होणारे आईबाप अशा वेळी मात्र कच खात .त्या वेळी धाडसाने पाऊल उचलणारं माहेर तेव्हा विरळंच 

    पण हळुहळू का होईना लेकीवरच्या अन्यायाची धग माहेरपर्यंत पोहोचलीआणि ते लेकीच्या पाठीशी समर्थपणे उभं राहिलं हुंड्यासाठीचा छळ असोकी नवऱ्याचं लफडं की नवरा गेल्यानंतर तुटलेलं घर ... पाठीशी खंबीरराहिलेल्या माहेरानेच तिला लढण्याचं बळ दिलं ... आणि माहेरचं महत्त्वनव्याने त्या लेकीला उमगलं 

    एकीकडे माहेरचं हे बळ तिची शक्ती ठरत असताना या बळा चाअतिरेकही पहायला मिळाला केवळ आनंद आणि दु खद प्रसंगातमाहेरच्यांकडून मिळणाऱ्या मदतीच्या हाता चं रुपांतर नको त्या 'हस्तक्षेपा त झालं घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुनेच्या माहेरच्यामाणसांच्या होणाऱ्या लुडबुडीमुळे सासरच्या घरात क्लेश निर्माण होणं ,घटस्फोटांपर्यंत मजल जाण्याची उदाहरणही पहायला मिळाली 

    आताही लग्न झालेल्या मुलींचं माहेर मोबाइल फोनमुळे खूप जवळ आलंयअमुक पदार्थाची रेसिपीच नव्हे तर घरात घडणारी प्रत्येक गोष्ट डेली सोपप्रमाणे दररोज सांगणाऱ्या लेकीही इथे आहेत तर काहीजणींनी सासरआणि माहेर या दोघांनाही सोयीस्कर अंतरावर ठेवलंय ... आता शक्यतोनवरा बायको दोघेही कमवते असतात त्यामुळे साधारणत लग्नझाल्यानंतर दोघांचाही कल स्वतंत्र राहण्याकडे असतो दोघांनी मिळूनकाढलेल्या कर्जातून उभं राहिलेलं घर खऱ्या अर्थाने त्या दोघांचं बनलेलंअसतं त्यामुळे जिथे सासरच रहात नाही तिथे माहेर उरलं कुठे ?म्हणूनच त्या घरात जसे मुलाचे आई वडील हक्काने राहतात त्याचघरात लेकीच्या आई बाबांनाही यायला काहीच वावगं वाटत नाही आधीमुलीच्या घरी पाळणा हलेपर्यंत पाणीही न पिणारे आईबाबा आता हक्काने 'हवापालटा साठी लेकीकडे येत आहेत 

    अर्थात हे केवळ हवापालटापर्यंतच मर्यादीत नाही लेकीच्या घरी स्वत चंमाहेरपण मोठ्या प्रेमाने अनुभवण्याचं स्तुत्य स्थित्यंतर सध्या पहायलामिळतंय एकतर लेक मोठी होऊन सासरी जाईपर्यंत त्या आईचं स्वत चंमाहेर तुटलेलं असतं त्या आईचे आई वडील निवर्तले असतात किंवाअसले तरी त्या घरी भावांचे संसार फुललेले असतात मग पतीचं घर हेचआपलं घर मानण्याशिवाय गत्यंतर नसतं पतीची साथ नसेल तर हे जीवनअधिकच कष्टप्रद बनतं मुलांच्या संसारात कधी मन रमतं तर कधी नाहीतर सुनेशी पटेलच याची खात्रीही नसते मन हलकं करावसं वाटतं असतंसुखदु खाचं हितगुज करावसं वाटतं अशा वेळी पोटची पोर हाचएकमेव आधार वाटत असतो आणि तिचं घर तिला स्वत चं वाटतं 

    केवळ एकुलती एक मुलगी असणारी आईच नव्हे तर कर्तीसवरती मुलेअसूनही आईने मुलीच्या घरी राहण्याकडे सध्या कल वाढू लागलाय हीलेकही आईचे स्वागत तितक्याच अगत्याने करतेय एव्हाना मूलझाल्यानंतर आई च्या भूमिकेतून जाणाऱ्या लेकीलाही आईचे मोलनव्याने जाणवू लागलेलं असतं घरात कोणीतरी मायेचं मोठं माणूस हवंही भूकही असते त्यामुळे आईच्या रुपात लेकीला मायेची ऊब मिळतेच ,पण त्या आईलाही लेकीच्या मायेचा ओलावा अनुभवायला मिळतोय .अर्थात हे सर्व असं सुरळीत होण्यात महत्त्वाचा वाटा जावयांचाही आहे . 'जशी माझी आई तशीच तुझी आई ', असं समजून उमजून याजावयांनीही या आईंची जबाबदारी स्वीकारलीय त्यांना घरातलं एक सदस्यबनविण्यात त्यांना हवं नको ते विचारण्यात ते लेकीपेक्षा जराही कमीपडत नाहीत हेही लक्षात घेतलेलं बरं 

    बहिणाबाई म्हणतात , ' लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते '. सासरीकितीही हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या कितीही सासूरवास भोगावालागला तरी आपल्या लेकीला सासरी गेल्यानंतर हक्काचं माहेर मिळावं ,यासाठी तिची माय आजन्म सासूरवास भोगत असते पण आता याच 'आई चं सुटलेलं माहेरपण तिला परत मिळावं यासाठी हीच लेक आतासासरी नांदतेय ... ' आईच्या माहेरासाठी लेक सासरी नांदते ही नवीनउक्तीच जणू जन्माला आली आहे 

    Wednesday, June 8, 2011

    स्त्री व सृष्टी


    वर्षां संपूर्ण आयुष्य निसर्गाशीच बांधलेलं असल्यामुळे आणि स्वत: सर्जनक्षम असलेली स्त्री सृष्टीच्या निर्माणक्षमतेला न दुखावता मानवी जीवन समृद्ध करेल, असा विश्वास असल्यामुळे वेदपूर्व आणि वेदकाळातही स्त्रीचं सामथ्र्य व सृष्टीचं आरोग्य अबाधित राहिलं. आज पर्यावरणाचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आणि त्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न होत असताना स्त्री व सृष्टी यांच्यातल्या या नात्याचं पुनरुज्जीवन व्हायला हवं. उद्या जागतिक पर्यावरण दिन. त्यानिमित्त काही विशेष लेख-
    पर्यावरण दिन दरवर्षीच येतो आहे. ‘सृष्टी वाचवा’ अशी हाकही जगाच्या कोपऱ्यांतून पुन:पुन्हा येते आहे. पण काही किरकोळ अपवाद वगळता ही हाक बहुतांशी फोल ठरते आहे. या हाकेला उत्तर देण्याची जबाबदारी फक्त शासनकर्त्यांची नव्हे, हे फक्त पर्यावरणवादी मंडळींचं राखीव क्षेत्रही नव्हे, तुमच्या-माझ्या प्रत्येकाच्याच रक्तातले अंत:प्रवाह या हाकेनं खळखळून वाहायला हवेत. पण सृष्टीची ही हाक ऐकून खरं जर कुणाचं भान जागं व्हायचं असेल तर ते आपल्या अधिकारांसाठी ठामपणे झगडणाऱ्या, कर्तृत्वाची अनेक क्षितिजं पार करत आभाळापर्यंत पोहोचणाऱ्या स्त्रीचं. याचं कारण, तीच सृष्टीची लेक आहे- सर्जनशील आणि सोशिक, कणखर आणि क्षमाशील, सुपीक, समृद्ध आणि संपूर्ण विश्वाला पोसणाऱ्या आणि विश्वाचा भार पेलणाऱ्या भूमीची ती समानधर्मा आहे.
    सृष्टीच्या आणि स्त्रीच्या, भूमीच्या आणि स्त्रीच्या एकरूपतेची ही खूण आज एकविसाव्या शतकातल्या स्त्रीच्या मनातून कदाचित पुसली गेलीही असेल. विस्तीर्ण अवकाशात झेपावताना भूमीशी असलेल्या नात्याचा विसर तिला पडलाही असेल. तिनं थोडं मागे वळून बघितलं तर तिला अगदी सहज पटेल तिची ही ओळख. तिनं जपू नये जाचक पारंपरिकता, तिनं अडकू नये कर्मकांडात, व्रतवैकल्यं पार पाडून तिनं झिजवू नये स्वत:ला आणि सण-उत्सवांमधल्या उपचारांचं अंधानुकरणही करू नये तिनं. पण या परंपरेमागचा अर्थ आणि त्या अर्थाच्या मुळाशी असलेलं स्त्री आणि भूमी यांच्यातलं साधम्र्य तर तिनं नक्की जाणून घ्यावं. पुरुषप्रधान संस्कृतीत स्वत:ला सिद्ध करू पाहताना आणि पर्यावरणाच्या प्रश्नांवर उत्तरं शोधतानाही हे साधम्र्य कदाचित तिचं आंतरिक सामथ्र्य वाढवू शकेल.
    आजच्या विज्ञाननिष्ठ युगात स्त्री-पुरुष समानतेचा आणि पर्यावरणपूरक अशा शाश्वत विकासाचा पाया रचताना प्राचीन परंपरेकडे डोळेझाक करणं कुणालाच श्रेयस्कर ठरणार नाही. कारण संस्कृतीची वाटचाल सुरू राहते तीच मुळी नव्या जुन्यांच्या संघर्ष आणि समन्वयातून. डॉ. इरावती कर्वे यांनी म्हटल्याप्रमाणे ‘ही सतत स्वीकाराची प्रक्रिया आहे. एका गोष्टीचा स्वीकार आणि दुसरीचा कायमचा त्याग, असा प्रकार संस्कृतीच्या घडणीत कधी दिसून येत नाही.’ त्यांनी जिला ‘नवस्वीकृती’ (aglomeration) म्हटलं आहे, ती ही प्रक्रिया स्त्री आणि पर्यावरण या दोहोंसाठी तर अधिक पोषक आहे. प्राथमिक कृषिजिवी समाजातलं स्त्री आणि सृष्टी यांच्यातलं साहचर्य आज डोळसपणानं समजून घेण्याची गरज आहे, ती यासाठी.
    ज्या काळात अन्न हीच जगण्याची मुख्य प्रेरणा होती, त्या काळात नवनिर्मितीची शक्ती असलेल्या भूमीला आणि त्याच शक्तीमुळे अर्भकाला जन्म देणाऱ्या स्त्रीला लोकमानसात गौरवाचं स्थान होतं. भूमीप्रमाणेच सर्जनशील, उदार, सोशिक, अनाग्रही आणि समर्पणशील असलेली स्त्री हीच त्या समाजाचा केंद्रबिंदू होती. तिला निर्णयाचं स्वातंत्र्य होतं. जमिनीला न दुखावता तिच्यातून उत्पादन घेणं, त्या उत्पादनाचं कुळात- समूहात वाटप करणं आणि समूहाचं व्यवस्थापन करणं हे स्त्रीचेच अधिकार होते. शेतीचा शोधच मुळी तिनं लावला. नांगराच्या मदतीनं शेतीला सुरुवात होण्यापूर्वी शेतीची सगळी कामं स्त्रीच्या पुढाकारानंच होत होती.
    सर्जनाचं नेमकं मर्म जाणणाऱ्या स्त्रीच्या आणि भूमीच्या साहचर्यामुळे भूमी आपल्याला अन्नधान्याची समृद्धी देते, अशी श्रद्धा त्या आदिम समूहांच्या मनात साहजिकच निर्माण झाली आणि म्हणून या लोकमानसानं स्त्रीला भूमीरुपात पाहिलं. भूमीला स्त्रीमध्ये बघून भूमीच्या सुफलीकरण विधींचा अधिकार स्त्रीकडे सोपविला. नागपंचमी आणि श्रावणातली विविध व्रतं, गौर-गणपती, नवरात्र, भोंडला, भुलाबाई, इनाई, भराडी गौर, शांकभरी, वसंतोत्सव, चैत्रगौर, अक्षयतृतीया, कानबाई यांसारख्या भारतभर सगळीकडे विविध प्रकारे साजऱ्या होणाऱ्या सण-उत्सव आणि व्रतवैकल्यांमागे जमिनीची सुफलनाची शक्ती वाढावी, ही प्राथमिक कृषिजीवी संस्कृतीची श्रद्धाच आहे. जिच्याजवळ उदंड निर्मितीक्षमता आहे, अशा स्त्रीनं भूमीच्या समृद्धीसाठी प्रतिकात्मक विधी करण्याची प्रथा शेतकरी समाजात आजही टिकून आहे. भरपूर पीकपाणी यावं म्हणून पेरणीची सुरुवात स्त्रीनं करावी, असा संकेत आहे. तिफणीची पूजा तिच्या हस्तेच केली जाते. झाडाचं पहिलं फळ स्त्रीला दिलं जातं.
    संपूर्ण आयुष्य निसर्गाशीच बांधलेलं असल्यामुळे आणि स्वत: सर्जनक्षम असलेली स्त्री सृष्टीच्या निर्माणक्षमतेला न दुखावता मानवी जीवन समृद्ध करेल, असा विश्वास असल्यामुळे वेदपूर्व आणि वेदकाळातही स्त्रीचं सामथ्र्य आणि सृष्टीचं आरोग्य अबाधित राहिलं. स्त्रियांनीच राखलेली आणि फक्त स्त्रियांनाच प्रवेश असणारी सहा-आठ हजार वर्षांपूर्वीची मातृवनं असोत, भूमी रजस्वला आहे, असं मानून शेतीची कामं चार दिवस बंद ठेवणारा अंबुवाची उत्सव असो किंवा नदीची खणा-नारळानं ओटी भरण्याची प्रथा असो, परंपरेतल्या या सगळ्या संकेतांमागे स्त्री आणि सृष्टी यांच्या नात्याची घट्ट वीण आहे. तसंच स्त्रीला उपजत असलेलं निसर्गाच्या रक्षणाचं  व संवर्धनाचं अचूक भान आहे.
    माणसाची वैज्ञानिक दृष्टी जसजशी विकसित होत गेली आणि बी पेरल्यापासून धान्य तयार होण्यापर्यंतची प्रक्रिया त्याला जेव्हा नेमकी उमगली, तेव्हा निसर्ग जपण्यासाठीच्या या सगळ्या पारंपरिक संकेतांचा गाभा असलेली श्रद्धा हरवली. जीवनशैलीचा सहज आणि अटळ भाग असलेल्या चालिरितींना धार्मिक उपचारांचं स्वरूप आलं. आजचे सण, उत्सव, व्रतवैकल्यं ही सत्त्व नष्ट झालेल्या फोलपटांसारखी वाटू लागतात, ती यामुळे. पर्यावरणाचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आणि त्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न होत असताना स्त्री आणि सृष्टी यांच्यातल्या या नात्याचं पुनरुज्जीवन व्हायला हवं.
    हे करायचं तर तिला परत मागच्या दिशेनं वाटचाल करण्याची गरज नाही. सृष्टीचं मर्म तिला उमगलेलं आहेच. निसर्गसंवर्धनाची परंपरेनं मिळालेली जाणीव तिच्या रक्तातून वाहते आहेच. पण आजच्या काळाला अनुरुप असा या जाणिवेचा मुक्त आविष्कार आता दिसायला हवा. तिनं स्वत:ला, कुटुंबाला आणि समाजाला भवतालाशी पुन्हा एकदा जोडून घ्यायला हवं. घरगुती कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करण्यापासून ते पाणी, इंधन वाचवणं आणि परिसरातील हिरवाई टिकवणं-वाढवणं यासाठी तिला वेगळा वेळ देण्याचीही गरज नाही. कर्तृत्वाच्या इतर क्षेत्रात भरारी मारतानाही तिनं भूमीशी, सृष्टीशी असलेल्या नात्याची प्रखर जाणीव ठेवली तरी बदल घडू शकतो. ‘स्त्री शिकली तर पूर्ण कुटुंब शिकतं’, असं म्हटलं जातं. तसंच निसर्ग संवर्धनाची दृष्टी घरातल्या स्त्रीनं बाळगली तर कुटुंबाची आणि पर्यायानं समाजाची जीवनशैलीही पर्यावरणपूरक होऊ शकते.
    अर्थात, पर्यावरणाच्या आजच्या अनेक प्रश्नांचं स्वरूप पाहता, केवळ व्यक्तिगत प्रयत्न पुरेसे ठरणार नाहीत, हेही खरंच. म्हणून स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधासाठी किंवा त्यांच्या हक्कांसाठी उभी राहणारी संघटित ताकद पर्यावरणावर घाला घालणाऱ्या शासकीय धोरणांच्या आणि प्रकल्पांच्या विरोधातही आता उभी राहायला हवी. स्थानिक वाणांचं उच्चाटन करून या मातीला आणि इथल्या समृद्धीला लुटणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विरोधात लढणाऱ्या आणि ‘नवधान्य’ कार्यक्रमाद्वारे स्त्री आणि सृष्टीला नवचैतन्य देऊ पाहणाऱ्या डॉ. वंदना शिवा असोत, आफ्रिकेतल्या हरित चळवळीची अध्वर्यू वांगारी माथाई असोत किंवा विकासाच्या नावाखाली निसर्गाला ओरबाडणाऱ्या प्रकल्पांविरुद्ध लढा देताना जिला स्वत:चं बलिदान द्यावं लागलं, ती ‘ग्रीन पीस’ संघटनेची प्रणेती पेट्रा केली असो, या सगळ्यांनी सृष्टीची हाक ऐकली आहे आणि आपापल्या पद्धतीनं त्या हाकेला मन:पूर्वक उत्तरही दिलं आहे. आता तुमच्या-माझ्यासारख्या प्रत्येकीनं असंच ठाम पाऊल उचलायला हवं.

    Sunday, June 5, 2011

    बहुगुणी अभ्यंगस्नान

     

    दिवाळीतील अभ्यंगस्नानाला अतिशय महत्त्व आहे. तेल चोळून, उटणे लावून भल्या पहाटे अभ्यंगस्नान होते. या स्नानामुळे त्वचेबरोबरच मनालाही तजेला मिळतो.
    अभ्यंग उपचार आयुर्वेदात हजारो वर्षांपूर्वी सांगितला आहे; पण त्याचा प्रसार मात्र सध्या परदेशात होत आहे. अंगाला तेल रगडणे, याला नाव दिलंय “मसाज’. उटण्याच्या खरखरीतपणाने त्वचा खसखसून धुणे, याला म्हणतात “स्क्रब’ आणि अंग कोरडे पुसून उटी लावणे, याला ते म्हणतात “डस्टिंग’.
    मसाजचे विविध प्रकार आहेत. त्यात नुसताच विशिष्ट भाग चेपणे, चापट्या, थोपटल्याप्रमाणे स्ट्रोक देणे हे विशिष्ट प्रकार काही तक्रारी दूर करायला चांगले असतात. यापेक्षा वेगळे म्हणजे जिरेपर्यंत सर्वांगाला तेल चोळून लावणे, ही झाली “अभ्यंग स्नेहल चिकित्सा’.
    अभ्यग्डे मार्दवकरः
    कफवातनिरोधनः ।
    धातूनां पुष्टिजननो
    मृजावर्ण बलप्रदः ।।
      आयुर्वेद म्हणते, सर्वांगाला तेलाने  मालिश केल्याने शरीर       बळकट होते व त्वचा नितळ व निरोगी राहते. सकाळी  आंघोळीपूर्वी अर्धा तास अंगाला तेल चोळून लावावे. त्वचेची रंध्रे उतरत्या कौलासारखी वरून खाली झुकणाऱ्या दिशेने असतात. त्यामुळे तेल खालून वर चोळून लावावे म्हणजे जिरते. हृदयाच्या दिशेने मालिश करावे, हे त्यासाठीच म्हटले आहे. संपूर्ण शरीराला लावायला 2 मोठे चमचे (अंदाजे 30 मिली.) तेल पुरते. संपूर्ण शरीराला तेल लावून जिरवायला 15 ते 20 मिनिटे पुरतात. नंतर तेवढाच वेळ थांबून आंघोळ करायला हरकत नाही. पोटाची तक्रार असताना किंवा आजारपणात अभ्यंग करू नये.
    आपल्या त्वचेचे तीन भाग असतात. बाह्य त्वचा म्हणजे आपल्याला दिसणारी. ती तुकतुकीत, लवचिक व उजळ असावी. बाह्य त्वचेवर सतत मृतपेशी व मृतत्वचेचा लेप चढत असतो. मालिशमुळे तो निघतो. रंध्रे मोकळी होतात व तेथील श्‍वासोच्छवास चालू राहतो. त्या आतील भागात असतात महत्त्वाच्या ग्रंथी. जसे घाम पाझरणाऱ्या, तेल पाझरणाऱ्या, संवेदना पोचवणारे मज्जातंतू. मसाजने येथील रक्ताभिसरण सुधारते. प्राणवायूचा व पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो. निरुपयोगी तत्त्वे बाहेर फेकली जातात. त्या आतील भागात असतो मेदाचा थर. ज्यावर त्वचा विसावली असते. तेल मेदाच्या थरात शिरून तेथील शिथिलता घालवून तो कार्यक्षम व लवचिक बनवते. त्यामुळे त्वचा निबर व निस्तेज दिसत नाही.
    कृशानां बृहणाय स्थूलानां ।कर्शनाय च तैलमेव अलम ।।
    म्हणजे कृष शरीर पुष्ट होण्याकरिता व स्थूल शरीर कृष होण्याकरिता तेल हे एकच पुरेसे आहे. हे आयुर्वेदात म्हणूनच म्हटले असेल.
    परदेशात मसाज पार्लर्स असतात. तेथे सगळे शरीर रगडून देतात. त्यामुळे ताणतणाव नष्ट होऊन नवचैतन्य येते, असे म्हणतात. आपल्याकडेही बाळ-बाळंतिणीला, पैलवानांना गेलेली शक्ती भरून निघण्यासाठी मसाज करण्याची पद्धत आहे. आपल्याला काही दररोज अभ्यंगाला वेळ नसतो हे खरे आहे. रात्री झोपताना निदान डोक्‍याला व तळपायाला तरी तेल चोळून लावावे. त्याने थोडे तरी फायदे मिळतात. आठवड्यातून एकदा तरी सर्वांगाला अभ्यंग करावे.
    निरनिराळ्या तेलबियांपासून त्या त्या गुणाची तेले मिळतात. जसे एरंड, करंज, कडुलिंब अशी अळाद्य, तर शेंगदाणा, बदाम, ऑलिव्ह, खोबरेल, तीळ अशी खाद्य तेले; पण अभ्यंगाला तिळाचे तेल उत्तम. खरंतर तेल नावच त्यावरून आले “तिलोद्‌भवं तेलम’ म्हणजे तिळापासून उत्पन्न झालेले हे तेल. आयुर्वेदाला तिळाच्या तेलाचे कौतुक फार. स्वाभाविकच आहे म्हणा. तिळाचे तेल हे उष्ण, तीक्ष्ण व सूक्ष्म गुणाचे असते. चोळून लावताना उष्णता व घर्षणामुळे ते त्वचेत शिरते शरीरात सर्वत्र पोचून नंतर पचते व ताण शिथिल करते. शरीरातील घटकांना वंगण पुरवते.
    तिळाचे तेल ज्या वनौषधीबरोबर प्रक्रिया करावे, तिचे गुण आत्मसात करते. अशी वनस्पती हवी. जी तीळ तेलाचे गुण वाढवेल, दोष कमी करेल व त्वचेला फायदे देईल. खरं तर तेल हे नाव त्यावरूनच आले. “”तिलोद्‌भव तैलम” म्हणजे तिळापासून उत्पन्न झालेले ते तेल; पण हल्ली तेलातील भेसळ हा प्रकार सर्रास झालाय. ती रोखावी म्हणून भारत सरकारने “ऍगमार्क’ ही प्रणाली आणली. ऍगमार्कला भारत सरकारची दर्जा व “शुद्धतेची हमी’ असे म्हणतात. तिळाचे तेल घेताना त्यावरील ऍगमार्क चिन्हे पाहूनच घ्यावे.
    खाद्य तेलाची भेसळ, टंचाई व महागाई यावर उपाय म्हणून केरळमध्ये “करंजेल’ या अखाद्य तेलात वात लावून दीपोत्सव साजरा करतात. बरे, करंज तेल जंतूनाशकही आहे. त्यामुळे वातावरणही शुद्ध राहते.
    उद्वर्तनं कफहरं मेदोघ्नं शुक्रदं परम ।
    बल्यं शोणित कृच्चापि
    त्वकप्रसाद मृदुत्वकृत ।।
    उटण्यामुळे जास्तीची चरबी नाहिशी होते. त्वचेचा वर्ण व पोत सुधारतो. उटणे म्हणजे साफ करणाऱ्या, पोषण करणाऱ्या व सुगंधी वनौषधींचे वस्त्रगाळ चूर्ण. आंघोळीच्या वेळी साबणाऐवजी ते दुधात किंवा पाण्यात कालवून त्वचेला चोळून लावावे. साबणातील फेसामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल व आर्द्रताही निघून जाते, तर उटण्यामुळे ती राखली जाते.
    दीपनं वृष्यमायुष्यं स्नानमोजोबलप्रदम ।
    कण्डूमलश्रमस्वेदतन्द्रा तृड्‌दाहपाप्ननुत ।।
    स्नान हे आरोग्यदायी आहे. खाज, मळ, घाम इ. पातकांचा ते नाश करते.
    शरीराचे तापमान व आंघोळीसाठी घेतल्या जाणाऱ्या पाण्याचे तापमान सारखे असावे. म्हणून अतिथंड किंवा अतिउष्ण पाणी न वापरता कोमट पाणी वापरावे. आंघोळीनंतर स्वच्छ, कोरड्या टॉवेलने अंग खसखसून पुसावे. त्वचेच्या आरोग्यासाठी अशी ही अभ्यंग चिकीत्सा. अगदी दररोज शक्‍य नसल्यास आठवड्यातून एकदा तरी करावी. 




    फरक कुठे पडला आहे..........

     

    लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
    त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
    आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जातो|
    मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देतो|
    आधाराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे|
    बापलेकाच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे|

    लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचो|

    नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरी खायला लावायचो|
    परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली|
    मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली|
    पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरक कुठे पडला आहे|
    मायलेकाच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे|

    तेव्हा भाउबीजेला बाबंकडून ओवळणीचे पैसे घ्यायचो|

    ओवळणी द्यायच्या आधी ताईला खूप चिडवायचो|
    कमावता झाल्यापासून तिला काय पाहिजे विचारतो|
    मात्र अजूनही ब्लेकबेरीची मागणी नोकियावर भागवतो|
    ओवळणी बदलली तरी फरक कुठे पडला आहे|
    राखीच्या धाग्यांमधला प्रेमळ बंध तोच आहे|

    लहानपणी धाकटयावर दाद्ागिरी करायचो|

    पण कुणी त्याला रागावला की पाठीशी घालायचो|
    काल तोच धाकटा जेव्हा परीक्षेला निघाला|
    पायाशी झुकून दादा आशीर्वाद दे म्हणाला|
    थोरला असो की धाकटा फरक कुठे पडला आहे|
    भावाकरता वाटणारी कळकळ तीच आहे|

    कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा|

    बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचा तास रंगायचा|
    आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचा फोन येतो|
    सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा मित्रांचा मेळा भरतो|
    शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे|
    मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे|

    जवळ असा की दूर , नाती रक्ताची की मनाची फरक कुठे पडतो|

    मायेच्या आपल्या माणसांसाठी जीव आपोआप तळमळतो|
    पावसात ओलावा हा जास्त च..
    आई च्या हातची भाजी..
    डोकं पुसणारी आई..
    छत्री घेवून येणारे बाबा.. बरोबर कि नाही...

    ते दिवस किती छान वाटतात ....

    ते दिवस किती छान वाटतात ....
    आता मोठे झाल्यावर कामाच्या व्यापात
    कुठे ती भावंडे रोज रोज भेटतात ???....

    कधीतरी मार्च मधे चीनू च्या वाढदिवसाला

    भरलेल्या रोल मधले फोटो अगदी नोहेम्बर मध्ये
    मीनू च्या वाढदिवसा पर्यन्त काढले जायचे
    हल्ली मात्र रोज फोटो काढतो ......
    पण तरीही बाबांनी पुरवून पुरवून वापरलेले रोल मधले फोटो
    जास्ती प्रिय का वाटतात ???

    त्या वेळेला बाबांनी महिन्यातून एकदा आणलेले बटाटे वडे

    आज स्वताच्या पैशाने रोज खाल्ले तरी बेचवच का वाटतात ???...
    पाकीटातल्या ५००/- रुप्यांपेक्षा
    मागुन घेतलेले २० रूपये नेहमी जास्त मौल्यवान का वाटतात ???...

    बाबांच्या खिशात हळूच सरकवलेले २०० रूपये

    जेव्हा त्यांना अचानक सापडतात ..
    तेव्हा त्यांच्या चेहरयावरचा आनंद पाहून
    आश्रू डोळ्यात दाटतात

    १०-१२ वर्षापूर्वी ज्या बहिणीशी खुप जुने वैर असल्यासारखे भांडायचो ...

    आज त्याच बहिणीचे धीराचे शब्द इतके का जवलचे वाटतात ???..
    आज सार काही आहे तरीही ,
    ते जुने दिवस आठवले की,का मनात खोल
    घर करून जातात ...
    असे हे प्रश्न फक्त मलाच की तुम्हाला सुद्धा पडतात ??????......