Saturday, August 23, 2014

पोळा आठवणीतला

बैलपोळ्याचा दिवस उगवला की, माझं मन गोळा होऊन, गाववेशीतून फिरून येतं. बसल्या बसल्या गावच्या आठवणी काढतं. लहानपणाच्या, शाळकरी वयातल्या गाईगुरं चारण्याच्या आठवणी, मनात रुंजी घालतात. त्यावेळचा काळच वेगळा होता. मृगाचा पाऊस हमखास पडायचा. शेतकरी आपल्या गाई-गुरांसह स्वतःला पावसात भिजवून घ्यायचा. उन्हात नांगरून, वखरून पडलेली जमीन भिजायची. पडणाऱ्या पावसात ती खोलवर अंग भिजवून घ्यायची. शिवारातली झाडं, झुडपं वेली- गवताच्या हिरवाईनं सारं वातावरणं नटलेलं असायचं. आनंदित झालेला शेतकरीराजा बैलजोडी घेऊन शेतावर जायचा, मशागत करायचा. भुसभुशीत जमिनीत बी-बियाण्यांची तो पेरणी करायचा.

पेरणी झाली की, प्रसन्न होत शेतकरीराजा उगवून आलेल्या हिरव्या निळ्या पिकांचं संगोपन करायचा. निंदनी, खुरपणी, कोळपणी करून त्याला उसंत मिळायची. घरच्या लक्ष्मीला अर्थात शेतकऱ्याच्या बायकोला माहेरची ओढ लागायची. नागपंचमीचा सण ऐन हिरवाईत यायचा. शेतकऱ्याचा मित्र साप, त्याची गावात मनोभावे पूजा व्हायची. नाच गाणं व्हायचं. माहेरवाशिणी शिवारानं पांघरलेल्या हिरव्या दुलईच्या साथीनं झोके घ्यायच्या. नारळी पौर्णिमा त्यांच्या मनात रक्षाबंधनाची साद घालायची. शेतकऱ्याला पोळ्याच्या सणाची चाहूल लागायची. तो प्रफुल्लित व्हायचा. रक्षाबंधनाची आठवण घेऊन शेतकरी राजाबरोबर घरातील स्त्री शेतीच्या कामात गुंतायची. शेतकऱ्याचा आनंद आता वाऱ्यावर डोलणारं पीक पाहून गगनात मावत नसायचा. या आनंदाच्या वातावरणातच पोळ्याच्या सणाची तो उत्साहाने तयारी करायचा.  
 
पोळ्याच्या दिवशी पहाटेची मोठी चांदणी मावळते न मावळते, तोच तो उठायचा. बैलजोडीसह शेतावर जायचा. बारा महिने शेतात राबणाऱ्या बैलांना पोळ्याच्या दिवशी विश्रांती असते. ओला चारा वैरण बैलांना घातली जायची. बांधावरील ओल्या हिरव्या टवटवीत गवतावर बैलांना चरू दिलं जायचं. चरून तट्ट झालेले बैलं हुंदडायचे, मस्तवायचे, उंचवटा पाहून शिंगांनी माती उकरायचे. नंतर शेतकरी नदीनाल्याच्या नितळ पाण्यात त्यांना आंघोळ घालायचा. बैलांचं शरीर घासून काढायचा. त्यांची व त्याची अंघोळ झाली की बैलांना सजवायला घ्यायचा. खुरं चकाचक करायचा. बैलांचे खांदे ढोपर तेल लावून मालिश करायचा. गेरू लावून जखमांना थंडावा द्यायचा. शिंगं साळून लाल-पिवळ्या गुलाबी रंगाचा हिंगुळ लावून त्यावर बेगड चिकटवायचा. चमचमणारी शिंगं खुलून दिसायची. शिंगांवर छंबीगोंडा, चेहऱ्यावर म्होरकी, गळ्यात घुंगरू, नाकात नवी वेसण, अंगावर झूल, उघड्या अंगावर रंगीबेरंगी ठिपके. गोंड्याची शेपटी असा सजलेला बैल गाववेशीत आणला जायचा. असा सजलेला बैल इतरांना पाहून नखरायचा. आपल्या धन्याला जिभेनं चाटून सांगायचा, ‘धनी सगळ्यात भारी आहे मी.’ दोघं हर्षित व्हायचे!

गाववेशीतून बैलपोळा फुटला की देवळासमोर दर्शन घेऊन. देवाला सलामी देऊन. पूर्ण गावभर मिरवून बैलं घरी आणले जायचे. घरधनीन बैलांना ओवाळून त्यांना हळदी-कुंकू लावून त्याची मनोभावे पूजा करायची. ‘अशीच साथ दे माझ्या धन्याला, बरकत येऊ दे सालोसाल, बळीचं राज्य होऊ दे.’ अशी प्रार्थना ती करत असे. पुरणपोळीचा घास भरवून, सुपातलं धान्य त्याला चारून, पायांवर पाणी वाहायची. नारळ फोडून प्रसाद वाटला जायचा. बैलपोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याचा उपवास असायचा. गोठ्यात बैलांना चारावैरण करून गोडघोड खाऊन मगच तो उपवास सोडायचा..!

आज गाववेशीतून बैलपोळ्याच्या दिवशी कुणाला मिरवायचं? खापराचे मांडे, पुरणपोळी कोणी बनवायची? हे करणाऱ्या महिलाही आता राहिल्या नाहीत. बैलं तरी आहेत का मिरवायला? बैलांचा आनंदानं सांभाळ करणारे किती शेतकरी उरले आहेत? पिठोरी अमावास्या म्हणजे बैलपोळ्याचा दिवस. मी मनाच्या वेशीत उभा आहे बैलपोळ्याच्या आठवणी जागवत...!

No comments:

Post a Comment