Monday, August 6, 2012

इक बूँद कभी पानी की..

PrintE-mail
पाऊस! कधी आर्त, वाट पाहावयास लावणारा, कधी भर पावसात तन-मनाची होरपळ करणारा, कधी सारे भेद, सारे अंतर मिटवून अंतर्बाह्य़ भिजवून टाकणारा. मनाची ओल आणि मनाचा शुष्कपणा गुलजारांच्या गीतांतील पावसात प्रतीत होत जातो. त्यांच्या गीतांतील भाव मनाच्या सरोवरात अर्थाच्या थेंबांप्रमाणे पडतात आणि मग तरंगावर तरंग उमटत जातात अन् आपल्या भावविश्वाचा सारा तळ ढवळून निघतो.
‘छोटी सी कहानी से
बारिशों की पानी से
सारी वादी भर गयी..’
गुलजारांचा ‘इजाजत’ हा एक अलवार, भावगर्भित ‘काव्यपट’! त्यातील हे एक गीत! या चित्रपटाची सुरुवात बेभान कोसळणाऱ्या पावसात विरणाऱ्या डोंगर, दऱ्या आणि झाडे यांच्या दृश्याने होते. पाश्र्वभूमीवर आशाताईंच्या आवाजातील चिंब गाणे.. ‘छोटीसी कहानी से’..
रंग-रूपाचे सारे भेद मिटवून टाकणारा, साऱ्या सृष्टीला अंतर्बाह्य़ भिजवून, तिला नवनीत करणारा पाऊस गुलजारांच्या गीतांतून नित्य भेटत राहतो.
मुळात गुलजार हे भावकवी! मनातील सूक्ष्मातिसूक्ष्म भाव-भावना व्यक्त करताना ते निसर्गघटकांचा प्रतिमा व प्रतीके म्हणून आपसूकच वापर करतात. दूर जाणाऱ्या वाटा, वळणे, झाडांच्या निष्पर्ण फांद्या, एकाकी डोंगरमाथा, सुकलेले पिवळे पान, त्याचा तुटून, गळून पडल्याचा आवाज, दऱ्या-खोऱ्यांत गुंजणारी शून्य शांतता, पिवळसर ग्लान चंद्र.. असे सारे काही त्यांच्या कवितांमध्ये, गाण्यांमध्ये डोकावत असते. त्यातही प्रामुख्याने येतो तो म्हणजे पाऊस.
पाऊस! कधी बेभान कोसळणारा. कधी सरत्या थेंबांचा. गुलजारांचा पाऊस ‘माणूसपण’ लेवून येतो. मानवी मनाचे असतात तसे त्याचेही विभ्रम असतात. गुलजारांचा पाऊस एखाद्या कवीच्या हळव्या मूड्ससारखाच. हा पाऊस कधी आर्त, वाट पाहावयास लावणारा, कधी भर पावसात तन-मनाची होरपळ करणारा, कधी सारे भेद, सारे अंतर मिटवून अंतर्बाह्य़ भिजवून टाकणारा. मनाची ओल आणि मनाचा शुष्कपणा गुलजारांच्या गीतांतील पावसात प्रतीत होत जातो. त्यांच्या गीतांतील भाव मनाच्या सरोवरात अर्थाच्या थेंबांप्रमाणे पडतात आणि मग तरंगावर तरंग उमटत जातात अन् आपल्या भावविश्वाचा सारा तळ ढवळून निघतो.
गुलजारांचा पाऊस स-रूप आहे. रंग, रूप, नादासकट तो गीतातून प्रकट होत जातो..
‘शाखों पे पत्ते थे
पत्तों पे बूंदे थी
बूंदों में पानी था..’
अशी शब्दप्रतिमा समोर उभी राहत असतानाच पावसाचा अन् नायिकेचा मूड लेवून पुढली ओळ येते..
‘पानी में आंसू थे..’
दाटल्या आभाळात वीज चमकून जावी तशी मनात कसलीशी एक कळ उमटते. अर्थात, गुलजारांचा पाऊस संवेदना ल्यालेला. नायिकेच्या मनात दडलेलं बाल्य पुढच्या ओळीत उमटून जातं..
‘रुकती है, थमती है, कभी बरसती है
बादल पे पांव रखे, बारिश मचलती है’
पावसाचे सगुण रूप दाखविताना गुलजार दुसऱ्या एका गाण्यात म्हणतात-
‘मोती मोती बिखर रहा है गगन
पानी पानी है, सब पिघलने दो
मेंहा बरसने लगा है आज की रात
आज की रात मेंहा बरसने दो..’
सारे काही शुष्क, कोरडे असते. मातीच्या तळव्याला भेगा पडतात. कोरडे डोळे कोरडय़ा आभाळाकडे लागतात, तेव्हा गुलजार पावसाची आळवणी करतात..
‘अल्ला मेघ दे, पानी दे
पानी दे, गुडधानी दे..’
तरी पाऊस कोसळत नाही, तेव्हा जगण्याची सामूहिक तहान गुलजार मांडून जातात..
‘मछली मर गई
नदिया सुखी
नदिया सुखी
फ़ाके पड गए
फ़ाके पड गए
बुढिया भूखी
कौन बचाए
बादल आए..’
मानवी नाते हा गुलजारांना भावणारा, खुणावणारा, खरं तर झपाटून टाकणारा विषय! मानवी मनाचे असे नाते त्याच्या साऱ्या गहिऱ्या छटांसह त्यांच्या गीतांतून, कवितांमधून प्रतिबिंबित होत असते. मानवी मन तरी किती सूक्ष्म; चिमटीत मावणार नाही इतके. आणि विशाल तर इतके, की काळाच्याही बाहुपाशात मावू नये. मानवी मनाची आंदोलने व्यक्त करण्यासाठी कुठल्याही कवीला अलवार असा पाऊस हवाच असतो. मानवी मनाच्या असतात तशाच पावसाच्याही छटा असतातच.. असंख्य, अनंत!
गुलजारांच्या नायिकेचे भावविश्व, तिचे मन कायमच पावसाच्या खेळाशी बांधले गेलेले आहे. तो तिचा सखा आहे, तसाच वैरीही! तिचे भावविश्व उलगडताना कवी पावसाच्या प्रतिमांचा सहज वापर करून जातो.
‘झिर झिर बरसे सावनी अखियाँ
साँवरिया घर आ..’
पावसाने यावे. नक्की यावे, पण एकटय़ाने येऊ नये. सोबत प्रियकरालाही घेऊन यावे. पाऊस आला, पण ‘तो’ नसेल तर पावसाच्या येण्याला अर्थ तो काय?
‘तेरे संग सब रंग बसंती
तुझ बिन सब सुखा..’
येथे पाऊस कोसळतोय अन् जीवलग कुठेतरी दूर दूर. तेव्हा ती म्हणते-
‘इक घन बरसे, इक मन प्यासा
इक मन प्यासा, इक मन तरसे..’
इथला पाऊस त्याच्या गावी जावा अन् त्याने तिच्या मनाची तगमग जीवलगाला सांगावी म्हणून ती म्हणते-
‘पलकों पर इक बूँद सजाए
बैठी हूँ सावन ले जाए
जाए, पी के देश में बरसें
इक मन प्यासा, इक मन तरसे..’
तसे पाहिले तर मनाचे अन् आभाळाचे नाते अनोखे! दोघेही वेळी-अवेळी दाटून येतात अन् वेळी-अवेळी बरसतात.
पावसाच्या रूपात गुलजार अगदी सहजच प्रणयाचे संसूचन करून जातात..
‘पत्ते-पत्ते पर बूँदे बरसेगी
डाली-डाली पर झुमेगा सावन
प्यासें होंठो को चूमेगी बारिश
आज आंखों में फूलेगा सावन’
पावसात त्या दोघांचे एकाच छत्रीत भटकणे त्या वेळी कितीही सुखावून गेलेले असले तरी आज दुरावलेल्या विरही अवस्थेत मात्र त्याची आठवण उदास करून जाते..
‘एक अकेली छतरी में जब
आधे-आधे भीग रहे थे
आधे सूखे, आधे गीले
सूखा तो मैं ले आई थी
गीला मन शायद बिस्तर के पास पडा हो..’
जीव पिळवटून टाकणारी अशीही वाटणी! भिजलेले अंग कधीच कोरडे होऊन जाते, पण भिजल्या मनाचे काय?
पाऊस अन् विरहाचा पारंपरिक संबंध गुलजारांच्या गीतांतून ठायी ठायी येतो..
‘अब के ना सावन बरसे
अब के बरस तो बरसेगी अंखियाँ..’
किंवा
‘सावन में बरखा सताए
पल पल, छिन छिन बरसे
तेरे लिए मन तरसे..’
अर्थात जेव्हा पाऊस नसतो, तेव्हाही आसवे असतात. आकाश दाटून येवो- ना येवो; मन कळत-नकळत दाटून येते. डोळे पाझरू लागतात.
‘दो नैनों मैं आँसू भरे है
निंदिया कैसे समाए..’
गुलजारांच्या गाण्यांमध्ये नॉस्टेल्जिक मूड असतोच. खोल दऱ्यांतील पावसाळी धुक्यासारखा!
‘पानी-पानी इन पहाडों की ढलानों से उतर जाना
धुआँ-धुआँ कुछ वादियाँ भी आएँगी, गुजर जाना
इक गाँव आएगा, मेरा घर आएगा
जा मेरे घर जा, नींदे खाली कर जा
पानी, पानी रे..’
कधी आकाश भरून येते, पण बरसून मोकळे होत नाही. तसेच कधी कधी मनाचे होते. एक अपरंपार सैरभैरपण वाऱ्यासारखे मनात घोंघावत राहते.
‘दिल हुम हुम करें घबराए
घन धम धम करे डर जाए
इक बूँद कभी पानी की
मोरी अँखियों से बरसाए..’
अन् अवचित जर जीवलग आला, तर सारे काही तरारून येते, मोहरून उठते..
‘तेरी झोरी डारूँ
सब सूखे पात जो आए
तेरा छूआ लागे
मोरी सूखी डाल हरियाए..’
असा हा पाऊस आणि गुलजारांची पाऊस-गीते! अंतरीचा भाव व्यक्त करतानाच अंतरीचा ठाव घेणारी! असं एखादं गाणं कानी पडलं की, ‘बारिशों की पानी से’ मनाची ‘सारी वादी’ भरून जाते. मन अंतर्बाह्य़ भिजून चिंब होते. मग खिडकीबाहेर पाऊस बरसो वा न बरसो..
 

No comments:

Post a Comment